*प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन रस्त्यांसाठी 7 कोटी 15 लक्ष्य निधी मंजूर*
कराड : प्रतिनिधी
खा.श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून कराड तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 7 कोटी 15 लक्ष्य रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्या शिफारशीने सातारा लोकसभा मतदार संघातील एकूण 37 रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार मसूर ते निगडी या 6.97 कि.मी.च्या रस्त्यासाठी 4 कोटी 40 लक्ष 83 हजार रुपये व मनू-उंडाळे ते तुळसण या 4.19 कि.मी. रस्त्यासाठी 2 कोटी 75 लक्ष 99 हजार रुपये मंजूर झाले असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
केंद्र सरकार पुरुस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात 25 डिसेंबर 2000 साली झाली होती. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील 500 च्या वर लोकसंख्या असणारी गावे मुख्य रस्त्यास जोडणे हा होता. खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून तात्कालीन कराड लोकसभा मतदार संघातील वाडीवस्तीवर या योजनेखाली मोठया प्रमाणात निधी आणण्यात यश मिळाले होते.
सध्याच्या योजनेत ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल यांना जोडणारे जे रस्ते आहेत अशा रस्त्यांना गुणांकन देऊन प्राधान्यक्रम दिला जातो. योजनेत समाविष्ट रस्त्यांना मिळणा-या एकूण निधीत पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसह निधीचा समावेश केला गेला आहे. तसेच ज्या रस्त्यावर गरज आहे तिथे 150 मीटर लांबीच्या पूलांचा ही समावेश देखील करण्यात आला आहे. या योजनेचे कार्यान्वयन राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून होते. तसेच या योजनेच्या तिसऱ्या फेज मधील कालावधी 2019-20 ते 2024-25 पर्यंत निर्धारित केला गेला आहे.
खा.श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीनुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण 37 रस्त्यांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यापैकी कराड तालुक्यातील मसूर–वाण्याचीवाडी-हणबरवाडी - निगडी या 6.97 कि.मी.च्या रस्त्यासाठी 4 कोटी 40 लक्ष 83 हजार रुपये व मनू-उंडाळे ते तुळसण (प्रजिमा 56) या 4.19 कि.मी. रस्त्यासाठी 2 कोटी 75 लक्ष 99 हजार रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तर प्रधानमंत्री ग्रामसडकचे कार्यकारी अभियंता संदीप खलाटे, उपकार्यकारी अभियंता विलास पानस्कर, कराडचे शाखा अभियंता विजय जाधव यांचे प्रशासकीय कार्यवाहीसाठी सहकार्य लाभले.
खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर यांना दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून तसेच त्यांच्याशी वेळच्यावेळी पत्रव्यवहार करून सातारा लोकसभा मतदार संघामध्ये जास्तीत जास्त रस्त्यांचा समावेश करुन मंजूरी घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्याला केंद्र शासनाने वाटप करुन मंजूर केलेल्या एकूण 300 कि.मी. लांबीमध्ये वाढ करुन मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या योजनेच्या खर्चाचा वाटा सध्या केंद्र शासन व राज्य शासन यांच्यात 60:40 असा विभागून घेतला जातो. मात्र कोविडच्या गंभीर परिस्थतीमुळे राज्य शासनाच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने त्याचा वाटा वाढवून खर्चाचा 90 टक्के भार स्वतः उचलावा अशी मागणीही खा. पाटील यांनी ना.नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे यापूर्वी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा