सोमवार, २० एप्रिल, २०२६

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ.


कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव चव्हाण यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटण तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आज सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री , शंभूराजे देसाई साहेब ,यशराज (दादा) देसाई, रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कै. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर देसाई गटाचे खंबीर आधारस्तंभ होते. गट अडचणीत असताना त्यांनी नेहमीच धीर देत योग्य मार्गदर्शन केले.पाटण तालुक्यातील  कुंभारगाव–ढेबेवाडी परिसरात त्यांनी तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत साहेबांचा विचार पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले.

यावेळी पालकमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
"डॉ. चव्हाण हे दिलेल्या शब्दाचे पक्के होते. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची त्यांना अचूक माहिती होती. ते फक्त सहकारी नव्हते, तर माझे डोळे आणि कान होते."

त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय आयुष्यातील अनेक चढ-उतारांत डॉ. चव्हाण यांनी तानाजी मालुसरे यांच्या ढालीप्रमाणे निष्ठेने साथ दिली. त्यांच्या जाण्याने देसाई गटाच्या निष्ठावंत फौजेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

संयमी, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाची ओळख असलेले डॉ. चव्हाण यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिण, भावजय, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

📍 बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांचे रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.


कु.मृणाल पाटील यांची महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी बिनविरोध निवड; मंद्रुळकोळे गटात उत्साहाचे वातावरण.


सातारा : मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या कु. मृणाल महेश पाटील यांची सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराज देसाई साहेब, युवा नेते रविराज देसाई (दादा) तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज दादा देसाई यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कु. मृणाल पाटील या तरुण, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीमुळे महिला व बाल कल्याण क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या आरोग्य, शिक्षण व स्वावलंबनासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील महिलांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी भक्कम आवाज मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. महिलांच्या सबलीकरणासाठी नवीन उपक्रम राबवून विकासाला चालना देण्याचा निर्धारही मृणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून त्यांच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यात ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात उपक्रम”


पाटण : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.अतुल भोसले साहेब यांच्या नेतृत्वात तसेच पाटण तालुक्याचे नेते व राज्य परिषदेचे सदस्य मा.श्री.सत्यजित सिंहपाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व होते. कृष्णा हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत तब्बल ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पाटण दक्षिणचे अध्यक्ष गणेश यादव, साईकडे गावच्या सरपंच सौ. सुवर्णाताई मोरे यांच्यासह स्थानिक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

या उपक्रमामुळे पाटण तालुक्यातील गरजू कुटुंबांना आरोग्य सुरक्षा कवच मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

*मंद्रूळकोळे खुर्द येथे बैलगाडी स्पर्धा उत्साहात.* *संपन्न.गावाने चांगले मैदान घेतल्याबद्दल स्पर्धक व शौकिनांनी धन्यवाद व्यक्त केले.*

ढेबेवाडी प्रतिनिधी 
         मंद्रूळकोळे खुर्द येथे श्री. जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आदी ठिकाणहून 150 गाड्यांची नोंद करण्यात आली होती यामध्ये तळमावले ता.पाटण येथील इशारा व चॉपर या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. येथील शर्यती उत्साहात संपन्न झाल्या या विभागात मंद्रूळकोळे खुर्द गावाने बैलगाडा स्पर्धकाना मैदान उपलब्ध करून देऊन चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल बैलगाडा स्पर्धकांनी व शौकिनांनी गावचे धन्यवाद व्यक्त केले.
         मंद्रूळकोळे खुर्द गावाने जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले होते. शर्यतीचे नेटके नियोजन ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी लांबून आलेल्या स्पर्धकांची गावच्या वतीने चांगली सोय करण्यात आली. या स्पर्धेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, माजी शेती सभापती हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, उद्योजक महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन काळे दादा, पंचायत समिती सदस्या सौ.संपदाताई जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, लोकनेते कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर, आनंदराव पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील, युवा नेते नितीन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पाटील, माजी सरपंच सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
         या स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे बक्षिस शंकरराव पाटील माजी मुख्याध्यापक यांच्याकडून 51000 रुपयांचे ठेवण्यात आले होते, तळमावले येथील फॅन्स क्लब सागर पवार यांचा इशारा व भागवत पाटील डॉ. गौरव कदम ईश्वरपूर यांचा चॉपर या बैलजोडीने मिळविले, द्वितीय क्रमांकाचे 41000 हजार रुपयांचे बक्षीस पंचायत समिती सदस्य नितीन काळे व सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या कडून तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून 31000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते संयुक्त रित्या कु.वैभवी प्रकाश पवार दाढोली यांचा लक्ष्या, पै. राणा देशमुख वाई व प्रदीप नाना कापूसखेड यांचा मुत्या तसेच सावता माळी बनवडी यांचा सुर्या व श्रीकांत पाटील आसिफ भैय्या काले यांचा सर्जा या बैलजोडीनी पटकावले आहे. चौथ्या क्रमांकाचे बक्षिस जिल्हा परिषद सदस्य कु. मृणाल महेश पाटील यांच्याकडून 21000 रुपयांचे ठेवण्यात आले होते हे बक्षिस येरळवेकरांचा आयफोन तानाजी पाटील जिंती यांचा सुंदर यांनी प्राप्त केला. युवा नेते रणजित पाटील यांच्याकडून पाचव्या क्रमांकाचे 11000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते आनंदराव भिसे तारुख यांचा सरदार व मानेगावचा सरदार यांनी प्राप्त केले. सहाव्या क्रमांकाचे बक्षिस तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील यांच्याकडून सात हजार रुपये ठेवण्यात आले होते ते वेदिका संकेत यादव साईकडे यांचा पक्षा, निनाम यांचा बल्ली तसेच संकेत शेठ सुतार सुसगाव साईकडे गुरुकृपा मित्र परिवार कराड यांचा वश्या, महेश जाधव कुरळप यांचा गज्या यांनी प्राप्त केले. यावेळी विजेत्यांनी जल्लोष केला. दरम्यान क्वार्टर सेमी फायनलला प्रथम आलेल्या रमेश भिंगारदेवे, अर्जुन भिंगारदेवे काळगावकर यांच्यासह इतर सेमी धारकांनी गुलाल उधळण करीत जल्लोष केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय लोहार यांनी सर्वांचे स्वागत केले. अमित कापसे यांनी आभार मानले.
    
 चौकट   
    उपसरपंच संजय लोहार यांच्याकडून प्रथम आलेल्या सहा क्रमांकास ढाली देण्यात आल्या तर कॉटर सेमी फायनल मध्ये आलेल्या प्रथम सहा क्रमांकास ॲड ए. पी. पाटील यांच्याकडून 2000 बक्षिस व सन्मान चिन्ह शिवमुद्राचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बबलू पाटील यांच्याकडून देण्यात आले.
      शर्यती यशस्वी करण्यासाठी अमित कापसे, ग्रा. सदस्य बाळासाहेब कदम, पोलिस पाटील विजय लोहार, मा. चेअरमन दादासाहेब साळुंखे, मा. सरपंच सतिश कापसे, शिवमुद्रा संस्थापक शिवाजी यादव, मा. चेअरमन अविनाश साळुंखे, समीर साळुंखे, सदाशिव कदम महाराज, धनाजी भरुगडे, राजू देसाई, राजाभाऊ रोडे, सचिन लोहार, रमेश पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांसह चेतना, दत्तगुरु, हनुमान, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

येरफळे येथे श्री स्वामी समर्थ महाराज व संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.


पाटण, प्रतिनिधी :
पाटण तालुक्यातील येरफळे गावात श्री स्वामी समर्थ महाराज व संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी युवक व ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अद्वैत, भक्ती व सेवाभावाच्या शिकवणीबरोबरच संत गोरा कुंभार यांच्या साधेपणा, श्रमसंस्कार आणि नामस्मरणाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात सद्भावना, एकात्मता आणि सेवा वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. संतांचे विचार हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून त्यांच्या शिकवणीतून जीवन जगण्याची दिशा मिळते, असे मतही व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे गावात एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असून नव्या पिढीला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यातही अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शंकर भिसे यांनी केले. यावेळी श्री. संतोष कदम सर, श्री. विकास पडवळ, श्री. रामचंद्र भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अरविंद पडवळ सर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव कुंभार, बाळासाहेब भिसे, दादासो कुंभार, बाळासो कुंभार, बबन कोळी, विकास पडवळ, संतोष कदम सर, बबन पाटील, आत्माराम पाटील, संजय पडवळ, आनंदा पानस्कर, अरविंद पडवळ, पांडुरंग चव्हाण, रामचंद्र कदम, अंकुश माळी, निखिल पडवळ, गणेश भेलसे, रविंद्र पुजारी, तुकाराम मुगदुम आदींसह ग्रामस्थ व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

*कु. समर्थ बोरगे यांची उल्लेखनीय कामगिरी; नॅशनल हिंदी ऑलिम्पियाडमध्ये केंद्रात प्रथम.*



कुंभारगाव (ता. पाटण) येथील जि. प. प्राथमिक शाळा कुंभारगाव नं. २ मधील विद्यार्थी कु. समर्थ संतोष बोरगे याने Talent Olympiad आयोजित नॅशनल हिंदी ऑलिम्पियाड (इयत्ता ७ वी) स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समर्थने या स्पर्धेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर १७ वा क्रमांक मिळवला असून त्याला Excellence Award ने गौरविण्यात आले आहे.

 अत्यंत स्पर्धात्मक आणि दर्जेदार असलेल्या या परीक्षेत समर्थने मिळवलेले यश हे त्याच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे.त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा न.2 चाळकेवाडी एकूण 7 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी समर्थचे विशेष कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत चाळकेवाडीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थीवृंद आणि पालक यांनी समर्थ बोरगे याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कुंभारगावच्या शैक्षणिक प्रगतीचा हा एक अभिमानास्पद टप्पा मानला जात असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

*मत्रेवाडीतील — शेडला भीषण आग, दोन म्हशी होरपळल्या*


साप्ताहिक कुमजाई  पर्व न्यूज मत्रेवाडी (ता. पाटण) येथील एका कष्टकरी शेतकऱ्यावर अचानक ओढवलेल्या आगीच्या संकटामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत ज्ञानू मत्रे यांच्या जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीत दोन म्हशी गंभीर भाजल्या असून शेड पूर्णतः जळून खाक झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत मत्रे हे काल सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळील शेडमधील जनावरांना चारापाणी करून घरी झोपायला गेले होते. सर्व काही सुरळीत असताना रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास अचानक शेडमधून धूर निघताना दिसला. घरच्यांनी तत्काळ धाव घेतली असता शेडला भीषण आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या आगीत शेड पूर्णपणे जळून खाक झाले असून अंदाजे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी या आगीत गंभीर भाजल्या. त्यांच्या गळ्यातील दोऱ्या जळून तुटल्याने त्या कसाबसा जीव वाचवू शकल्या, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी रामचंद्र कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे मत्रे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मत्रेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, “कष्टाने उभं केलेलं सगळं काही क्षणात जळून खाक झालं,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ.

कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव च...