मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

*मत्रेवाडीतील — शेडला भीषण आग, दोन म्हशी होरपळल्या*


साप्ताहिक कुमजाई  पर्व न्यूज मत्रेवाडी (ता. पाटण) येथील एका कष्टकरी शेतकऱ्यावर अचानक ओढवलेल्या आगीच्या संकटामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत ज्ञानू मत्रे यांच्या जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीत दोन म्हशी गंभीर भाजल्या असून शेड पूर्णतः जळून खाक झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत मत्रे हे काल सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळील शेडमधील जनावरांना चारापाणी करून घरी झोपायला गेले होते. सर्व काही सुरळीत असताना रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास अचानक शेडमधून धूर निघताना दिसला. घरच्यांनी तत्काळ धाव घेतली असता शेडला भीषण आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या आगीत शेड पूर्णपणे जळून खाक झाले असून अंदाजे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी या आगीत गंभीर भाजल्या. त्यांच्या गळ्यातील दोऱ्या जळून तुटल्याने त्या कसाबसा जीव वाचवू शकल्या, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी रामचंद्र कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे मत्रे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मत्रेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, “कष्टाने उभं केलेलं सगळं काही क्षणात जळून खाक झालं,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रविवार, १२ एप्रिल, २०२६

*सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे म. ज्योतिबा फुले:- सुरेश यादव*

 (कराड प्रतिनिधी) 11 एप्रिल 2026 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह व महात्मा फुले जयंती द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने महात्मा फुले: जीवन व कार्य या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुरेश यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. हजारो वर्षाच्या सामाजिक गुलामगिरीत संपूर्ण बहुजन समाज देशात अडकलेला होता. अन्याय, अज्ञान, अस्पृश्यता, जातीभेद या समस्यांनी संपूर्ण समाज गुरफटलेला  होता. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी सामाजिक समतेची चळवळ सुरू केली . स्वतःची पत्नी सावित्रीबाईंना शिक्षित करून इतर स्त्रियांना शिकवायला लावले. स्त्री शिक्षणास सुरुवात केली. अनेक शाळा सुरू केल्या. अन्याय अत्याचार झालेले स्त्रियांच्यासाठी पाळणाघरे सुरू केली. अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी स्वतःचा पानवठा उपलब्ध करून दिला. ब्रिटिश राजपुत्रा पुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले हे गर्भ श्रीमंत होते. त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती.  सुखांचा उपभोग घेण्यापेक्षा समाजसेवेचे व्रत त्यांनी ठेवले.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, या देशात सामाजिक समता चळवळीचे मुख्य प्रेरणास्थान म्हणजे महात्मा फुले होत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले या पती-पत्नींनी दिनदलित व सर्व समाजातील स्त्रिया यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. या अन्याया मागचे मुख्य कारण अज्ञान आहे. हे त्यांनी ओळखले व शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. शाळा सुरू केल्या व समाज घडविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंचे कार्य भविष्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेले. आज जयंतीदिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो!
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रघुनाथ गवळी कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. मनाली रानडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

श्री क्षेत्र करपेवाडीची ५४ वर्षांची अखंड परंपरा; ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाने रंगली भक्तीमय यात्रा.


तळमावले/पाटण :
अध्यात्मिक वारसा आणि संत परंपरेची अखंड ज्योत जपत श्री क्षेत्र करपेवाडी (ता. पाटण) येथे यंदाही ५४ व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. तमाशा, कुस्ती, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना पूर्णतः फाटा देत केवळ अध्यात्मिक आणि संस्कारमय परंपरा जपणारी ही यात्रा परिसरात आदर्श ठरत आहे.

यंदाचा सप्ताह ३ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडला. या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आदी धार्मिक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन पारायण मंडळ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण आठवडाभर गाव परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

गुरुवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी श्री मसनाई माता मंदिरात ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती पार पडली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत श्री मसनाई मातेची पालखी सासन काठ्यांसह भव्य मिरवणुकीतून मंदिरात दाखल झाली. रात्री ह.भ.प. रोहिदास महाराज मालुसरे (वाई) यांचे भावस्पर्शी कीर्तन झाले, ज्यामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.

शुक्रवार, १० एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस ठरला. सकाळी देवीची आरती करून पालखी, मानकरी, सासन काठ्या, ग्रामस्थ, युवक वर्ग आणि भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबरे उधळीत व फटाक्यांच्या आतषबाजीत छबीना भवानी मातेच्या मंदिराकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणाई विशेष भक्तीभावाने सहभागी झालेली दिसून आली.

पालखीचे गोल रिंगण हा सोहळ्याचा आकर्षणबिंदू ठरला. माहेरवाशिणी, महिला वर्ग, युवक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर पारंपरिक मानाचे दंड स्थान विधी पार पडले. सकाळी ११ ते १२ या वेळेत ह.भ.प. बाबुराव महाराज मस्कर यांचे काल्याचे कीर्तन झाले.

या अध्यात्मिक उत्सवाची सांगता दहीहंडी फोडून व महाप्रसादाने करण्यात आली. संपूर्ण यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तीमय आणि पारंपरिक वातावरणात पार पडली.

ही परंपरा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, पारायण मंडळ, ग्रामस्थ, युवक वर्ग यांनी मोठे परिश्रम घेतले. करपेवाडी ग्रामस्थांनी जपलेली ही ५४ वर्षांची अध्यात्मिक परंपरा आजच्या आधुनिक काळातही संस्कार आणि भक्तीची प्रेरणा देणारी ठरत आहे.

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

तळमावले - “मैत्रीचाच झाला घात! आंबा घाटात मित्रानेच घेतला जीव; अपघाताचा बनाव अखेर उघड”


साप्ताहिक कुमजाई पर्व सविस्तर बातमी:
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे ३१ मार्च रोजी घडलेल्या घटनेने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

देवरुख पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर यादव आणि आशिष भावके हे दोघे जिवलग मित्र असून नातेवाईकही होते. ते दोघे रत्नागिरी येथे फिरण्यासाठी गेले होते. ‘आरे-वारे’ समुद्रकिनारी त्यांनी जेवण केले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र ३१ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा येथे दोघांमध्ये वाद झाला.

दारू पिण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद अचानक विकोपाला गेला. संतापलेल्या सुधीर यादव याने आशिषच्या गाडीच्या बोनेटवर चढून काच फोडली व वाहनाचे नुकसान केले. यामुळे संतप्त झालेल्या आशिषने गाडी भरधाव वेगाने चालवली. सुधीर खाली पडल्यास त्याचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनही त्याने गाडी न थांबवता पुढेच नेली.

दरम्यान, सुधीर बोनेटवरून खाली पडला आणि काही अंतर फरपटत गेला. यात त्याच्या बरगड्या, पोट आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर अवस्थेत त्याला मदत करण्याऐवजी आशिष घटनास्थळावरून पसार झाला, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.

दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत सुधीर यादव याला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.

परंतु देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून रागाच्या भरात केलेला गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांच्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

भावपूर्ण स्मरणातून भक्तीचा सोहळा – धामणी येथे कै. सौ.कोमल शंकर सावंत यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त जाहीर कीर्तन.




ता. पाटण येथील धामणी गाव आज संध्याकाळी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. गावातील कै.सौ. कोमल शंकर सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त एक भावपूर्ण आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ठीक ७ वाजता सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे जाहीर कीर्तन संपन्न होणार आहे.

कै. सौ. कोमल सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखण्यासाठी हा भक्तीमय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार आणि अध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम साधला जाणार आहे.

धामणी पंचक्रोशीतील सर्व भाविक, नागरिक व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तनाचा लाभ घ्यावा, तसेच पुण्यस्मरण सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवून दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामुळे गावात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असून, कै. सौ. कोमल सावंत यांच्या स्मृतींना हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे.

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*


साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात कदम जखमी झाले असून त्यांच्यावर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मार्च रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास विनोद कदम हे जेवण करून घरी झोपले होते. अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते तात्काळ घराबाहेर आले. बाहेर येताच त्यांनी पाहिले की, एका बिबट्याने त्यांच्या कुत्र्याला पकडले होते.

धाडसाने त्यांनी कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी बिबट्याने संतापून त्यांच्यावरच झडप घातली. झालेल्या झटापटीत कदम जखमी झाले. आरडाओरड आणि गोंधळामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत विनोद कदम यांना तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पाहणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे पवारवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री एकटे बाहेर न पडणे, पाळीव जनावरांची काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

रयत सहकारी पतपेढीचा रौप्यमहोत्सवी टप्पा; २५ कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल, सभासदांसाठी ११% व्याजदराची विशेष ठेव योजना.



मुंबई – रयत सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई-२ या संस्थेने आपल्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जपत आज २५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेचे संस्थापक-संचालक श्री. शिवाजीराव बापूसाहेब माटेकर यांनी सन २००२ मध्ये गोरगरीब जनतेची आर्थिक अडचण दूर व्हावी आणि सावकारीच्या जाचक व्याजातून त्यांची मुक्तता व्हावी या उद्देशाने या पतसंस्थेची स्थापना केली.

स्थापनेपासूनच सर्वसामान्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली ही संस्था आज भक्कम आर्थिक प्रगती करत असून सन २०२६ अखेर संस्थेचा व्यवसाय तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, रौप्यमहोत्सवी वर्षात संस्था २५ कोटींच्या व्यवसायाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

या विशेष वर्षानिमित्त संस्थेने आपल्या सभासदांसाठी आकर्षक मुदत ठेव (FD) योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३७ महिन्यांच्या कालावधीसाठी ११% इतका आकर्षक व्याजदर देण्यात येत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसह जास्त परतावा मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही प्रगती साध्य झाली असून, आगामी काळातही सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

तरी सर्व सभासद व हितचिंतकांनी या रौप्यमहोत्सवी विशेष ठेव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.या योजनेबाबत अधिक माहिती, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी सभासदांनी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी –

मुख्य कार्यालय (धोबीतलाव): ८३६९३४४८५८

पवई शाखा: ७०२१६९०९६१

सानपाडा शाखा: ९३७२४२७२३६

*मत्रेवाडीतील — शेडला भीषण आग, दोन म्हशी होरपळल्या*

साप्ताहिक कुमजाई  पर्व न्यूज मत्रेवाडी (ता. पाटण) येथील एका कष्टकरी शेतकऱ्यावर अचानक ओढवलेल्या आगीच्या संकटामुळे गावात हळहळ व्य...