बुधवार, १ एप्रिल, २०२६

“गोवा मुक्ती संग्रामातील शिलेदार हरपला… कुंभारगावचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक गणपत गुरव यांचे निधन”


कुंभारगाव (ता. पाटण) येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी शिलेदार श्री. गणपत विष्णू गुरव यांचे दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंभारगावसह संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, स्वातंत्र्यलढ्यातील एक जिवंत इतिहास आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

स्वातंत्र्य, न्याय आणि देशभक्ती यांसाठी आयुष्य झिजवणारे गणपत गुरव हे पाटण तालुक्यातील एकमेव जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात होते. विशेषतः गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य होते. त्यांच्या धाडस, त्याग आणि राष्ट्रप्रेमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. अनंत गुरव, मंडळ अधिकारी श्री. मुल्ला, तलाठी श्री. गायकवाड तसेच कुंभारगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात मुलगा श्री. संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), सून सौ. वैशाली गुरव (ग्रामपंचायत सदस्य), दोन मुली, तसेच नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वैकुंठधाम, कुंभारगाव येथे होणार आहे.

गणपत गुरव यांचे आयुष्य म्हणजे देशसेवेचा दीपस्तंभच… त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.

शेतात झाडाच्या फांद्या तोडताना लागला विजेचा धक्का; उमरकांचनच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

पाटण तालुक्यातील जिंती - उमरकांचन गावावर दुःखाचे सावट पसरवणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. शेतातील झाडाच्या फांद्या तोडत असताना विजेचा तीव्र धक्का बसून आनंदा विष्णू मोहिते (वय ५६) या कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा मोहिते हे आपल्या पानंदिवली शिवारातील शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. शेतातील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम ते करत होते.करंजीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक एक फांदी तुटून जवळून गेलेल्या ३३ केव्ही वीजवाहक तारांमध्ये अडकली. क्षणार्धात जोरदार विद्युतप्रवाह त्या फांदीतून त्यांच्या शरीरात उतरला आणि त्यांना भीषण शॉक बसला.

घटना इतकी अचानक आणि भीषण होती की, त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले. कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेला माणूस अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती दादाराम मोहिते यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण, तसेच धीरज मुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतदेह पुढील तपासणीसाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. पी. दोडके पुढील तपास करत आहेत.

शेतात काम करताना विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर राखणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही दुर्दैवी घटना आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा उघड्या वीजवाहक तारांबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बुधवार, २५ मार्च, २०२६

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

 

📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६

तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली.

स्थानिकांमध्ये अशी चर्चा सुरू होती की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.

परिणामी, तळमावलेत विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंप कर्मचाऱ्यांनाही ताणाचा सामना करावा लागला.पेट्रोल पंप धारकांनाही याबाबत आगाऊ सूचना मिळाली नसून तेल पुरवठा व्यवस्थित सुरू आहे.पण अफवा पसरल्यामुळे नागरिक विनाकारण पंपावर तेल भरण्यासाठी गर्दी करत आहे,असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण देताना पुरवठा विभाग पाटणचे अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खरोडे यांनी स्पष्ट केले की,
“तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”

तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केली की, अनावश्यक घाई किंवा साठेबाजी टाळावी आणि परिस्थिती शांत ठेवण्यास सहकार्य करावे.

सद्यस्थितीत कोणतीही इंधन टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. अफवांमुळे निर्माण होणारी घबराट टाळणे हीच खरी जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शनिवार, २१ मार्च, २०२६

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि कोणाचा ‘गेम’ वाजणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगत असतानाच अखेर २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

सुरुवातीला सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. मात्र शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्व गणिते कोलमडली आणि भाजपने अनपेक्षितरीत्या बाजी मारत जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलवले.

या निवडीत भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांना जबर धक्का बसला आहे.

दरम्यान, या विजयाचा आनंद तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

या वेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष मा. गणेशजी यादव, बनपुरी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बाबा मोकाशी, कामगार मोर्चा अध्यक्ष ओमकार माने, सरचिटणीस संतोष देसाई, दिव्यांग आघाडी अध्यक्ष गणेश पाटील, धनाजी मोहिते, दरबार हॉटेलचे मालक महेंद्र कांबळे, भगवान माने तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निकालामुळे सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असून पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, २० मार्च, २०२६

ढेबेवाडी - श्री नाईकबा यात्रा २०२६ : प्रशासनाचा यात्रा तयारीचा आढावा पूर्ण.

 

ढेबेवाडी, ता. 20 : श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

आज प्रांताधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली असून यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविताना हयगय अजिबात सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा देण्यात आला.

येत्या २३ मार्च रोजी नैवेद्य तर २४ मार्च रोजी पालखी सोहळा होणार असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


 बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना

  • धोकादायक वीजवाहिन्या व केबल्सचा तातडीने सर्व्हे करून दुरुस्ती
  • वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस व आरटीओ यांचा समन्वय
  • पुरेसा पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा
  • पार्किंगची सुयोग्य व्यवस्था
  • पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासणी
  • आरोग्य पथके व औषध साठा सज्ज ठेवणे
  • बेकायदा दारू विक्रीवर कठोर कारवाई
  • स्वयंसेवकांची विशेष टीम नियुक्त
  • मंदिर परिसरात कंट्रोल रूम उभारणे
  • गर्दीत बैलांना प्रवेश न देण्याचे निर्देश
  • अग्निशमन यंत्रणा व अँब्युलन्स सेवा तैनात
  • महिंद धरणातून योग्य वेळी पाणी सोडण्याचे नियोजन

या बैठकीस प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, उपअभियंता गिरीश सावंत, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच सचिन जानुगडे, ट्रस्ट अध्यक्ष विलासराव जानुगडे, ॲड. अविनाश जानुगडे, तसेच ग्रामपंचायत, यात्रा समिती, ट्रस्ट पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेकरूंना मदत व्हावी यासाठी अत्यावश्यक मोबाईल क्रमांकांसह विशेष माहितीपत्रक (डायरी) तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

यंदाची श्री नाईकबा यात्रा अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

गुरुवार, १९ मार्च, २०२६

कळंत्रेवाडी भैरवदरा येथे एस.टी. बस थांबा बोर्ड; प्रवाशांच्या अडचणींचा शेवट.

कळंत्रेवाडी भैरवदरा येथे एस.टी. बस थांबा बोर्ड; प्रवाशांच्या अडचणींचा शेवट.

ठाणे – गलमेवाडी मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. कुंभारगाव–मान्याचीवाडी दरम्यान असलेल्या कळंत्रेवाडी भैरवदरा येथे अखेर एस.टी. बस थांब्याचा अधिकृत बोर्ड आज दिनांक १९ मार्च २०२६ रोजी बसविण्यात आला.

ठाणे ते गलमेवाडी व गलमेवाडी ते ठाणे अशी एस.टी. बस सेवा दररोज सुरू असली, तरी कळंत्रेवाडी भैरवदरा येथे अधिकृत थांबा दर्शवणारा बोर्ड नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रत्येक वेळी चालक व वाहक वेगळे असल्याने या ठिकाणी बस थांबवावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होत असे. परिणामी, बस थांबवण्यावरून प्रवासी व एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद होत होते.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत कळंत्रेवाडी भैरवदरा येथील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, आज अधिकृत थांबा बोर्ड बसवण्यात आला आहे.

या बोर्डामुळे आता चालक व वाहकांना स्पष्ट मार्गदर्शन मिळणार असून, सर्व एस.टी. बसेस नियमानुसार येथे थांबतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून, “ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे ही समस्या सुटली,” अशी भावना व्यक्त केली आहे.

ही सुविधा सुरू झाल्याने कळंत्रेवाडी भैरवदरा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवार, १८ मार्च, २०२६

*'सेल्फी विथ गुढी' स्पर्धेत सहभागी होण्याचे 'स्पंदन' चे आवाहन*


तळमावले/वार्ताहर : 
गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुध्द
प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या
पहिल्या दिवशी महाराष्ट्रात साजरा
केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. हिंदू नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त समजला जातो. दारी
उभारलेली गुढी हे विजय आणि समृध्दीचे प्रतिक आहे असे मानले जाते. त्याचे औचित्य साधत
'चला संस्कृती जपूया' ही टॅगलाईन घेवून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने 'सेल्फी विथ गुढी' ही
अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. सध्या अनेकजण सेल्फी काढून फेसबुक,  व्हॉटसअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड करीत असतात. सेल्फी काढण्याचा मोह तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत कुणालाही आवरता आलेला नाही. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल याचा विचार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र डॉ. संदीप डाकवे यांनी केला. आजही आपण आपली संस्कृती तितक्याच उत्साहाने जपत आहोत हे
दर्शवण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने 'सेल्फी विथ गुढी' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेल्या प्रत्येक सामाजिक, कलात्मक उपक्रमाला समाजाच्या सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'सेल्फी विथ गुढी' या स्पर्धेत आपण आपला सेल्फी
'व्हॉटसअप' करायचा आहे. सेल्फी काढताना आपण पारंपारिक पोशाख परिधान केलेला असावा.
सेल्फी मधून आपण आपली संस्कृती जपत असल्याचे दिसले पाहिजे. सदर सेल्फी गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच गुरुवार दि. 19 मार्च, 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. सदर सेल्फी पाठवताना त्यावर संपूर्ण नाव आणि पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. सदर सेल्फी ९७६४०६१६३३ भ्रमणध्वनीवरती पाठवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अभिमानपत्र आणि पुस्तक देवून सन्मानित करण्यात येईल. तर सर्व सहभागी स्पर्धकांना ई-डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 'सेल्फी विथ गुढी' या स्पर्धेत आतापर्यंत 24 जणांना गौरवले आहे. नेहमीच नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले आहे.

“गोवा मुक्ती संग्रामातील शिलेदार हरपला… कुंभारगावचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक गणपत गुरव यांचे निधन”

कुंभारगाव (ता. पाटण) येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी शिलेदार श्री. गणपत विष्णू गुरव यांचे दिनांक ३...