गुरुवार, ९ जुलै, २०२६

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान*

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान* 
जून ते सप्टेंबर हा कालावधी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतो. हा कालावधी पारेषण काळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे आगमन  झाले. त्यामुळे मान्सून कालावधीत हवेत आर्द्रता अधिक असते. पावसाच्या कालावधीत डासांना अंडी घालण्यासाठी साचलेल्या पाण्यांची ठिकाणे, डबकी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. या कालावधीत सर्वत्र डासांचा उच्छाद सुरू असतो. एडिस एजिप्टाय, अॅनाफेलिस, क्युलेक्स या प्रमुख तीन डासांसह इतर डासही मोठ्या प्रमाणावर आढळतात.

 *डासांचे आयुष्य& जीवन क्रम* 

 *अंडी अळी-कोष - डास* 
 हा जीवनक्रम ८ दिवसांचा असतो.
नर डास पाना, फुलांचा रस पितो, मादी डास मनुष्य, जनावरांचे रक्त शोषते.
मादी डासाचे आयुष्य २१ ते २७दिवस, नर डासाचे आयुष्य ५ दिवस असते.
मादी डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालते. हे डास जीवन कालावधीत १ हजार ते २ हजार अंडी घालते.
एडिस एजिप्टाय डासाची मादी साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालते.
अॅनाफेलिस डासाची मादी साचलेल्या पाण्यात (डबकी वगैरे) अंडी घालते.
डास साधारणपणे ४ कि.मी. अंतरापर्यंत हवेतून उडत जाऊ शकतो.
डास १० मीटर उंचीपर्यंत उडतो. विशेष परिस्थितीत तो ४० ते १०० मीटर उंचीपर्यंत उडतो.


 *पट्टेरी एडिस* : तिरकी अॅनाफेलिस

एडिस डास (टायगर मॉस्क्युटो) दिवसा चावतो. या डासांच्या पायावर, शरीरावर पांढरे पट्टे असतात. या डासाची अळी पाण्यात स्प्रिंगप्रमाणे हालचाल करते. या डासाच्या मादीपासून डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका या आजारांचा प्रसार होतो. बाधित रुग्णाला चावलेला हा डास निरोगी माणसाला चावल्यानंतर विषाणूचा प्रसार होतो. मलेरिया अर्थात हिवताप या आजारास अॅनाफेलिस डासाची मादी कारणीभूत आहे. अॅनाफेलिस डास ४५ अंश कोनात (तिरका) बसतो. पावसामुळे नगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभर डासांची घनता वाढू लागली आहे. दिवसा आणि रात्रीही डासांच्या झुंडी दिसून येतात. त्यामुळे आजाराचा धोका वाढला आहे.

 *चिकुनगुनियाही ठरू शकतो घातक* 

चिकुनगुनिया हा आजार विषाणूमुळे होतो. एडिस एजिप्टाय या डासाच्या मादीपासून त्याचा प्रसार होतो. तीव्र स्नायू आणि सांधेदुखीसह अचानक ताप येतो. चिकुनगुनिया तापामुळे काही टक्के रुग्णांमध्ये संधिवात होऊ शकतो. वृद्ध आणि कॉमोरबिड व्यक्तीसाटी घातक ठरू शकतो. विषाणूने दूषित असलेल्या एडिस एजिप्टाय या डासाची मादी चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांत चिकुनगुनियाची सुरुवात होते. सांधे व स्नायूदुखी या प्रमुख लक्षणासह डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि पुरळ ही लक्षणेही असू शकतात. कोणताही उपचार किंवा लस नाही. वेदना, सूज आणि ताप यासारख्या लक्षणापासून मुक्त होण्यासाठीची औषधे दिली जातात. हा आजार १० ते १२ दिवस टिकतो आणि कमी होतो.

 *कोरडा दिवस... तो का पाळायचा?* 

अंड्यापासून डास तयार होण्याचा कालावधी (जीवनचक्र) ८ दिवसांचा आहे. हे जीवनचक्र तोडले तर डासांची उत्पत्ती थांबते. त्यासाठी आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा, असे आवाहन केले जाते. पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून घासून, पुसून कोरडी करणे म्हणजेच ड्राय डे. ड्राय डे पाळल्यास डासांचे जीवनचक्र तुटते. एडिस, एजिप्टाय डासाची अंडी पाणी साठवण्याच्या भांड्याच्या कडेला चिकटलेली असतात. ४ महिने ते वर्षभर ही अंडी त्याच अवस्थेत राहू शकतात. त्यानंतर त्यांना पाणी मिळाले तर त्यांचे जीवनचक्र सुरू होते. त्यामुळे पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासू-पुसून स्वच्छ व कोरडी करणे आवश्यक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव चे
वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव सर, व डॉ. क्षितिजा पाटील मॅडम याच्या 
मार्गदर्शना खाली

 श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे 

 डास आळी प्रात्यक्षिक व गप्पी मासे  दाखण्यात आले श्री देशमुख सर यानी प्रास्ताविक केले  आरोग्य कर्मचारी यानी डेग्यु,चिकनगुण्या,मलेरिया किटक जन्य आजाराबाबत श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे जनजागृती  व उपाय योजना बाबत माहिती सांगण्यात आली  तेव्हा उपस्थित आरोग्य सहाय्यक श्री जाधव राव साहेब, श्री धुमाळ रावसाहेब तसेच आरोग्य सहाय्यिका खाडे सिस्टर, तसेच लॅब टेक्निशियन श्री बंडगर आण्णा तसेच आरोग्य सेवक श्री एस.आर.बोंद्रे, श्री ए. एस.संकपाळ, श्री आर.बी.भोकरे तसेच आरोग्य सेविका एस.डी.कुंभार, तसेच आशा सेविका सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक उपस्थित होते

मंगळवार, २३ जून, २०२६

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई -
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीडा या विभागातून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेची अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये नावीन्यपूर्ण विविध उपक्रम राबवले जातात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे  हे नववे वर्ष आहे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या निमित्ताने करण्यात येतो.

नवी मुंबई या ठिकाणी 15 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 5 वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा सामाजिक निशिगंधा कापडणीस, माधवी सूर्यवंशी ,अर्चना सदरे, नारायण म्हात्रे ,मेघा शिंपी , संध्या माने ,रमेश पाटील, आदित्य मोरे ,शरद निकम उद्योजक विभागातून अनिकेत पोखरकर, नितीन भोसले ,दीपक कोकाटे, संजय पाटील, रुपेश कोलते, ओमकार शिंदे, सचिन पवार क्रीडा विभागातून नमिता पाटील, राहुल पाटील वैद्यकीय सेवा विभागातून विशाल पाटील शिक्षण विभागातून भरत ढेरे कलाक्षेत्रातून नम्रता पाटील, शुभ्रा भोसले साहित्य क्षेत्रातून डॉक्टर सुनिता चव्हाण, सचिन अवघडे, बाळकृष्ण पाटील, संजय नायकवडी, पुनम खंडागळे पत्रकार क्षेत्रातून बबलू पेशकर आदी मान्यवरांचा  गौरव होणार आहे. सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे यांनी यशस्वी उद्योजक मुलाला घडवल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

रविवार, १४ जून, २०२६

*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*


तळमावले/प्रतिनिधी :
माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्ञतेची जोड देत मान्याचीवाडी ( कुंभारगाव ) येथील माने परिवाराने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. विष्णु कृष्णा माने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार' मिळाल्याबद्दल पत्रकार संदीप डाकवे यांचा माने परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

विष्णु कृष्णा माने यांनी आपल्या आयुष्याची ७५ यशस्वी वर्षे पूर्ण केल्याबद्दल माने परिवाराने एका भव्य आणि कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात कला, साहित्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी अखंडपणे झटणाऱ्या संदीप डाकवे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. माने परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. डाकवे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक चळवळीची जोड दिल्याबद्दल परिसरामध्ये माने परिवाराचे कौतुक होत आहे. याप्रसंगी विष्णू माने, जिजाबाई माने, शरद माने, रेश्मा माने, प्रदीप माने व जयश्री माने यांच्यासह मान्याचीवाडीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कृतज्ञतेने भारावलो : संदीप डाकवे
सत्काराला उत्तर देताना संदीप डाकवे भावुक झाले. ते म्हणाले, "विष्णु माने यांच्या अमृतमहोत्सवासारख्या अत्यंत पवित्र आणि कौटुंबिक सोहळ्यात माने परिवाराने माझ्या कार्याची दखल घेतली, हा माझ्यासाठी खूप मोलाचा क्षण आहे. या आपुलकीच्या सन्मानामुळे समाजात आणखी जोमाने कार्य करण्याची मोठी ऊर्जा मला मिळाली आहे."

गुरुवार, ११ जून, २०२६

*२० जूनपासून पाटण मतदारसंघात 'एसआयआर' (SIR) मोहीम; उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांची माहिती.* *मतदारयादी शुद्धीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – प्रांताधिकारी*



केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण, अद्ययावतीकरण व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ जाहीर केला आहे.महाराष्ट्रात या मोहिमेस २० जूनपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नव्या पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २० ते २९ जून या कालावधीत गणना प्रपत्रांची छपाई, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच अन्य पूर्वतयारीची कामे केली जाणार आहेत. ३० जून ते २९ जुलै 2026 या कालावधीत २६१ पाटण विधानसभा मतदारसंघातील ४२४ मतदान केंद्रांवरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप करणार आहेत.

संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने हे प्रपत्र भरून द्यावयाचे असून त्यामधील माहितीच्या आधारे मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे. भरलेली प्रपत्रे पुन्हा बीएलओंकडून संकलित केली जाणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही केले जाणार असून नवीन मतदान केंद्रांची निर्मिती, केंद्रांचे विलीनीकरण तसेच मतदान केंद्रांच्या नावात किंवा ठिकाणात आवश्यक बदल करण्यात येणार आहे.

२९ जुलै 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांच्या आधारे ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा ३ ऑक्टोबरपर्यंत केला जाणार असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एसआयआर मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सन २००२ च्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ९ हजार २२६ मतदारांपैकी २ लाख ७३ हजार ८५४ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून हे प्रमाण ८८.५६ टक्के इतके आहे. मात्र अद्याप ३५ हजार ३७२ मतदारांचे मॅपिंग पूर्ण होणे बाकी असल्याची माहिती टोम्पे यांनी दिली. सन २००२ मध्ये अन्यत्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची जुनी नोंद उपलब्ध न होणे तसेच विवाहानंतर सासरी आलेल्या महिला व नवविवाहितांकडून माहेरच्या मतदार यादीतील नातेवाइकांची माहिती उपलब्ध न होणे, ही मॅपिंग प्रक्रियेतील प्रमुख अडचण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदारयादी शुद्धीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – प्रांताधिकारी सोपान टोम्पे

मतदारयादी शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही त्यांनी तातडीने संबंधित बीएलओंशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच कुटुंबातील मयत, दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. मतदार यादीतील अचूकता वाढविणे आणि लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देणे हा या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश असून, सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे.


मंगळवार, २ जून, २०२६

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*
कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जिद्द यांच्या बळावर मुंबईच्या चार कन्यांनी आसामच्या भूमीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या ३ऱ्या साऊथ आशियाई मर्दानी स्पोर्ट्स स्पर्धा तसेच ६व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देवकर फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब, मुंबई आणि मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई शहर यांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १६ पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मर्दानी स्पोर्ट्स आणि पारंपरिक मर्दानी तसेच कराटे कुमिते आणि कराटे काता अश्या ४ प्रकार मध्ये स्पर्धेत *वैदेही घोलप* हिने २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकत सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी केली. *रिया सिंग* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदकांची कमाई करत आपले कौशल्य सिद्ध केले. *अंजली दुबे* हिने १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले, तर *तृष्णा राऊत* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदके जिंकून स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

मर्दानी स्पोर्ट्स आणि कराटे या दोन्ही प्रकारांमध्ये या विद्यार्थीनींनी दाखवलेली शिस्त, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती विशेष कौतुकास्पद ठरली. देशातील आणि दक्षिण आशियातील विविध राज्ये व देशांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली.

या यशामागे प्रशिक्षक ऋषिकेश देवकर, श्रेयस खेडेकर, गणेश शिखरे आणि वैष्णवी कोकाटे यांचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाचे सचिव संतोष खंदारे तसेच तांत्रिक संचालक केतन आंधळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारे यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

मुंबईच्या या जिद्दी कन्यांनी मिळवलेले यश हे केवळ पदकांपुरते मर्यादित नसून, ते युवा पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे. त्यांची मेहनत, समर्पण आणि चिकाटी अनेक नवोदित खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या यशामुळे मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव अधिक उंचावला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शुक्रवार, २२ मे, २०२६

*-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून* *काळगाव लघु पाटबंधारे तलाव- योजनेला* व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता. पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्य.

-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून* *काळगाव लघु पाटबंधारे तलाव- योजनेला* व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता. पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्य.


 

दौलतनगर दि.22:- पाटण विधानसभा मतदारसंघातील काळगाव लघु पाटबंधारे तलाव अंतर्गत काळगाव गावाजवळील साखरी ओढयावर मातीचे धरण बांधण्यात आले असून या तलावामध्ये जादा पाणीसाठा होऊन या तलावामधील पाणीसाठयामधून काळगाव लघु पाटबंधारे तलावाचे परिसरातील गावांना शेतीसाठी पाणी मिळण्याकरीता काळगाव विभागाचेवतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. सुधारित प्रशासकीय अहवाल मान्यतेसाठी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाकडे सादर केल्यापासून सतत पाठपुरावा केला असुन अखेर ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश येवून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पासाठी 47.88 कोटी खर्चास व्दितीय प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय जलसंपदा विभागाने नुकताच पारित केला असल्याची माहिती काळगाव पंचायत समिती गणाचे सदस्य पंजाबराव देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                  प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काळगाव लघु पाटबंधारे तलाव हा प्रकल्प पाटण तालुक्यातील काळगाव गावाजवळील स्थानिक ओढा साखरी नाल्यावर असून सदर धरणाच्या कामास 25 वर्षापूर्वी सुरुवात झाली. तसेच धरणामध्ये  पाणीसाठा करण्यात येत आहे.या प्रकल्पामध्ये एकूण 2.692 दलघमी इतका पाणीसाठा होत असून यामध्ये 2.562 इलघमी इतका पाणी साठा उपयुक्त आहे. दरम्यान सन 2011 नंतर निधीअभावी सदर धरणाचे काम बंद होते.दरम्यान ना.शंभूराज देसाई यांचेकडे काळगांव, भरेवाडी, लोहारवाडी, येळेवाडी,कुठरे,वाझोली,धामणी,सुपुगडेवाडी,पवारवाडी व लोटलेवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी या धरणामध्ये जास्त पाणीसाठा होऊन धरणातील पाणी शेतीला सिंचनासाठी मिळण्यासाठी सातत्याने आग्रही मागणी केली होती.त्यानुसार या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरु  होणेसाठी मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाकडून दि.23.07.2024 रोजीचे पत्रान्वये सदरचा प्रस्ताव हा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला होता. तसेच ना.शंभूराज देसाई यांनी या कामासाठी निधी मंजूर होण्याकरीता सातत्याने या संदर्भात जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पासाठी 47.88 कोटी खर्चास व्दितीय प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी देत जलसंपदा विभागाकडून शासन निर्णयही पारित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

           सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार काळगाव लघु पाटबंधारे तलावाचे परिसरातील  316 हे.क्षेत्र सिंचनाखाली येणार असून मुख्यत्वे काळगांव, भरेवाडी, लोहारवाडी, येळेवाडी व लीटलेवाडी या 5 गावांचा विकास होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्प सुप्रमा मंजुर होताच ना.शंभूराज देसाई यांचे निर्देशानुसार काळगाव लघु पाटबंधारे तलावाच्या डाव्या पोहोच रस्ता तसेच को. प. बंधा-याच्या कामासही सुरुवात करणेत आलेली आहे. तसेच मंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडुन उर्वरित सांडवा कामे, मुख्य सिंचन विमोचक उजवा पोहोच रस्ता, उर्वरित को. प.बंधारा क्र. 4 ची इ. कामांच्या निविदा ही लवकरात लवकर करणेबाबत च्या सुचना पाटबंधारे विभागास देणेत आलेल्या आहेत. या प्रकल्पामुळे काळगाव भागामध्ये मोठ्या हरित क्रांतीमुळे शेतक-यांना पाण्याचा फायदा होवून लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. यासाठी काळगाव भागातील शेतकरी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे आभार मानत असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

शनिवार, १६ मे, २०२६

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*



*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*  

*शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*  

कुंभारगाव , प्रतिनिधी | दि. 15 मे 2026*  
नवी मुंबई घणसोली शिवसेना शाखाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले युवा नेते *मा. श्री. चंद्रकांत रघुनाथ माने* यांचा 50वा वाढदिवस मान्याचीवाडी, कुंभारगाव येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. 

या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास *पाटण पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रमेश मोरे (बापू), श्री. जितेंद्र केसेकर, चिखलेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री. किशोर मोरे, माथाडी नेते श्री दिनकर सणगुले,श्री.सचिन कदम श्री. मनोहर यादव, श्री. आबासो बोत्रे, श्री. नानासो चाळके माजी ग्रामपंचायत सदस्य भरत माने (नांगरे पाटील ) माजी ग्रामपंचायत सदस्य कुंभारगाव श्री जयेद्र माने श्री. सुभाष माने, संजय माने, सुरेश माने,राहुल माने,यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह मान्याचीवाडी व्याफारी मंडळ, ग्रामस्थ, महिलांमंडळ मोठया संख्येने उपस्थित होते. 
शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्य करत असताना चंद्रकांत माने यांनी घणसोली परिसरात निःस्वार्थ जनसेवेचा वसा घेतला आहे. परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणीत धावून जाणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासकामांसाठी आक्रमकपणे लढणारे नेतृत्व म्हणून 'आप्पा' यांची ओळख आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांपासून ते युवकांच्या रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. 

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि "आप्पा आगे बढो"च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना माजी सभापती रमेश मोरे बापू म्हणाले, "चंद्रकांत माने हे केवळ नेते नाहीत, तर प्रत्येक कुटुंबातील सदस्य आहेत. घणसोलीच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे." उपसरपंच किशोर मोरे यांनीही आप्पांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. 

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे घणसोलीच्या राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री जयेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र माने यांनी केले तर सूत्रसंचालन श्री उमेश माने यांनी केले आभार मानले 


*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान*

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान*  जून ते सप्टेंबर हा कालावधी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकू...