मुंबई, 12 जून : राज्यात गुरुवारी मान्सूनचं आगमन झालेलं असलं, तरी अद्याप धुवांधार पावसाला सुरुवात झालेली नाही. पण शनिवार, रविवारी या दोन्ही दिवशी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार वृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेधशाळेने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या 8 जिल्ह्यांसाठी नारिंगी इशारा (Orange Alert)जारी केला आहे.
13 जूनला मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिवशी कोकणातले सगळे जिल्हे आणि कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारच्या दिवशी मुंबई, ठाणे, पुणे, नगर या भागांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.रविवारचा दिवसही पावसाचा असेल आणि या दिवशी 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या भागात अति जोरदार पाऊस पडू शकतो.
येत्या 15 तारखेपर्यंत नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
कुठल्या 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
मुंबई
ठाणे
पालघर
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
कोल्हापूर
सातारा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा