“कुंभारगाव - वडिलांच्या रक्षेचे पाण्यात विसर्जन न करता वृक्षारोपणातून जिवंत स्मारक”
कुंभारगाव – साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील कुंभारगावातील जुन्या पिढीतील प्रगतशील, प्रामाणिक व कष्टाळू ज्येष्ठ शेतकरी कै. दत्तात्रय विठ्ठल देसाई यांचे दि. १६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांनी पारंपरिक रीतिरिवाजांना पर्याय देत पर्यावरणपूरक व समाजाला दिशा देणारा आदर्श उपक्रम राबविला.
आज दि.१८ डिसेंबर रोजी रक्षा विसर्जनाच्या दिवशी, कै. देसाई यांच्या रक्षेचे पाण्यात विसर्जन न करता त्या रक्षेचा उपयोग करून त्यांनी ज्या शेतीत आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा संसार फुलविला, त्या शेतीत बेल, सुपारी, आवळा, सिताफळ, फणस आदी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वडिलांची आठवण कायमस्वरूपी जिवंत राहावी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाला मिळावा, या उद्देशाने देसाई कुटुंबाने हा उपक्रम राबविला.
या उपक्रमामुळे कुंभारगाव विभागात देसाई कुटुंबाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक जाणीव जपण्याचा संदेश दिला आहे.
वृक्षारोपणवेळी मुलगा विकास सेवा सोसायटी. कुंभारगावचे संचालक श्री. जगन्नाथ दत्तात्रय देसाई, पत्नी सौ. संगीता जगन्नाथ देसाई, मुलगा सनी, भाऊ श्री. दिलीप दत्तात्रय देसाई व पत्नी सौ. उज्वला दिलीप देसाई, श्री. संजय दत्तात्रय देसाई व पत्नी सौ. सुनीता संजय देसाई, मुलगा साईश, मुलगी मधुरा, चुलते श्री. राजाराम देसाई तसेच कुंभारगाव शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, वृक्ष मित्र श्री. जालिंदर पाटील (बनपुरी) आदी उपस्थित होते.
परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत पर्यावरणपूरक कृतीतून पितृऋण फेडण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा