कोल्हापूर प्रतिनिधी ;-
महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा ७ एप्रिल रोजी सुरु होत आहे. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आढावा बैठक घेतली. यात्रेला सहा ते सात लाख भाविक येतात. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमणे, दर्शन रांगा, सासनकाठ्यांचा मार्ग येथील सुरक्षा व्यवस्था या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. वेगवेगळ्या विभागांना कामे नेमून देण्यात आली असून कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यात्रेसाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करेल. गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीत खचलेल्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उर्वरीत काम युद्धपातळीवर पूर्ण करून यात्रेपूर्वी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीला पन्हाळा-शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कदम, कोडोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा