साप्ताहिक कुमजाई पर्व सविस्तर बातमी:
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे ३१ मार्च रोजी घडलेल्या घटनेने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
देवरुख पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर यादव आणि आशिष भावके हे दोघे जिवलग मित्र असून नातेवाईकही होते. ते दोघे रत्नागिरी येथे फिरण्यासाठी गेले होते. ‘आरे-वारे’ समुद्रकिनारी त्यांनी जेवण केले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र ३१ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा येथे दोघांमध्ये वाद झाला.
दारू पिण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद अचानक विकोपाला गेला. संतापलेल्या सुधीर यादव याने आशिषच्या गाडीच्या बोनेटवर चढून काच फोडली व वाहनाचे नुकसान केले. यामुळे संतप्त झालेल्या आशिषने गाडी भरधाव वेगाने चालवली. सुधीर खाली पडल्यास त्याचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनही त्याने गाडी न थांबवता पुढेच नेली.
दरम्यान, सुधीर बोनेटवरून खाली पडला आणि काही अंतर फरपटत गेला. यात त्याच्या बरगड्या, पोट आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर अवस्थेत त्याला मदत करण्याऐवजी आशिष घटनास्थळावरून पसार झाला, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.
दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत सुधीर यादव याला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.
परंतु देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून रागाच्या भरात केलेला गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांच्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.