शनिवार, ४ एप्रिल, २०२६

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*


साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात कदम जखमी झाले असून त्यांच्यावर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मार्च रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास विनोद कदम हे जेवण करून घरी झोपले होते. अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते तात्काळ घराबाहेर आले. बाहेर येताच त्यांनी पाहिले की, एका बिबट्याने त्यांच्या कुत्र्याला पकडले होते.

धाडसाने त्यांनी कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी बिबट्याने संतापून त्यांच्यावरच झडप घातली. झालेल्या झटापटीत कदम जखमी झाले. आरडाओरड आणि गोंधळामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत विनोद कदम यांना तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पाहणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे पवारवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री एकटे बाहेर न पडणे, पाळीव जनावरांची काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

रयत सहकारी पतपेढीचा रौप्यमहोत्सवी टप्पा; २५ कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल, सभासदांसाठी ११% व्याजदराची विशेष ठेव योजना.



मुंबई – रयत सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई-२ या संस्थेने आपल्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जपत आज २५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेचे संस्थापक-संचालक श्री. शिवाजीराव बापूसाहेब माटेकर यांनी सन २००२ मध्ये गोरगरीब जनतेची आर्थिक अडचण दूर व्हावी आणि सावकारीच्या जाचक व्याजातून त्यांची मुक्तता व्हावी या उद्देशाने या पतसंस्थेची स्थापना केली.

स्थापनेपासूनच सर्वसामान्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली ही संस्था आज भक्कम आर्थिक प्रगती करत असून सन २०२६ अखेर संस्थेचा व्यवसाय तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, रौप्यमहोत्सवी वर्षात संस्था २५ कोटींच्या व्यवसायाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

या विशेष वर्षानिमित्त संस्थेने आपल्या सभासदांसाठी आकर्षक मुदत ठेव (FD) योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३७ महिन्यांच्या कालावधीसाठी ११% इतका आकर्षक व्याजदर देण्यात येत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसह जास्त परतावा मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही प्रगती साध्य झाली असून, आगामी काळातही सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

तरी सर्व सभासद व हितचिंतकांनी या रौप्यमहोत्सवी विशेष ठेव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.या योजनेबाबत अधिक माहिती, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी सभासदांनी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी –

मुख्य कार्यालय (धोबीतलाव): ८३६९३४४८५८

पवई शाखा: ७०२१६९०९६१

सानपाडा शाखा: ९३७२४२७२३६

बुधवार, १ एप्रिल, २०२६

“गोवा मुक्ती संग्रामातील शिलेदार हरपला… कुंभारगावचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक गणपत गुरव यांचे निधन”


कुंभारगाव (ता. पाटण) येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी शिलेदार श्री. गणपत विष्णू गुरव यांचे दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंभारगावसह संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, स्वातंत्र्यलढ्यातील एक जिवंत इतिहास आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

स्वातंत्र्य, न्याय आणि देशभक्ती यांसाठी आयुष्य झिजवणारे गणपत गुरव हे पाटण तालुक्यातील एकमेव जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात होते. विशेषतः गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य होते. त्यांच्या धाडस, त्याग आणि राष्ट्रप्रेमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. अनंत गुरव, मंडळ अधिकारी श्री. मुल्ला, तलाठी श्री. गायकवाड तसेच कुंभारगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा श्री. संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), सून सौ. वैशाली गुरव (ग्रामपंचायत सदस्य), दोन मुली, तसेच नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वैकुंठधाम, कुंभारगाव येथे होणार आहे.

गणपत गुरव यांचे आयुष्य म्हणजे देशसेवेचा दीपस्तंभच… त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.

शेतात झाडाच्या फांद्या तोडताना लागला विजेचा धक्का; उमरकांचनच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

पाटण तालुक्यातील जिंती - उमरकांचन गावावर दुःखाचे सावट पसरवणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. शेतातील झाडाच्या फांद्या तोडत असताना विजेचा तीव्र धक्का बसून आनंदा विष्णू मोहिते (वय ५६) या कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा मोहिते हे आपल्या पानंदिवली शिवारातील शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. शेतातील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम ते करत होते.करंजीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक एक फांदी तुटून जवळून गेलेल्या ३३ केव्ही वीजवाहक तारांमध्ये अडकली. क्षणार्धात जोरदार विद्युतप्रवाह त्या फांदीतून त्यांच्या शरीरात उतरला आणि त्यांना भीषण शॉक बसला.

घटना इतकी अचानक आणि भीषण होती की, त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले. कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेला माणूस अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती दादाराम मोहिते यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण, तसेच धीरज मुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतदेह पुढील तपासणीसाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. पी. दोडके पुढील तपास करत आहेत.

शेतात काम करताना विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर राखणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही दुर्दैवी घटना आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा उघड्या वीजवाहक तारांबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बुधवार, २५ मार्च, २०२६

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

 

📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६

तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली.

स्थानिकांमध्ये अशी चर्चा सुरू होती की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.

परिणामी, तळमावलेत विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंप कर्मचाऱ्यांनाही ताणाचा सामना करावा लागला.पेट्रोल पंप धारकांनाही याबाबत आगाऊ सूचना मिळाली नसून तेल पुरवठा व्यवस्थित सुरू आहे.पण अफवा पसरल्यामुळे नागरिक विनाकारण पंपावर तेल भरण्यासाठी गर्दी करत आहे,असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण देताना पुरवठा विभाग पाटणचे अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खरोडे यांनी स्पष्ट केले की,
“तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”

तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केली की, अनावश्यक घाई किंवा साठेबाजी टाळावी आणि परिस्थिती शांत ठेवण्यास सहकार्य करावे.

सद्यस्थितीत कोणतीही इंधन टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. अफवांमुळे निर्माण होणारी घबराट टाळणे हीच खरी जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शनिवार, २१ मार्च, २०२६

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि कोणाचा ‘गेम’ वाजणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगत असतानाच अखेर २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

सुरुवातीला सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. मात्र शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्व गणिते कोलमडली आणि भाजपने अनपेक्षितरीत्या बाजी मारत जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलवले.

या निवडीत भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांना जबर धक्का बसला आहे.

दरम्यान, या विजयाचा आनंद तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

या वेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष मा. गणेशजी यादव, बनपुरी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बाबा मोकाशी, कामगार मोर्चा अध्यक्ष ओमकार माने, सरचिटणीस संतोष देसाई, दिव्यांग आघाडी अध्यक्ष गणेश पाटील, धनाजी मोहिते, दरबार हॉटेलचे मालक महेंद्र कांबळे, भगवान माने तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निकालामुळे सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असून पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, २० मार्च, २०२६

ढेबेवाडी - श्री नाईकबा यात्रा २०२६ : प्रशासनाचा यात्रा तयारीचा आढावा पूर्ण.

 

ढेबेवाडी, ता. 20 : श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

आज प्रांताधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली असून यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविताना हयगय अजिबात सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा देण्यात आला.

येत्या २३ मार्च रोजी नैवेद्य तर २४ मार्च रोजी पालखी सोहळा होणार असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


 बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना

  • धोकादायक वीजवाहिन्या व केबल्सचा तातडीने सर्व्हे करून दुरुस्ती
  • वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस व आरटीओ यांचा समन्वय
  • पुरेसा पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा
  • पार्किंगची सुयोग्य व्यवस्था
  • पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासणी
  • आरोग्य पथके व औषध साठा सज्ज ठेवणे
  • बेकायदा दारू विक्रीवर कठोर कारवाई
  • स्वयंसेवकांची विशेष टीम नियुक्त
  • मंदिर परिसरात कंट्रोल रूम उभारणे
  • गर्दीत बैलांना प्रवेश न देण्याचे निर्देश
  • अग्निशमन यंत्रणा व अँब्युलन्स सेवा तैनात
  • महिंद धरणातून योग्य वेळी पाणी सोडण्याचे नियोजन

या बैठकीस प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, उपअभियंता गिरीश सावंत, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच सचिन जानुगडे, ट्रस्ट अध्यक्ष विलासराव जानुगडे, ॲड. अविनाश जानुगडे, तसेच ग्रामपंचायत, यात्रा समिती, ट्रस्ट पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेकरूंना मदत व्हावी यासाठी अत्यावश्यक मोबाईल क्रमांकांसह विशेष माहितीपत्रक (डायरी) तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

यंदाची श्री नाईकबा यात्रा अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम या...