विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न
आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीमध्ये ५ टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले, त्या भागातला लॉकडाउन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरविलेले आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर हा निर्णय घेण्याचं ठरलं आहे. याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. यात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील', असे स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
राज्य सरकारने काय दिले होते स्पष्टीकरण ?
'कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत', असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहेत.
निर्णय अद्याप विचाराधीन !
ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी दर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे जाहीर करण्यात येतील.
अधिकृत निर्णय नंतर कळवला जाईल !
राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'राज्यात अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते पुढे शासननिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात येईल.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा