रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

कराड : सातारा जिल्ह्यातील कराडलगतच्या मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा मोठा पर्दाफाश झाला असून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत तिघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई कराड पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


🔎 कसा लागला मागोवा?

सध्या देशभर बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविषयी मोठी चर्चा सुरू असताना कराड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मुंढे येथील सह्याद्री रेसिडेन्सी या इमारतीत काही संशयित परदेशी नागरिक राहत आहेत.

पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी पथकासह तात्काळ धाड टाकली. चौकशीत बिलाल सलालउद्दीन मोल्ला याच्यासह तिघे जण गेल्या सहा महिन्यांपासून येथे राहत असल्याचे उघड झाले.


📌 मुंबईतून बनावट आधारकार्ड तयार

कसून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
या घुसखोरांनी मुंबईत बनावट पत्त्याचे आधारकार्ड तयार करून घेतल्याची कबुली दिली. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.

अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे:

  • बिलाल सलालउद्दीन मोल्ला
  • आयेशा अदिल शेख
  • नसरिन अब्दुलसालाय मोल्ला

(सर्व मूळ रहिवासी – बांगलादेश)


⚖️ आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा

या बांगलादेशी नागरिकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा करण बापू कांबळे (वय 29) याच्यावरही कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीररित्या देशात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


🚔 कराड पोलिसांची सतर्कता कौतुकास्पद

या कारवाईमुळे कराड शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

घणसोलीचा दमदार आवाज महानगरपालिकेत !श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीवर निवड.


नवी मुंबई : 

घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे युवा व अभ्यासू नगरसेवक श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती पदी निवड झाल्याने घणसोली परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्यांना सुलभ करण्यासाठी कार्य करणाऱ्या या महत्त्वपूर्ण समितीवर शिंदे यांची नियुक्ती ही त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि लोकाभिमुख भूमिकेची पावती मानली जात आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णालये व दवाखान्यांच्या सुविधा सुधारणा, औषधसाठा, स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी यांसारख्या जबाबदाऱ्या या समितीमार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.

श्री. सौरभ शिंदे यांनी यापूर्वीही घणसोली परिसरात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या निवडीमुळे प्रभाग ९ मधील आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

यावेळी बोलताना श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे म्हणाले की “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांना उत्तम आणि सुलभ आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न करेन,” 



घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली (प्रभाग क्रमांक ९) मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सौ. वैशालीताई सुनील मस्कर यांची च्या महिला व बालकल्याण समिती सदस्य पदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घणसोलीकरांनी दाखवलेला विश्वास आणि भरघोस मतांनी दिलेला कौल यामुळे वैशालीताईंना नगरसेविका पदाची जबाबदारी मिळाली होती. आता महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने घणसोली प्रभागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

यावेळी बोलताना सौ. वैशालीताई सुनील मस्कर म्हणाल्या की,“घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. प्रभागातील महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. महिला सक्षमीकरण, बालकांच्या आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, तसेच मूलभूत सोयीसुविधांच्या उभारणीवर माझा विशेष भर राहील.”

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून परिसरातील अंगणवाडी सुविधा, आरोग्य सेवा, पोषण आहार योजना, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

घणसोली प्रभागातील पाणी, रस्ते, गटारे, स्वच्छता, उद्याने आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही ठोस भूमिका घेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

घणसोलीच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सौ. वैशालीताई मस्कर यांच्या या निवडीमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये महिला नेतृत्वाची नवी ताकद निर्माण झाली असून, आगामी काळात विकासकामांचा वेग अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा मुंबई येथे गौरव माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत राज्यात अव्वल राज्यपाल उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते एक कोटीचा पुरस्कार

ढेबेवाडी: वार्ताहर 
माझी वसुंधरा अभियान ४.०  स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा शनिवारी मुंबई येथील कार्यक्रमात गौरव करण्यात आला.   महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत ,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज आदिंच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र माने, सदस्य दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, पोलीस पाटील विकास माने, अधिकराव माने, इंदुमती माने, सुरेखा माने, पवणजीत माने, रमेश गुंजाळकर आदिंनी हा पुरस्कार स्वीकारला.  
  राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.  
मान्याची वाडी ग्रामपंचायतीने या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून हॅट्रिक केली आहे. 
     ही स्पर्धा ग्रामीण आणि शहरी विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचतत्त्वावर या स्पर्धेचे मूल्यांकन केले जाते.  यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाची पाहणी करण्यात येते. सन 2023 -24 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव परिसरामध्ये केलेले वृक्षारोपण  त्याचबरोबर जुन्या झाडांचे संगोपन, रूप टॉप वॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरणीय दृष्ट्या प्रबोधन आणि जनजागृती, अपारंपारिक ऊर्जा, बायोगॅस, सौर पंप, सौर ऊर्जा त्याचबरोबर ई- वेहिकल, ई- चार्जिंग सेंटर, कंपोस्ट खत, ओला कचरा, सुका कचरा यावरती प्रक्रिया आदी बाबींवर मूल्यांकन केले जाते.
    या ग्रामपंचायतीने अपारंपारिक ऊर्जा विकास मध्ये काम करताना महाराष्ट्रातले पहिले सौर ग्राम म्हणून बहुमान मिळवला आहे. माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये मान्याचीवाडीने सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून एक कोटी रुपयांच्या पुरस्कारासह या स्पर्धेत हॅट्रिक मिळवली आहे.  या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,  जिल्हाधिकारी संतोष पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी सरिता पवार आदिंनी अभिनंदन केले.

ना. शंभूराज देसाई यांच्याकडून मंद्रूळकोळे गटात परफेक्ट नियोजन करत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम.

ढेबेवाडी प्रतिनिधी मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निवडणुकीत राज्याचे पर्यटन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मतदार संघात येऊन दिलेल्या शब्दाप्रमाणे या मतदार संघात बारकाईने लक्ष ठेवत एकाच फटक्यात राजकीय पटावरची सारी समीकरणे उलथवून टाकली. प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई म्हणून भावनिक हाक देणाऱ्या विरोधकांचा सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन ना. शंभूराज देसाई यांनी परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम केला. अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. ढेबेवाडी विभाग देसाई गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखा जातो, ही निवडणूक फक्त निवडणूक नव्हती, तर वर्चस्वाची निर्णायक लढत होती. निवडणूक लागल्या नंतर या विभागात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ना. शंभूराज देसाई यांनी मंद्रूळकोळे गटाकडे माझे विशेष लक्ष असणार हे अधोरेखित करून सांगतो असे सांगितले होते. यानुसार या लढतीत ना. देसाई यांनी विरोधकांचा ‘गेम ओव्हर’ करत विरोधकांचे कांडके पाडले. याची चांगलीच चर्चा सुरू आहे. या लढतीत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सभापती सत्यजित पाटणकर, ना. नरेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील तसेच ज्येष्ठ नेते माजी शेती सभापती हिंदूराव पाटील यांच्यासह स्थानिक पातळीवरील सगळी आघाडी धुळीस मिळाली. विरोधकांनी एकत्र येत ताकद आजमावली; पण देसाई यांच्या नियोजनबद्ध डावपेचांपुढे ती सारी ताकद निष्प्रभ ठरली. या विजयाने एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली कोट्यावधी रुपयांचा झालेला विकास हे सर्वात महत्वाचे भांडवल ठरले. ढेबेवाडी परिसरात असणारे अनेक प्रश्न - अतिवृष्टी, महापुरांचा तडाखा, जंगली जनावरांचा उपद्रव, कोरोना महामारीची झळ अशी अनेक संकटे यावेळी त्याच्यावर मार्ग काढणे लोकांना मदत करणे त्यांची कामे हिरहिरीने सोडविणे हे काम ना. देसाई यांनी तळमळीने केले यामुळे त्यांची सर्वसामान्य लोकांशी नाळ जुळली आहे. या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पालकमंत्री म्हणून देसाई यांनी प्राधान्याने केले. रस्ते, पाणी, वीज, पुनर्वसन, शासकीय मदत—प्रत्येक बाबतीत ढेबेवाडी मतदारसंघाला झुकते माप देत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. म्हणूनच येथील मतदार कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आदेश मानून मतांचे दान देसाई यांच्या पारड्यात टाकतात. पाटण तालुक्यात निवडणूक कोणतीही असो—देसाई यांच्या बैठकीत एकदा ठरले की ठरले! यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा कंडका पाडायचाच, असा ‘शंभू राज’ांचा हुकूम झाला आणि कार्यकर्ते झोकून देऊन कामाला लागले. देसाई गटाचे वैशिष्ट्य म्हणजे नेता ते कार्यकर्ता असा थेट संवाद. शेताच्या बांधावरून असो वा शासकीय कार्यालयातून—सामान्य माणूस थेट मंत्र्यांशी संवाद साधतो. त्यामुळे कामे त्वरित होतात आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश कायम राहतो. मंद्रुळकोळे गटात विधानसभेला देसाई यांना नेहमी आघाडी मिळते; ग्रामपंचायत निवडणुकीतही गटाचे वर्चस्व असते. मात्र जि.प. आणि पं.स. निवडणुकांत याआधी पाटणकर गटाला यश मिळाले होते. हाच धोका ओळखून देसाई यांनी आधीच चंग बांधला—“यंदा हा गड काबीज करायचाच!” निवडणुकीपूर्वीच त्यांनी पावले उचलत सणबूर येथील पाटणकर गटाच्या बड्या कार्यकर्त्याला गळाला लावले. सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदिप जाधव यांच्यासह तब्बल चारशे कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला. पारंपरिक पाटणकर गड मानल्या जाणाऱ्या सणबूरमध्ये ही मुसंडी निर्णायक ठरली. संदिप जाधव अंतर्गत कुरघोडीचे बळी ठरत होते, क्षमता असूनही त्यांना दुय्यम वागणूक मिळत होती. हीच संधी ओळखत देसाई यांचे सुपुत्र व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी त्यांना आपल्या कवेत घेतले. जाधव यांच्या पत्नी संपदा जाधव यांना उमेदवारी देत अचूक डाव साधला. परिणामी शिवसेनेच्या जि.प. उमेदवार मृणाल पाटील यांना सणबूर गणातून उच्चांकी मताधिक्य मिळाले आणि भाजपच्या डॉ. प्राची पाटील यांना अखेरपर्यंत लढूनही पराभव पत्करावा लागला. अवघ्या बावीस वर्षांच्या मृणालकडून झालेला हा पराभव विरोधकांसाठी जबर धक्का ठरला. दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांनी पुत्र नितीन पाटील यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र ऐनवेळी उमेदवारी बदलत देसाई यांनी मुंबईत कार्यरत नितीन काळे यांना संधी दिली. मालदन व परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये प्लसिंगची आखणी करून त्यांनी संपूर्ण गण फिरवला आणि नितीन पाटील यांचा पराभव घडवून आणला. ही खेळी गेमचेंजर ठरली. या संपूर्ण रणनितीमागे युवा नेते यशराज देसाई यांची सूक्ष्म आखणी होती. माजी जि.प. सदस्य विजय पवार व माजी पं.स. सदस्य संतोष गिरी यांच्यावर गुप्त जबाबदारी सोपवून गटाची सखोल छाननी करण्यात आली. जनतेच्या मनाचा अचूक वेध घेत उमेदवारी निश्चित करण्यात आली. परिणामी माथाडी सारख्या बलाढ्य शक्तीचाही पराभव शक्य झाला. दरम्यान, पालकमंत्री देसाई यांच्यावर गणेश नाईक, जयकुमार गोरे, चित्रा वाघ तसेच स्थानिक नेत्यांनी सडकून टीका केली. मात्र देसाई यांनी संयम ढळू दिला नाही. प्रतिटिप्पणी न करता त्यांनी फक्त विकासाकडे जनतेचे लक्ष वेधले. “विकासावर निवडणूक जिंकू शकतो,” हा आत्मविश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला. शेवटी निकाल लागला—आणि भाजपला चारी मुंड्या चित करत देसाई गटाने मंद्रुळकोळेवर झेंडा रोवला. आश्वासनांपेक्षा शाश्वत विकासाला मतदारांनी पसंती दिली. “मी जे बोललो तेच करून दाखवले,” हा संदेश संपूर्ण जिल्ह्यात गेला. मंद्रुळकोळेचा गड हा देसाई गटाचा अभेद्य बालेकिल्ला आहे, हे या विजयाने ठसठशीतपणे सिद्ध झाले.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

धामणी - वसंतगड ते चव्हाणवाडी: शिवज्योतीच्या तेजात दुमदुमला परिसर! इतिहासाचा अभिमान, समाजकार्याची शपथ आणि विज्ञानाची झेप — अविस्मरणीय शिवजयंती सोहळा!

धामणी -  वसंतगड ते चव्हाणवाडी: शिवज्योतीच्या तेजात दुमदुमला परिसर! इतिहासाचा अभिमान, समाजकार्याची शपथ आणि विज्ञानाची झेप — अविस्मरणीय शिवजयंती सोहळा! 

चव्हाणवाडी (धामणी) येथे यंदाची शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक वारसा, सामाजिक बांधिलकी आणि आधुनिक विज्ञानाची जोड देत हा सोहळा परिसरासाठी आदर्शवत ठरला.

किल्ले वसंतगड येथून   शिवज्योत प्रज्वलित करून चव्हाणवाडीपर्यंत आणली ,तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत इतिहासाच्या सुवर्णक्षणांची उजळणी केली.

कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धा आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम. या निमित्ताने शिवशक्ती वाचनालय आणि पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला चालना देण्याचा तसेच नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला.

महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी एकोपा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी शिवचरित्रावर भाष्य करत युवकांना इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी पाणी या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. पाणीटंचाईसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट उपस्थितांनी लक्षपूर्वक पाहिला.

कार्यक्रमात विज्ञानाची जोड देत टेलिस्कोपच्या माध्यमातून आकाशगंगा दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच व्ही.आर. सेटच्या सहाय्याने सौरमालेचे थरारक दर्शन घडवण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना अवकाशविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्णसंधी लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिवभक्तांसाठी महाभोजनाचे आयोजन करण्यात आले.शेकडो नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश दिला.

इतिहासाची प्रेरणा, समाजसेवेची भावना, सांस्कृतिक जतन आणि विज्ञानाची सांगड घालत चव्हाणवाडी (धामणी) येथील हा शिवजयंती सोहळा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. ग्रामस्थांची एकजूट आणि कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शिवशक्ती मित्र मंडळ, चव्हाणवाडी (धामणी) यांच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. 

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

सलग तिसऱ्यांदा राज्यात नंबर वन! मान्याचीवाडीचा पर्यावरणात दबदबा कायम / एक कोटींचे बक्षीस जाहीर.

 सलग तिसऱ्यांदा राज्यात नंबर वन! मान्याचीवाडीचा पर्यावरणात दबदबा कायम / एक कोटींचे बक्षीस जाहीर.

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनात राज्यात सलग तिसऱ्यांदा अव्वल ठरून हॅट्‌ट्रिक नोंदवली आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत ग्रामपंचायतीने एक कोटी रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह आपल्या नावावर केले. ही आनंदवार्ता समजताच गावकऱ्यांनी सकाळी एकत्र येत  जल्लोष साजरा केला.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पंचतत्त्वांच्या आधारे मूल्यमापन केले जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या घटकांवर आधारित कामांची पाहणी करून गुणांकन केले जाते. मान्याचीवाडीने २०२३-२४ या वर्षात केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे राज्यात अव्वल स्थान मिळवले.


🌱 पर्यावरणपूरक उपक्रमांची भक्कम पायाभरणी

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांमध्ये —

  • मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जुन्या वृक्षांचे संगोपन
  • रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची अंमलबजावणी
  • पर्यावरण जनजागृती आणि प्रबोधन मोहिमा
  • बायोगॅस प्रकल्प, सौरपंप, सौरऊर्जा वापर
  • ई-वाहने आणि ई-चार्जिंग सेंटरची सुविधा
  • ओला व सुका कचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती

या सर्व उपक्रमांमुळे गावाने शाश्वत विकासाचा आदर्श उभा केला आहे.

विशेष म्हणजे, अपारंपरिक ऊर्जा विकासात भरीव कामगिरी करत महाराष्ट्रातील पहिले ‘सौरग्राम’ म्हणूनही मान्याचीवाडीने बहुमान मिळवला आहे.


🎉 गावकऱ्यांचा जल्लोष, मान्यवरांचे अभिनंदन

या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई तसेच गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.

मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवार, दि. २१ रोजी मुंबई येथे भव्य सन्मान सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक यशामुळे पाटण तालुक्याचा नावलौकिक राज्यभर उजळला असून, पर्यावरण संवर्धनात ग्रामीण भागही कशी क्रांती घडवू शकतो याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.



🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨 कराड : सातारा जिल्ह्यातील कराडल...