तळमावले/पाटण :
अध्यात्मिक वारसा आणि संत परंपरेची अखंड ज्योत जपत श्री क्षेत्र करपेवाडी (ता. पाटण) येथे यंदाही ५४ व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. तमाशा, कुस्ती, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना पूर्णतः फाटा देत केवळ अध्यात्मिक आणि संस्कारमय परंपरा जपणारी ही यात्रा परिसरात आदर्श ठरत आहे.
यंदाचा सप्ताह ३ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडला. या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आदी धार्मिक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन पारायण मंडळ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण आठवडाभर गाव परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.
गुरुवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी श्री मसनाई माता मंदिरात ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती पार पडली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत श्री मसनाई मातेची पालखी सासन काठ्यांसह भव्य मिरवणुकीतून मंदिरात दाखल झाली. रात्री ह.भ.प. रोहिदास महाराज मालुसरे (वाई) यांचे भावस्पर्शी कीर्तन झाले, ज्यामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.
शुक्रवार, १० एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस ठरला. सकाळी देवीची आरती करून पालखी, मानकरी, सासन काठ्या, ग्रामस्थ, युवक वर्ग आणि भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबरे उधळीत व फटाक्यांच्या आतषबाजीत छबीना भवानी मातेच्या मंदिराकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणाई विशेष भक्तीभावाने सहभागी झालेली दिसून आली.
पालखीचे गोल रिंगण हा सोहळ्याचा आकर्षणबिंदू ठरला. माहेरवाशिणी, महिला वर्ग, युवक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर पारंपरिक मानाचे दंड स्थान विधी पार पडले. सकाळी ११ ते १२ या वेळेत ह.भ.प. बाबुराव महाराज मस्कर यांचे काल्याचे कीर्तन झाले.
या अध्यात्मिक उत्सवाची सांगता दहीहंडी फोडून व महाप्रसादाने करण्यात आली. संपूर्ण यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तीमय आणि पारंपरिक वातावरणात पार पडली.
ही परंपरा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, पारायण मंडळ, ग्रामस्थ, युवक वर्ग यांनी मोठे परिश्रम घेतले. करपेवाडी ग्रामस्थांनी जपलेली ही ५४ वर्षांची अध्यात्मिक परंपरा आजच्या आधुनिक काळातही संस्कार आणि भक्तीची प्रेरणा देणारी ठरत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा