शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था पुढाकारबीड व संभाजीनगर जिल्ह्यात 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था पुढाकार
बीड व संभाजीनगर जिल्ह्यात 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


बीड व संभाजीनगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून शिक्षणाची साधनेही बाधित झाली आहेत. अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय जीवनाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे. समाजाशी असलेली आपली बांधिलकी जपत संस्था गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, यंदा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत उपक्रम आयोजित केला.

शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील शिवणी आणि संभाजीनगर जिल्ह्यातील ता. पैठण या पूरग्रस्त भागांतील शाळांमध्ये संस्थेच्या वतीने मदत वितरण कार्यक्रम पार पडला. पूरपरिस्थितीत शालेय साहित्याचे मोठे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी एकूण 150 विद्यार्थ्यांना नवीन “स्कूल किट”चे वाटप करण्यात आले. या स्कूल किटमध्ये वह्या, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, रंगीत साहित्य आदी शैक्षणिक वस्तूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद व उत्साह पाहून संस्थेच्या कार्यकर्त्यांना समाधानाची जाणीव झाली.

पूरामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली असून, शालेय खर्च भागविणे कठीण झाले होते. अशा स्थितीत मिळालेली ही मदत विद्यार्थ्यांसाठी “लाखमोलाची” ठरली. अनेक पालकांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमाला प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद कदम, कार्यकर्ते प्रशांत खरात, विजय कदम, श्याम खेडेकर, प्रताप कदम, महादेव खरात यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शिवणी गावचे सरपंच अजय सुपेकर, उपसरपंच कॉ. सुधाकर डोळस, समाजसेवक ज्योतीराम हुरकुडे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तसेच पैठण येथील आमदार अशोक पाठक, समाजसेवक विष्णू अण्णा बोडके आणि गावातील इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असे उपक्रम शिक्षणाची गती वाढविण्यास महत्त्वपूर्ण ठरतात, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, समाजातील विविध घटक एकत्र येऊन शिक्षणासाठी काम करत असल्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून पसरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...