सलग तिसऱ्यांदा राज्यात नंबर वन! मान्याचीवाडीचा पर्यावरणात दबदबा कायम / एक कोटींचे बक्षीस जाहीर.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनात राज्यात सलग तिसऱ्यांदा अव्वल ठरून हॅट्ट्रिक नोंदवली आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत ग्रामपंचायतीने एक कोटी रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह आपल्या नावावर केले. ही आनंदवार्ता समजताच गावकऱ्यांनी सकाळी एकत्र येत जल्लोष साजरा केला.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पंचतत्त्वांच्या आधारे मूल्यमापन केले जाते. पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश या घटकांवर आधारित कामांची पाहणी करून गुणांकन केले जाते. मान्याचीवाडीने २०२३-२४ या वर्षात केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे राज्यात अव्वल स्थान मिळवले.
🌱 पर्यावरणपूरक उपक्रमांची भक्कम पायाभरणी
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांमध्ये —
- मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जुन्या वृक्षांचे संगोपन
- रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची अंमलबजावणी
- पर्यावरण जनजागृती आणि प्रबोधन मोहिमा
- बायोगॅस प्रकल्प, सौरपंप, सौरऊर्जा वापर
- ई-वाहने आणि ई-चार्जिंग सेंटरची सुविधा
- ओला व सुका कचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती
या सर्व उपक्रमांमुळे गावाने शाश्वत विकासाचा आदर्श उभा केला आहे.
विशेष म्हणजे, अपारंपरिक ऊर्जा विकासात भरीव कामगिरी करत महाराष्ट्रातील पहिले ‘सौरग्राम’ म्हणूनही मान्याचीवाडीने बहुमान मिळवला आहे.
🎉 गावकऱ्यांचा जल्लोष, मान्यवरांचे अभिनंदन
या यशाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई तसेच गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवार, दि. २१ रोजी मुंबई येथे भव्य सन्मान सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक यशामुळे पाटण तालुक्याचा नावलौकिक राज्यभर उजळला असून, पर्यावरण संवर्धनात ग्रामीण भागही कशी क्रांती घडवू शकतो याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

