गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

नवी मुंबई ; महानगरपालिका भाजपाला बंडखोरीची भीती

नवी मुंबई  प्रतिनिधी : 
राज्याच्या सत्तेसाठी तयार झालेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवी मुंबई पालिकेची येणारी निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपनेही या महाआघाडीचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत १११ प्रभागांची विभागणी होणार आहे. 
त्यामुळेच ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना शासकीय समित्या, महामंडळ यांच्यात सामावून घेतले जाण्याचे गाजर दाखविण्यात आले आहे. नवी मुंबई भाजपमध्येही तीन गट असल्याने या पक्षालाही बंडखोरी थोपविण्याचे आव्हान आहे.
अजित पवार यांनी तर ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना विविध पालिका, शासकीय तसेच महामंडळावर स्थान दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे 'मविआ'तील शिवसेना व राष्ट्रवादी काँगेस या दोन प्रमुख पक्षांना मोठय़ा प्रमाणात बंडखोरी होण्याची भीती आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मंगळवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा वाशी येथे मनोमीलन मेळावा झाला. त्यात 'मविआ'चे बडे नेते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या नाईकांची सत्ता येणार नाही, याची काळजी 'मविआ'च्या सर्व कार्यकर्त्यांनी घेण्याचे आवाहन या नेत्यांनी केले आहे.

निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन भाजप या ४० प्रभागांतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचवेळी भाजपचे या प्रभागातील कार्यकर्ते नाराज होणार आहेत. गणेश नाईकांबरोबर राष्ट्रवादीचे मोठय़ा प्रमाणात खच्चीकरण झालेले आहे. पन्नास प्रभागात राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या २० ते २५ प्रभागांतच राष्ट्रवादी उमेदवारी घेणार आहे. काँग्रेसची उमेदवारी घ्यायला कार्यकर्ते असणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य बंडखोरीची महाविकास आघाडीला भीती आहे. याच वेळी नवी मुंबईतील भाजपा एकसंध नाही.

नाईकांच्या पालिकेतील सत्ता उलथून लावण्याचे म्हात्रे यांचे गेली अनेक वर्षांचे स्वप्न आहे. ते या वेळच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण होणार होते, पण याचवेळी नाईकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने म्हात्रे यांची पंचाईत झाली आहे. आता भाजपची राज्यव्यापी परिषद नवी मुंबईत होत आहे. त्यामागे वातावरण निर्मिती हे कारण असून महाविकास आघाडीला शह देण्याचा भाजपाचा पूर्ण प्रयत्न आहे. किमान या निवडणुकीसाठी नाईक- म्हात्रे यांचे मनोमीलन भाजपचे नेते घडवणार आहेत. तुमची भांडणे तूर्त बाजूला ठेवून पक्षाला विजयी करा, असा संदेश या दोन्ही नेत्यांना देण्यात आलेले आहेत. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यात पूर्वीच्या सहा नगरसेवकांनी आतापासूनच फलकबाजी सुरू केली आहे. यात एक गट जुन्या भाजपचा निष्ठावंत गट असून त्यांनाही उमेदवारीची आस आहे. त्यामुळे या पक्षालाही बंडखोरीची लागण होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...