गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

*“छत्रपती महाराजस्व अभियानाचा धडाका — हजारो महसूल तक्रारींचा झटपट निपटारा”*

सणबुर प्रतिनिधी – महेश जाधव
सणबुर : सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित महसूल प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती महाराजस्व व समाधान अभियान” या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकारामुळे हजारो प्रकरणांचा अल्पावधीत निपटारा होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या अभियानाअंतर्गत फेरफार नोंदी, डिजिटल सातबारा आणि ८-अ उतारे यांसारखी अत्यावश्यक कागदपत्रे थेट नागरिकांच्या हाती देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून, पारदर्शक व जलद सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे.
👉 महत्त्वाची आकडेवारी :
▪️ फेरफार नोंदी : १,३२५ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा
▪️ डिजिटल सातबारा उतारे : १३,२६५ नागरिकांना वितरण
▪️ डिजिटल ८-अ उतारे : १,८७० लाभार्थ्यांना प्रदान
▪️ शासकीय प्रमाणपत्रे : ४३४ प्रमाणपत्रांचे वितरण
या उपक्रमामुळे जमीन नोंदी, वारस हक्क, तसेच तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचल्याने वेळ व पैशाची बचत होत असून, नागरिकांच्या समाधानातही वाढ झाली आहे.
📣 नागरिकांची प्रतिक्रिया :
“सरकारी काम म्हणजे दीर्घ प्रतीक्षा, ही प्रतिमा आता बदलत आहे. एकाच ठिकाणी सातबारा, फेरफार यांसारखी कामे पूर्ण होत असल्याने मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना एका लाभार्थ्याने व्यक्त केली.

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा व ८-अ उताऱ्यांमुळे बँकिंग तसेच इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज उरलेली नाही. यामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
या अभियानाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे (पाटण) आणि तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले की, उर्वरित प्रलंबित प्रकरणेही अशाच मोहिमांद्वारे लवकरच निकाली काढली जातील.
ज्या शेतकरी खातेदारांच्या वारस नोंदी अद्याप प्रलंबित आहेत, त्यांनी तात्काळ ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालय, पाटण येथे संपर्क साधावा. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ७/१२ व ८-अ उतारे घरपोच देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले आहे.
एकूणच, “छत्रपती महाराजस्व अभियान” हे महसूल प्रशासन आणि जनतेमधील दुवा मजबूत करत असून, कार्यक्षम व पारदर्शक प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत आहे

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

“निर्णय बदलायला लावणारा माझा एकमेव मार्गदर्शक हरपला” — स्व. डॉ. दिलीपराव चव्हाणांना ना. शंभूराज देसाईंची भावपूर्ण श्रद्धांजली


कुंभारगाव (दि. २२ एप्रिल २०२६) : कुंभारगावचे सुपुत्र, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक स्वर्गीय डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की. “स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ नेते नव्हते, तर आमचे मार्गदर्शक, आधारवड होते,” असे म्हणत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

देसाई म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रुग्णालयात भेट झाली होती. “अर्धा तास त्यांनी माझ्याशी अगदी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला,” असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला.

राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनच डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, असे सांगत देसाई पुढे म्हणाले, “माझे निर्णय बदलायला लावणारे जर कोणी असतील तर ते फक्त स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण होते. त्यांनी नेहमीच विचारपूर्वक मार्गदर्शन केले आणि गटाच्या हिताचा विचार केला.”

पडत्या काळात खंबीरपणे सोबत उभे राहणारा नेता म्हणून त्यांनी डॉ. चव्हाण यांचे वर्णन केले. “चढत्या काळात अनेक जण सोबत असतात, पण पडत्या काळात खरे सहकारी ओळखू येतात — आणि डॉ. दिलीपराव चव्हाण हे असेच निष्ठावंत सहकारी होते,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

देसाई गटाच्या राजकीय वाटचालीत ढेबेवाडी व कुंभारगाव परिसराची जबाबदारी त्यांनी एकहाती सांभाळली, याची आठवण करून देताना देसाई म्हणाले, “ते म्हणायचे ‘डोंगराच्या अलीकडची काळजी करू नका’, त्यामुळे मी निर्धास्त असायचो. आज तो आधार हरपला आहे.”

या प्रसंगी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजित पाटील चिखलीकर, हिंदुराव पाटील, अॅड. डी.पी. जाधव, कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग नलावडे, विश्वनाथ पानसकर, विजय पवार, चंद्रकांत चाळके, दत्तात्रय चोरगे, संजय देसाई, संतोष मोरे, आनंदराव चव्हाण, राजेंद्र देसाई, देवबा वायचळ, अॅड. जनार्दन बोत्रे, विजय शिबे, विनायक सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वांनी स्व. डॉ. चव्हाण यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी देसाई यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व “या दुःखद प्रसंगी शासन व समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.

एक निष्ठावंत नेता, मार्गदर्शक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत प्रत्येकाच्या मनात होती — आणि अश्रूंतूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

*🚩 मानखुर्दमध्ये २६ एप्रिलला विराट हिंदू संमेलन; एकतेचा एल्गार, हिंदू शक्तीचा प्रचंड जागर 🚩*


मुंबई (मानखुर्द) : हिंदू समाजाने आता संघटित होण्याची वेळ आली आहे, असा ठाम आणि आक्रमक संदेश देत महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे सकल हिंदू समाज आयोजन समितीच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मता या त्रिसूत्रीवर आधारित हे संमेलन २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

महाराष्ट्र नगर परिसरातील महात्मा फुले सोसायटी जवळील न्यू इंग्लिश पब्लिक स्कूल शेजारील मैदानावर होणाऱ्या या संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी याला “हिंदू एकतेचा शक्तीप्रदर्शन सोहळा” असे स्वरूप दिले आहे.

संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, संस्कृतीचे जतन आणि धर्मरक्षण याबाबत जागृती केली जाणार आहे. सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत हिंदू समाजाने संघटित राहणे का गरजेचे आहे, यावरही या संमेलनात ठोस मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

विशेष म्हणजे, या संमेलनासाठी परिसरातील नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “प्रत्येक हिंदू कुटुंबाने या संमेलनात सहभागी होणे ही काळाची गरज आहे,” असा ठाम आग्रह आयोजक समितीने व्यक्त केला आहे.

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरात बॅनर, पोस्टर आणि प्रचार फलकांद्वारे वातावरण तापले असून, हा कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक शक्ती एकवटण्याचा एक मोठा प्रयत्न ठरणार आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

“एकत्र या, संघटित व्हा आणि हिंदू शक्तीचा जागर” — या घोषवाक्यासह होणारे हे संमेलन आगामी काळात मोठा सामाजिक संदेश देणार, यात शंका नाही.

सोमवार, २० एप्रिल, २०२६

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ.


कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव चव्हाण यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटण तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आज सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री , शंभूराजे देसाई साहेब ,यशराज (दादा) देसाई, रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कै. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर देसाई गटाचे खंबीर आधारस्तंभ होते. गट अडचणीत असताना त्यांनी नेहमीच धीर देत योग्य मार्गदर्शन केले.पाटण तालुक्यातील  कुंभारगाव–ढेबेवाडी परिसरात त्यांनी तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत साहेबांचा विचार पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले.

यावेळी पालकमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
"डॉ. चव्हाण हे दिलेल्या शब्दाचे पक्के होते. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची त्यांना अचूक माहिती होती. ते फक्त सहकारी नव्हते, तर माझे डोळे आणि कान होते."

त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय आयुष्यातील अनेक चढ-उतारांत डॉ. चव्हाण यांनी तानाजी मालुसरे यांच्या ढालीप्रमाणे निष्ठेने साथ दिली. त्यांच्या जाण्याने देसाई गटाच्या निष्ठावंत फौजेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

संयमी, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाची ओळख असलेले डॉ. चव्हाण यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिण, भावजय, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

📍 बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांचे रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.


कु.मृणाल पाटील यांची महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी बिनविरोध निवड; मंद्रुळकोळे गटात उत्साहाचे वातावरण.


सातारा : मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या कु. मृणाल महेश पाटील यांची सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराज देसाई साहेब, युवा नेते रविराज देसाई (दादा) तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज दादा देसाई यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कु. मृणाल पाटील या तरुण, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीमुळे महिला व बाल कल्याण क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या आरोग्य, शिक्षण व स्वावलंबनासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील महिलांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी भक्कम आवाज मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. महिलांच्या सबलीकरणासाठी नवीन उपक्रम राबवून विकासाला चालना देण्याचा निर्धारही मृणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून त्यांच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यात ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात उपक्रम”


पाटण : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.अतुल भोसले साहेब यांच्या नेतृत्वात तसेच पाटण तालुक्याचे नेते व राज्य परिषदेचे सदस्य मा.श्री.सत्यजित सिंहपाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व होते. कृष्णा हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत तब्बल ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पाटण दक्षिणचे अध्यक्ष गणेश यादव, साईकडे गावच्या सरपंच सौ. सुवर्णाताई मोरे यांच्यासह स्थानिक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

या उपक्रमामुळे पाटण तालुक्यातील गरजू कुटुंबांना आरोग्य सुरक्षा कवच मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

*मंद्रूळकोळे खुर्द येथे बैलगाडी स्पर्धा उत्साहात.* *संपन्न.गावाने चांगले मैदान घेतल्याबद्दल स्पर्धक व शौकिनांनी धन्यवाद व्यक्त केले.*

ढेबेवाडी प्रतिनिधी 
         मंद्रूळकोळे खुर्द येथे श्री. जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आदी ठिकाणहून 150 गाड्यांची नोंद करण्यात आली होती यामध्ये तळमावले ता.पाटण येथील इशारा व चॉपर या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. येथील शर्यती उत्साहात संपन्न झाल्या या विभागात मंद्रूळकोळे खुर्द गावाने बैलगाडा स्पर्धकाना मैदान उपलब्ध करून देऊन चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल बैलगाडा स्पर्धकांनी व शौकिनांनी गावचे धन्यवाद व्यक्त केले.
         मंद्रूळकोळे खुर्द गावाने जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले होते. शर्यतीचे नेटके नियोजन ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी लांबून आलेल्या स्पर्धकांची गावच्या वतीने चांगली सोय करण्यात आली. या स्पर्धेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, माजी शेती सभापती हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, उद्योजक महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन काळे दादा, पंचायत समिती सदस्या सौ.संपदाताई जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, लोकनेते कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर, आनंदराव पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील, युवा नेते नितीन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पाटील, माजी सरपंच सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
         या स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे बक्षिस शंकरराव पाटील माजी मुख्याध्यापक यांच्याकडून 51000 रुपयांचे ठेवण्यात आले होते, तळमावले येथील फॅन्स क्लब सागर पवार यांचा इशारा व भागवत पाटील डॉ. गौरव कदम ईश्वरपूर यांचा चॉपर या बैलजोडीने मिळविले, द्वितीय क्रमांकाचे 41000 हजार रुपयांचे बक्षीस पंचायत समिती सदस्य नितीन काळे व सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या कडून तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून 31000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते संयुक्त रित्या कु.वैभवी प्रकाश पवार दाढोली यांचा लक्ष्या, पै. राणा देशमुख वाई व प्रदीप नाना कापूसखेड यांचा मुत्या तसेच सावता माळी बनवडी यांचा सुर्या व श्रीकांत पाटील आसिफ भैय्या काले यांचा सर्जा या बैलजोडीनी पटकावले आहे. चौथ्या क्रमांकाचे बक्षिस जिल्हा परिषद सदस्य कु. मृणाल महेश पाटील यांच्याकडून 21000 रुपयांचे ठेवण्यात आले होते हे बक्षिस येरळवेकरांचा आयफोन तानाजी पाटील जिंती यांचा सुंदर यांनी प्राप्त केला. युवा नेते रणजित पाटील यांच्याकडून पाचव्या क्रमांकाचे 11000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते आनंदराव भिसे तारुख यांचा सरदार व मानेगावचा सरदार यांनी प्राप्त केले. सहाव्या क्रमांकाचे बक्षिस तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील यांच्याकडून सात हजार रुपये ठेवण्यात आले होते ते वेदिका संकेत यादव साईकडे यांचा पक्षा, निनाम यांचा बल्ली तसेच संकेत शेठ सुतार सुसगाव साईकडे गुरुकृपा मित्र परिवार कराड यांचा वश्या, महेश जाधव कुरळप यांचा गज्या यांनी प्राप्त केले. यावेळी विजेत्यांनी जल्लोष केला. दरम्यान क्वार्टर सेमी फायनलला प्रथम आलेल्या रमेश भिंगारदेवे, अर्जुन भिंगारदेवे काळगावकर यांच्यासह इतर सेमी धारकांनी गुलाल उधळण करीत जल्लोष केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय लोहार यांनी सर्वांचे स्वागत केले. अमित कापसे यांनी आभार मानले.
    
 चौकट   
    उपसरपंच संजय लोहार यांच्याकडून प्रथम आलेल्या सहा क्रमांकास ढाली देण्यात आल्या तर कॉटर सेमी फायनल मध्ये आलेल्या प्रथम सहा क्रमांकास ॲड ए. पी. पाटील यांच्याकडून 2000 बक्षिस व सन्मान चिन्ह शिवमुद्राचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बबलू पाटील यांच्याकडून देण्यात आले.
      शर्यती यशस्वी करण्यासाठी अमित कापसे, ग्रा. सदस्य बाळासाहेब कदम, पोलिस पाटील विजय लोहार, मा. चेअरमन दादासाहेब साळुंखे, मा. सरपंच सतिश कापसे, शिवमुद्रा संस्थापक शिवाजी यादव, मा. चेअरमन अविनाश साळुंखे, समीर साळुंखे, सदाशिव कदम महाराज, धनाजी भरुगडे, राजू देसाई, राजाभाऊ रोडे, सचिन लोहार, रमेश पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांसह चेतना, दत्तगुरु, हनुमान, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*“छत्रपती महाराजस्व अभियानाचा धडाका — हजारो महसूल तक्रारींचा झटपट निपटारा”*

सणबुर प्रतिनिधी – महेश जाधव सणबुर : सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित महसूल प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “...