बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

“तहानलेल्या जीवांसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार”सोनवडेतील विद्यार्थ्यांची ‘पक्ष्यांसाठी पाणपोई’—उन्हाळ्यात मानवतेचा हृदयस्पर्शी संदेश.


पाटण :
आजच्या वाढत्या तापमानामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे नद्या, ओढे आणि पाणवठे कोरडे पडत असून, पक्ष्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली “पक्ष्यांसाठी पाणपोई” हा उपक्रम हाती घेतला. शाळेच्या परिसरातील झाडांखाली तसेच झाडांवर मातीच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी आणि धान्य ठेवण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ शाळेपुरतेच मर्यादित न राहता, आपल्या घरासमोरही पाण्याची भांडी ठेवण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज त्या भांड्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारीही स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ एकदिवसीय न राहता सातत्यपूर्ण सेवा कार्य ठरत आहे.
“पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा” असा प्रभावी संदेशही यामधून देण्यात आला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की,

“अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि संवेदनशीलता विकसित होते. लहानशा कृतीतून मोठा बदल घडवता येतो, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.”

उन्हाळ्याच्या तडाख्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी सरसावलेले हे हात खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतीक ठरले आहेत. समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले असून, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात* कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जि...