मंगळवार, २ जून, २०२६

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*
कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जिद्द यांच्या बळावर मुंबईच्या चार कन्यांनी आसामच्या भूमीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या ३ऱ्या साऊथ आशियाई मर्दानी स्पोर्ट्स स्पर्धा तसेच ६व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देवकर फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब, मुंबई आणि मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई शहर यांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १६ पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मर्दानी स्पोर्ट्स आणि पारंपरिक मर्दानी तसेच कराटे कुमिते आणि कराटे काता अश्या ४ प्रकार मध्ये स्पर्धेत *वैदेही घोलप* हिने २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकत सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी केली. *रिया सिंग* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदकांची कमाई करत आपले कौशल्य सिद्ध केले. *अंजली दुबे* हिने १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले, तर *तृष्णा राऊत* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदके जिंकून स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

मर्दानी स्पोर्ट्स आणि कराटे या दोन्ही प्रकारांमध्ये या विद्यार्थीनींनी दाखवलेली शिस्त, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती विशेष कौतुकास्पद ठरली. देशातील आणि दक्षिण आशियातील विविध राज्ये व देशांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली.

या यशामागे प्रशिक्षक ऋषिकेश देवकर, श्रेयस खेडेकर, गणेश शिखरे आणि वैष्णवी कोकाटे यांचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाचे सचिव संतोष खंदारे तसेच तांत्रिक संचालक केतन आंधळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारे यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

मुंबईच्या या जिद्दी कन्यांनी मिळवलेले यश हे केवळ पदकांपुरते मर्यादित नसून, ते युवा पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे. त्यांची मेहनत, समर्पण आणि चिकाटी अनेक नवोदित खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या यशामुळे मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव अधिक उंचावला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शुक्रवार, २२ मे, २०२६

*-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून* *काळगाव लघु पाटबंधारे तलाव- योजनेला* व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता. पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्य.

-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून* *काळगाव लघु पाटबंधारे तलाव- योजनेला* व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता. पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्य.


 

दौलतनगर दि.22:- पाटण विधानसभा मतदारसंघातील काळगाव लघु पाटबंधारे तलाव अंतर्गत काळगाव गावाजवळील साखरी ओढयावर मातीचे धरण बांधण्यात आले असून या तलावामध्ये जादा पाणीसाठा होऊन या तलावामधील पाणीसाठयामधून काळगाव लघु पाटबंधारे तलावाचे परिसरातील गावांना शेतीसाठी पाणी मिळण्याकरीता काळगाव विभागाचेवतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. सुधारित प्रशासकीय अहवाल मान्यतेसाठी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाकडे सादर केल्यापासून सतत पाठपुरावा केला असुन अखेर ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश येवून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पासाठी 47.88 कोटी खर्चास व्दितीय प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय जलसंपदा विभागाने नुकताच पारित केला असल्याची माहिती काळगाव पंचायत समिती गणाचे सदस्य पंजाबराव देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                  प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काळगाव लघु पाटबंधारे तलाव हा प्रकल्प पाटण तालुक्यातील काळगाव गावाजवळील स्थानिक ओढा साखरी नाल्यावर असून सदर धरणाच्या कामास 25 वर्षापूर्वी सुरुवात झाली. तसेच धरणामध्ये  पाणीसाठा करण्यात येत आहे.या प्रकल्पामध्ये एकूण 2.692 दलघमी इतका पाणीसाठा होत असून यामध्ये 2.562 इलघमी इतका पाणी साठा उपयुक्त आहे. दरम्यान सन 2011 नंतर निधीअभावी सदर धरणाचे काम बंद होते.दरम्यान ना.शंभूराज देसाई यांचेकडे काळगांव, भरेवाडी, लोहारवाडी, येळेवाडी,कुठरे,वाझोली,धामणी,सुपुगडेवाडी,पवारवाडी व लोटलेवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी या धरणामध्ये जास्त पाणीसाठा होऊन धरणातील पाणी शेतीला सिंचनासाठी मिळण्यासाठी सातत्याने आग्रही मागणी केली होती.त्यानुसार या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरु  होणेसाठी मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाकडून दि.23.07.2024 रोजीचे पत्रान्वये सदरचा प्रस्ताव हा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला होता. तसेच ना.शंभूराज देसाई यांनी या कामासाठी निधी मंजूर होण्याकरीता सातत्याने या संदर्भात जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पासाठी 47.88 कोटी खर्चास व्दितीय प्रशासकीय मान्यता अहवालास मंजुरी देत जलसंपदा विभागाकडून शासन निर्णयही पारित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

           सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार काळगाव लघु पाटबंधारे तलावाचे परिसरातील  316 हे.क्षेत्र सिंचनाखाली येणार असून मुख्यत्वे काळगांव, भरेवाडी, लोहारवाडी, येळेवाडी व लीटलेवाडी या 5 गावांचा विकास होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्प सुप्रमा मंजुर होताच ना.शंभूराज देसाई यांचे निर्देशानुसार काळगाव लघु पाटबंधारे तलावाच्या डाव्या पोहोच रस्ता तसेच को. प. बंधा-याच्या कामासही सुरुवात करणेत आलेली आहे. तसेच मंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडुन उर्वरित सांडवा कामे, मुख्य सिंचन विमोचक उजवा पोहोच रस्ता, उर्वरित को. प.बंधारा क्र. 4 ची इ. कामांच्या निविदा ही लवकरात लवकर करणेबाबत च्या सुचना पाटबंधारे विभागास देणेत आलेल्या आहेत. या प्रकल्पामुळे काळगाव भागामध्ये मोठ्या हरित क्रांतीमुळे शेतक-यांना पाण्याचा फायदा होवून लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. यासाठी काळगाव भागातील शेतकरी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे आभार मानत असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

शनिवार, १६ मे, २०२६

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*



*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*  

*शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*  

कुंभारगाव , प्रतिनिधी | दि. 15 मे 2026*  
नवी मुंबई घणसोली शिवसेना शाखाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले युवा नेते *मा. श्री. चंद्रकांत रघुनाथ माने* यांचा 50वा वाढदिवस मान्याचीवाडी, कुंभारगाव येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. 

या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास *पाटण पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रमेश मोरे (बापू), श्री. जितेंद्र केसेकर, चिखलेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री. किशोर मोरे, माथाडी नेते श्री दिनकर सणगुले,श्री.सचिन कदम श्री. मनोहर यादव, श्री. आबासो बोत्रे, श्री. नानासो चाळके माजी ग्रामपंचायत सदस्य भरत माने (नांगरे पाटील ) माजी ग्रामपंचायत सदस्य कुंभारगाव श्री जयेद्र माने श्री. सुभाष माने, संजय माने, सुरेश माने,राहुल माने,यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह मान्याचीवाडी व्याफारी मंडळ, ग्रामस्थ, महिलांमंडळ मोठया संख्येने उपस्थित होते. 
शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्य करत असताना चंद्रकांत माने यांनी घणसोली परिसरात निःस्वार्थ जनसेवेचा वसा घेतला आहे. परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणीत धावून जाणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासकामांसाठी आक्रमकपणे लढणारे नेतृत्व म्हणून 'आप्पा' यांची ओळख आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांपासून ते युवकांच्या रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. 

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि "आप्पा आगे बढो"च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना माजी सभापती रमेश मोरे बापू म्हणाले, "चंद्रकांत माने हे केवळ नेते नाहीत, तर प्रत्येक कुटुंबातील सदस्य आहेत. घणसोलीच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे." उपसरपंच किशोर मोरे यांनीही आप्पांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. 

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे घणसोलीच्या राजकारणात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री जयेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र माने यांनी केले तर सूत्रसंचालन श्री उमेश माने यांनी केले आभार मानले 


बुधवार, १३ मे, २०२६

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*



पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक
*पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्यातील जनतेला घरगुती वापरासाठी मोफत वीज मिळावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटण ते मुंबई पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा शुक्रवार, 15 मे रोजी सकाळी 8.30 वाजता पाटणच्या झेंडा चौकातून सुरू होणार आहे.
        मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेचा उद्देश पाटण तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आवाज उठवणे हा आहे. “ही लढाई कोणत्याही राजकारणासाठी नाही, तर पाटणच्या जनतेच्या हक्कासाठी आहे,” असे गोरख नारकर यांनी सांगितले.
       पाटण तालुक्यात कोयना धरणाच्या माध्यमातून हजारो मेगावॅट वीज निर्मिती होत असतानाही स्थानिक जनतेला वेळेवर वीज मिळत नाही. हजारोंच्या संख्येने असलेल्या पवनचक्की मधून हजारो मेगावँटगावँट विजनिर्मिती होते. तसेच तारळे येथे अदानी प्रकल्प स्थानिकांच्या मानगुठी वररी येऊन बसवला जात आहे. यामध्ये २७०० मेगावँट विजनिर्मिती केली जाणार आहे. पाटण तालुका हे विजेचे माहेरघर झाले असून स्थानिकांना या विजेचा काय फायदा होतो. वीज बिल माफीचा प्रश्न प्रलंबित आहे. तालुक्याने महाराष्ट्राला प्रकाश दिला, पण स्वतः अंधारात राहण्याची वेळ आल्याचा आरोप मनसेने केला आहे.
     लोकहिताची मागणी असून
पदयात्रेच्या निमित्ताने मनसेने लोकहिताची मागणी करत आवाहन केले आहे. “पाटण तालुक्याच्या त्यागावर महाराष्ट्र तेजोमय होत आहे. पण आमच्या गावात शेतकऱ्यांना पाणी नाही, घरात वीज नाही आणि बिल मात्र वेळेवर हवे आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही,” असे नारकर म्हणाले.
     मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी तालुकाउपाध्यक्ष संजय सत्रे, राहुल संकपाळ, शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, मरळी विभाग अध्यक्ष हणमंत पवार, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलावडे, मोरणा विभाग अध्यक्ष रामचंद्र माने, सुपने विभाग अध्यक्ष संभाजी चव्हाण यांनी पाटण तालुक्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि नागरिकांना या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपला पाठिंबा बहुमोल आहे, आपली साथ महत्त्वपूर्ण आहे. विचार करू नका, पक्ष-गट-राजकारण बाजूला ठेवून निखळ समाजकारणासाठी एकत्र या,” असे आवाहन पदयात्रेच्या पत्रकातून करण्यात आले आहे.
      मनसे आक्रमक झाले असून मोफत वीज मिळालीच पाहिजे या मागणीसाठी मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. “मंत्रालयात जाऊन पाटणचा आवाज पोहोचवू. वीज माफी झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,” असा निर्धार गोरख नारकर यांनी व्यक्त केला.

पदयात्रेदरम्यान मार्गातील गावांमध्ये जनजागृती सभा घेण्यात येणार असून, 15 मे रोजी सुरू झालेली ही पदयात्रा मंत्रालयात निवेदन देऊनच थांबणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवार, ७ मे, २०२६

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार


ढेबेवाडी प्रतिनिधी 
          सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर डिपी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ही बरेच दिवसांची मागणी ना. शंभूराज देसाई यांच्याकडे करताच त्यांनी तत्काळ पूर्ण केल्याने लोकांनी समाधान व्यक्त करून गावच्या विकासासाठी झुकते माप देणाऱ्या ना. देसाई यांचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
         मंद्रूळकोळे खुर्द येथली उपसरपंच संजय लोहार, माजी सरपंच सतिश कापसे, मा.सदस्य रविंद्र उर्फ राजू रोडे, मा.चेअरमन अविनाश साळुंखे, अविनाश उर्फ पोपट काटकर या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक जणांनी ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याबाबत संजय लोहार म्हणाले आमच्या गावची विकास कामे व्हावी यासाठी विकास कामे देण्याची धमक असणारे नेतृत्व ना. देसाई साहेबांच्या पक्षात आम्ही प्रवेश केला. यानंतर गावच्या प्रमुख रस्त्याच्या कामासह, इतर अंतर्गत रस्त्यांची डांबरीकरण काँक्रीटीकरण, सभामंडप अशी कामे झाली दीड वर्षात सुमारे दीड कोट रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. आमच्याकडे लाईट व्होल्टेज कमी असल्याने ट्रांसफार्मर बदलावा व एक लाईन वाढवावी अशी लोकांची मागणी होती ही मागणी साहेबांच्या कडे करताच त्यांनी लगेचच हे काम मार्गी लावून यासाठी तरतूद केली. यामुळे लोकांच्यात समाधानाचे वातावरण असून जनतेच्या सेवेसाठी तत्पर भूमिका असणारा नेता असे ना. देसाई साहेबांच्या बद्दल म्हटले जात आहे. ना. देसाई साहेबांच्या माध्यमातून गावचा विकासात्मक कायापालट होईल याचा आम्हाला विश्वास आहे असे ते म्हणाले.

मंद्रूळकोळे खुर्द प्रीमियर लीग स्पर्धेत विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्स विजेता.

ढेबेवाडी प्रतिनिधी 
           मंद्रूळकोळे खुर्द प्रीमिअर लीग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली, यामध्ये विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्स हा संघ विजेता झाला असून प्रथम क्रमांकाचे 25000 हजार रुपयांचे बक्षिस व मैत्री चषक तर भावड्या स्पोर्ट्स या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले असून 15000 हजार रुपयांचे बक्षिस व मैत्री चषक प्राप्त केला आहे.
         मंद्रूळकोळे खुर्द येथे नुकत्याच भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये गावातील सहा संघात १०६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी भव्य बक्षिस ठेवण्यात आली होती प्रथम क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे बक्षीस सनी साळुंखे व प्रथमेश पाटील यांचे कडून द्वितीय क्रमांकाचे 15 हजार रुपयांचे बक्षीस माजी चेअरमन दादासाहेब साळुंखे व आदित्य साळुंखे यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. ॲड. ए पी पाटील, सदाशिव कदम महाराज, अविनाश उर्फ पोपट काटकर, सुनिल काळुगडे, संतोष उर्फ राजू पाटील, राजेंद्र कापसे दादा, अमर पाटील, रित्विक सचिन कुंभार, जयराज भरुगडे, विश्वनाथ गणेश मंडळ यांच्याकडून वैयक्तिक बक्षीसाठी व इतर बाबीसाठी सहकार्य राहिले. उपसरपंच संजय लोहार व शिवमुद्राचे संस्थापक शिवाजी यादव यांच्याकडून मैत्री चषक व संघमालकाना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर बेस्ट खेळाडू व मन ऑफ द मॅच मिळविणाऱ्या खेळाडूना सन्मान ट्रॉफी देऊन शिवमुद्राचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बबलू पाटील यांच्याकडून गौरविण्यात आले.
         या स्पर्धेत ओंकार पाटील हा अष्टपैलू खेळाडू मन ऑफ द सिरीज ठरला असून बेस्ट बॅट्समन अक्षय पाटील, बेस्ट बॉलर संकेत रोडे, बेस्ट फिल्डर अनिकेत पाटील यांनी चांगली कामगिरी करून त्यांनी बक्षिस मिळविले त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
       या स्पर्धेतील विजेताना ॲड ए पी पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, पंचायत समिती सदस्य नितीन काळे, युवा नेते रणजीत पाटील, विभागाचे नेते मनोज मोहिते, नानासाहेब साबळे, अध्यक्ष लालासाहेब पाटील प्रा. यशवंत काळे, सुभाष बापू गोडांबे, सचिन वाघमारे, अंकुश गोडांबे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली.
विश्वनाथ फायटर स्पोर्ट चे संघमालक व उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू राजू रोडे सर म्हणाले स्पर्धा अतिशय चांगल्या झाल्या असून गावातील खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील प्रमुख मंडळींनी चांगले मैदान निर्माण करून दिलेले आहे. असेच जरवर्षी गावच्या यात्रेनिमित क्रिकेट स्पर्धा घेऊन आम्हा क्रिकेट प्रेमी खेळाडूंना एक चांगली संधी द्यावी. यावेळी  गावचे उपसरपंच संजय लोहार यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

चौकट    
     या स्पर्धेच्या निमित्ताने लोकनियुक्त सरपंच सौ. उमादेवी भोई, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कदम, बाळासाहेब रोडे, सदस्या सौ. कमल पाटील, पोलिस पाटील विजय उर्फ राजू लोहार, तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील, माजी चेअरमन अविनाश साळुंखे, माजी चेअरमन दादासाहेब साळुंखे, अविनाश कापसे दादा, शिवमुद्राचे संस्थापक शिवाजी यादव, मा. ग्रामपंचायत सदस्य राजू रोडे, मा. सदस्या संगीता लोहार, बचत गट समन्वयक सुनिता लोहार. बजरंग पाटील, बजरंग भरुगडे, धनाजी भरुगडे दादासाहेब पाटील आदी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो
   मान्यवरांच्या हस्ते विजेता संघाचे बक्षीस व चषक स्वीकारताना विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्सचे खेळाडू.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

मंद्रूळकोळे हादरले! रक्षा विसर्जन कार्यक्रमात मधमाश्यांचा भीषण हल्ला; १०-१२ जखमी

 मंद्रूळकोळे हादरले! रक्षा विसर्जनात मधमाश्यांचा भीषण हल्ला; १०-१२ जखमी, स्मशानभूमीत एकच खळबळ.


कुमजाई पर्व न्यूज ढेबेवाडी | प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील मंद्रूळकोळे येथे रविवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमावेळी मधमाश्यांच्या मोहोळाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शांततेत पार पडणारा धार्मिक विधी काही क्षणांतच गोंधळात बदलला आणि सुमारे १० ते १२ जण जखमी झाले.

मंद्रूळकोळे येथील रहिवासी यांच्या निधनानंतर रविवार, दि. २६ रोजी सकाळी वांग नदीकाठी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधीपूर्व तयारीसाठी १५ ते २० ग्रामस्थ स्मशानभूमी परिसरात उपस्थित होते.

तयारी सुरू असतानाच झाडावरील मधमाश्यांचे मोठे मोहोळ अचानक भडकले आणि त्यांनी उपस्थितांवर तुफानी हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत एकच धावपळ उडाली. स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांनी पळापळ केली. या घटनेत सुमारे १० ते १२ जणांना मधमाश्यांनी दंश केला.

जखमींना तातडीने ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच काही खाजगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, मूळ विसर्जन स्थळी धोका कायम असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी रक्षा अन्यत्र ढेबेवाडी वांग नदीकाठी नेऊन विसर्जन विधी शांततेत पार पाडण्यात आला.

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात* कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जि...