पाटण - बिबट्यांची दहशत संपणार? साताऱ्यात ‘हायटेक एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५ पिंजरे, अलार्म आणि संरक्षक चर खोदण्याचा निर्णय
पाटण साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात बिबट्या व मानव यांच्यात वाढत चाललेला संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने बहुआयामी उपाययोजना हाती घेतल्या असून, येत्या काळात जिल्ह्यात हायटेक एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित अलार्म प्रणाली, २५ पेक्षा अधिक पिंजरे आणि संरक्षक चर (खंदक) उभारले जाणार आहेत. या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
ग्रामीण भागात बिबट्यांचा वाढता वावर आणि जनावरांवरील हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यासाठी २५ पिंजरे उपलब्ध करून दिले असून, त्यांचा वापर संवेदनशील गावांमध्ये केला जाणार आहे. यामुळे बिबट्यांचे सुरक्षित पकड कार्य सुलभ होऊन मानवी जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, शहरी व निमशहरी भागांमध्ये बिबट्यांची आगाऊ सूचना मिळावी यासाठी आवश्यक ठिकाणी एआय तंत्रज्ञानावर आधारित अलार्म बसवले जाणार आहेत. बिबट्या परिसरात येण्यापूर्वीच नागरिकांना इशारा मिळाल्याने आपत्कालीन परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळता येणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषतः सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्यालगतच्या दुर्गम गावांमध्ये, बिबट्यांचा मानवी वस्तीतील शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोठे संरक्षक चर खोदण्याची मोहीम राबवली जाणार आहे. ही चर वनविभागाच्या हद्दीलगतच्या शेती क्षेत्रामध्ये घेतली जाणार असून, त्यातून बिबट्यांचे शेती व वस्ती भागात येणे आटोक्यात येण्याची अपेक्षा आहे. पाटण, सातारा आणि जावली हे तीन तालुके या मोहिमेत प्राधान्याने समाविष्ट असतील.
या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एकूणच, एआय तंत्रज्ञान, पिंजरे आणि संरक्षक चर अशा एकत्रित उपाययोजनांमुळे सातारा जिल्ह्यात बिबट्यांमुळे निर्माण होणारी भीती आणि हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा