बुधवार, २२ एप्रिल, २०२६

“निर्णय बदलायला लावणारा माझा एकमेव मार्गदर्शक हरपला” — स्व. डॉ. दिलीपराव चव्हाणांना ना. शंभूराज देसाईंची भावपूर्ण श्रद्धांजली


कुंभारगाव (दि. २२ एप्रिल २०२६) : कुंभारगावचे सुपुत्र, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक स्वर्गीय डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की. “स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ नेते नव्हते, तर आमचे मार्गदर्शक, आधारवड होते,” असे म्हणत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

देसाई म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रुग्णालयात भेट झाली होती. “अर्धा तास त्यांनी माझ्याशी अगदी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला,” असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला.

राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनच डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, असे सांगत देसाई पुढे म्हणाले, “माझे निर्णय बदलायला लावणारे जर कोणी असतील तर ते फक्त स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण होते. त्यांनी नेहमीच विचारपूर्वक मार्गदर्शन केले आणि गटाच्या हिताचा विचार केला.”

पडत्या काळात खंबीरपणे सोबत उभे राहणारा नेता म्हणून त्यांनी डॉ. चव्हाण यांचे वर्णन केले. “चढत्या काळात अनेक जण सोबत असतात, पण पडत्या काळात खरे सहकारी ओळखू येतात — आणि डॉ. दिलीपराव चव्हाण हे असेच निष्ठावंत सहकारी होते,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

देसाई गटाच्या राजकीय वाटचालीत ढेबेवाडी व कुंभारगाव परिसराची जबाबदारी त्यांनी एकहाती सांभाळली, याची आठवण करून देताना देसाई म्हणाले, “ते म्हणायचे ‘डोंगराच्या अलीकडची काळजी करू नका’, त्यामुळे मी निर्धास्त असायचो. आज तो आधार हरपला आहे.”

या प्रसंगी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजित पाटील चिखलीकर, हिंदुराव पाटील, अॅड. डी.पी. जाधव, कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग नलावडे, विश्वनाथ पानसकर, विजय पवार, चंद्रकांत चाळके, दत्तात्रय चोरगे, संजय देसाई, संतोष मोरे, आनंदराव चव्हाण, राजेंद्र देसाई, देवबा वायचळ, अॅड. जनार्दन बोत्रे, विजय शिबे, विनायक सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वांनी स्व. डॉ. चव्हाण यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी देसाई यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व “या दुःखद प्रसंगी शासन व समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.

एक निष्ठावंत नेता, मार्गदर्शक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत प्रत्येकाच्या मनात होती — आणि अश्रूंतूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*“छत्रपती महाराजस्व अभियानाचा धडाका — हजारो महसूल तक्रारींचा झटपट निपटारा”*

सणबुर प्रतिनिधी – महेश जाधव सणबुर : सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित महसूल प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “...