मंगळवार, १० मार्च, २०२६

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त ३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप; कुंभारगाव विभागात स्तुत्य उपक्रम.


पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त गरजू कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. समाजातील गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री, पाटण तालुक्याचे भाग्यविधाते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब देसाई साहेब यांच्या जयंतीनिमित्त कुंभारगाव विभागातील सुमारे ३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये साखर, आटा, मीठ, डाळ, तेल, तिखट, गरम मसाला, तांदूळ, चहा पावडर, हळद, टूथपेस्ट, पार्ले बिस्कीट पुडा आदी दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.

या कार्यक्रमास बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. डॉ. दिलीपराव चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, संचालक व दैनिक कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव चव्हाण, वसंत पतंगे, अनवर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी   डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी सेवा हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे मत व्यक्त केले. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुंभारगाव–मान्याचीवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव श्वान ठार – नागरिकांमध्ये भीतीचे सावट, वनविभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी.


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज 

पाटण तालुक्यातील कुंभारगाव – मान्याचीवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढत असल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. मान्याचीवाडी येथील रहिवासी श्री. संतोष केशव माने यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने माने यांच्या घराजवळ दबा धरून त्यांच्या पाळीव श्वानावर अचानक झडप घातली. त्यानंतर श्वानाला ओढत नेऊन घराच्या मागील बाजूस असलेल्या श्री. बाळकृष्ण आनंदा मोरे यांच्या शिवारात फरफटत नेले. काही वेळानंतर त्या ठिकाणी श्वानाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आला, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कुंभारगाव – गलमेवाडी रस्त्यावर दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. या घटनेमुळे या सर्व नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबट्याची हालचाल मानवी वस्तीजवळ वाढत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.

सध्या या घटनेमुळे मान्याचीवाडी, कुंभारगाव व आसपासच्या परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.


रविवार, ८ मार्च, २०२६

*कलेक्टर संतोष पाटील यांनी केला संदीप डाकवे यांचा सन्मान*


तळमावले/वार्ताहर
सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या प्रचार आणि प्रसिध्दीसाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून जनजागृती केल्याबद्दल शाल, श्रीफळ, रोप देवून जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी हा सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी पाटील यांच्यासमवेत यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार अनंत गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी सुप्रसिध्द चित्रकार संदीप डाकवे यांनी व्यंगचित्रे रेखाटली होती. व्यंगचित्रातून जनजागृती हा संपूर्ण सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याने राबवलेला एकमेव प्रयोग असल्याचे गौरवोद्गार संतोष पाटील यांनी काढले. कार्यक्रमस्थळी संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे बॅनरदेखील लावले होते. 
दरम्यान, संदीप डाकवे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नावात रेखाटलेला अक्षरगणेशा भेट दिला. या सरप्राईज भेटीमुळे कलेक्टर साहेब खुश झाले. त्यांनी अभियानाच्या प्रचार आणि प्रसिध्दी साठी रेखाटलेल्या व्यंगचित्रे आणि संदीप डाकवे यांच्या कला कौशल्याचेही कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शनिवार, ७ मार्च, २०२६

महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.


महाराष्ट्र नगर, मानखुर्द (मुंबई) येथे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिक, तरुण कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर आणि शिवभक्तांनी शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारे भाषण, शिवगर्जना आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


परिसरातील नागरिक, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरीत्या पार पाडले. शिवरायांच्या विचारांची प्रेरणा समाजात रुजावी आणि युवकांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, नागरिक आणि उपस्थित शिवभक्तांचे शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे मनापासून आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन करून समाजात एकात्मता आणि शिवरायांप्रती अभिमानाची भावना जागृत ठेवण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

तळमावळे - ग्रामीण जनतेच्या अडचणींना दिलासा! तळमावळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.


पाटण तालुक्यातील तळमावळे मंडळ विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी या शिबिराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल व विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा. जिल्हाधिकारी सातारा श्री. संतोष पाटील, मा. उपविभागीय अधिकारी श्री. सोपान टोम्पे, मा. तहसीलदार श्री. अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती सदस्य श्री. सचिन यादव, श्री. पंजाबराव देसाई, बाजार समिती उपसभापती श्री. विलास गोडांबे, श्री.तानाजी चाळके,महिला आघाडी नेत्या सौ. कविता कचरे, भाजप तालुकाध्यक्ष श्री. गणेश यादव, निर्मलग्राम मान्याचीवाडीचे सरपंच श्री. रवींद्र माने,श्री,मारुती मोळावडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समाधान शिबिरामध्ये महसूल व इतर शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी कलम १५५ अंतर्गत ७/१२ दुरुस्ती, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रलंबित व नवीन वारस नोंदी, ‘अ.पा.क’ व ‘ए.कु.म्या.’ शेरा कमी करणे, राजपत्राद्वारे उताऱ्यावर नावात बदल, आग्रिस्टाक योजना, नोंदणीकृत व्यवहारांची नोंद, ७/१२ वरील धारणा प्रकारातील भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर आदी महत्त्वाच्या बाबींची सोय शिबिरात करण्यात आली.

तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वाटप, प्रलंबित फेरफार मंजूर करणे तसेच पानंद रस्त्यांच्या नोंद केलेल्या नकाशांचे वितरण अशी विविध कामेही या शिबिरात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची कार्यालयीन धावपळ कमी होऊन एकाच ठिकाणी अनेक कामे पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान शिबिरे ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. सातारा जिल्ह्यातील तसेच पाटण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, आपल्या प्रलंबित महसुली व शासकीय कामांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

गुरुवार, ५ मार्च, २०२६

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी रेखाटले महाराजस्व अभियानाचे पोस्टर.

तळमावले/वार्ताहर शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होत असून हे अभियान शनिवार दि.7 मार्च, 2026 रोजी ढेबेवाडी, कुठरे, तळमावले या ठिकाणी होत आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटणचे तहसिलदार अनंत गुरव यांचे मार्गदर्शन आणि संकल्पनेनुसार तालुक्यातील अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्याकडून पोस्टर रेखाटून घेतले आहे. या पोस्टरमधील अक्षरे आणि छोटे लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या चित्राचे तहसिलदार अनंत गुरव यांनी कौतुक केले आहे. या समाधान शिबीरात प्रलंबित फेरफार काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, लोकसेवा कायद्यानुसार सेवा, महसुल सुधारणाबाबत मार्गदर्शन, डिजिटल 7/12 जनजागृती, म.ज.न.संहिता 1966 मधील बदल इ.सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय पाटण, मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकरी व इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असलेले अक्षरगणेशाकार संदीप डाकवे हे चांगले लिखाण ही करतात. त्यांनी शासनाच्या विविध योजनांवर विपुल लेखन केले आहे. यामध्ये महात्मा गांधी तंटाममुक्ती अभियान, बचत गट, जलयुक्त शिवार अभियान, लेक वाचवा, कृषी योजना, व्यसनमुक्ती इ.विविध अभियानावर लेखन केले आहे. केवळ लेखन न करता त्याला आपल्या कलात्मक संकल्पनेतून चांगली प्रसिध्दीही दिली आहे. यासाठी त्यांनी पोस्टर प्रकाशन, प्रसिध्द बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, हस्तलिखित, व्यंगचित्रे इ.गोष्टींचा खुबीने वापर केला आहे. संदीप डाकवे यांनी जलयुक्त शिवार अभियानावर लिहलेल्या लेखांचे पुस्तक तत्कालिन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, आ.शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व अन्य मान्यवर यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना सातत्याने लोकापंर्यंत प्रभावीपणे पोहवण्याचे काम करत असलेल्या अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्या या अभिनव पोस्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर लिखाण : स्वच्छ सर्वेक्षण लीग 2026 या विषयावर पत्रकार संदीप डाकवे सध्या लेखन करीत आहेत. यंदा या अभियानाला व्यापक प्रसिध्दी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या लेखमालेचे आतापर्यंत 30 भाग प्रसिध्द झाले असून या लेखमालेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" : ७ मार्चपासून पाटण तालुक्यात भव्य प्रारंभ!


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज पाटण - 

पाटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यभर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ पासून होत आहे.

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढणे, नवीन तरतुदींची जनजागृती करणे आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी केले आहे.


 पाटण तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

१️⃣ शनिवार, ७ मार्च २०२६ – ढेबेवाडी, कुठरे, तळमावले
२️⃣ शनिवार, १४ मार्च २०२६ – मल्हारपेठ, मारूल हवेली, चाफळ
३️⃣ शुक्रवार, १० एप्रिल २०२६ – म्हावशी,आवरडे तारळे

४️⃣ शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ – येराड, हेळवाक, मोरगिरी, मरळी,

५️⃣ शुक्रवार, ८ मे २०२६ – पाटण (नगरपरिषद हद्द)


६️⃣ शुक्रवार, १५ मे २०२६ – पाटण (ग्रामीण)


 शिबिरामध्ये उपलब्ध सेवा

🔹 प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे
🔹 अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क
🔹 लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा
🔹 अकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शन
🔹 भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे अद्ययावत करणे
🔹 Ease of Doing Business सुधारणा व नगरी सुविधा
🔹 ई-मोजणी सेवा
🔹 अॅग्रीस्टॅक नोंदणी
🔹 पी.एम. किसान योजना सेवा
🔹 तक्रार निवारण सेवा

 विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

✔ रहिवासी दाखला

✔ उत्पन्न दाखला

✔ जात दाखला

✔ इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे

✔ लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा

या शिबिरामध्ये महसूल विषयक सेवांसोबतच शैक्षणिक दाखले (उदा. रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात दाखला इ.) काढण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेच्या वेळी होणारी धावपळ आता थांबणार आहे.

कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक कारणांसाठी आवश्यक असलेले दाखले आता आपल्या गावातच, एका दिवसात मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



 अभियानाचे उद्दिष्ट

✔ महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांना Single Day Service Delivery
✔ महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी
✔ डिजिटल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करणे
✔ नागरिकांना शासन सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे


प्रशासनाचे आवाहन

“तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या शिबिरात सहभागी होऊन आपल्या महसूल विषयक समस्या त्वरित सोडवून घ्याव्यात,” असे प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्व प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून पाटण तालुक्यातील जनतेसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे आणि शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त ३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप; कुंभारगाव विभागात स्तुत्य उपक्रम.

पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त गरजू कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्य...