सोमवार, ३१ जुलै, २०२३

माणसातला देवमाणूस म्हणजे प्रा. ए. जी.खोत.

 माणसातला देवमाणूस म्हणजे प्रा. ए. जी.खोत.



प्रा. ए.जी.खोत सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज सोमवार, दिनांक  31 जुलै, 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रा. ए.जी. खोत साधारणपणे  चार वर्षांपूर्वी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे बदलीने हजर झाले. आपण नेहमी बोलतो की सुरुवातीला माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. सरांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आणि यापूर्वी त्यांच्याबरोबर नोकरी करण्याची संधी कधीही मला मिळाली नव्हती तरीपण त्यांच्याबद्दल लिहावे असे मला मनापासून वाटत होते. त्यांना मी मागील महिन्यातच बोललो होतो की सर मी तुमच्याबद्दल तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी काहीतरी लिहिणार आहे.
     मला आजही आठवते ज्यावेळी खोत सर कराडमध्ये हजर झाले त्याच दिवशी मी माझी विद्यार्थिनी आणि सध्या समाजशास्त्र विभागात कार्यरत असणारी प्रा. दिपाली वाघमारे यांना मी प्रश्न विचारला की, "दिपाली खोत सर कसे आहेत?" त्यांनी त्यावेळी उत्तर दिले की, "यादव सर, आता माझे खूप अवघड आहे. नवीन आलेले सर अजिबात बोलत नाहीत तसेच ते खूप खूप शांत वाटतात. आता माझे काय खरे नाही". मी दिपाली यांना त्यावेळी बोललो की, दिपाली कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. त्याच प्रा. दिपाली यांना मी मुद्दामहून मागील पंधरा दिवसात प्रा.ए.जी. खोत यांच्या बद्दल पुन्हा प्रश्न विचारला, " दिपाली खोत सर कसे आहेत?" दिपाली यांनी एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, "खोत सर एक नंबर माणूस आहे". आपल्या विभाग प्रमुखाबद्दल असे उत्तर आज येणे फारच दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट आहे. मग एकाच विभागात सलग चार वर्षे कार्य करत असताना दिपाली यांच्या मनात प्रा. खोत सर यांच्या बद्दल विचारात बदल का झाला ?कारण याचे एकच उत्तर आहे की, खोत सर हे माणसातील देव माणूस आहे.
   आपणास माहित आहे की सुरुवातीस माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. कोणतीही व्यक्ती सुरुवातीला आश्वासक, आकर्षक आणि आपलेपणाचे वाटते परंतु जसजसा काळ जाईल तसतशी त्या व्यक्तीचे जीवनाचे बरेच नकारात्मक पैलू उघडत जातात आणि ती व्यक्ती आपणास नको वाटते, त्या व्यक्तीचा सहवासपण काटेरी वाटत जातो. सरांच्या बाबतीत मला उलटा अनुभव आला त्यांच्याबद्दल मलाही सुरुवातीला खूप नकारात्मक भावना निर्माण झालेली होती, परंतु त्यांच्यावर झालेल्या योग्य संस्काराने त्यांची व्यक्तिमत्व नकारात्मकतेकडून सकारात्मककडे जे झुकले ती त्यांच्याकडे असलेली फक्त आणि फक्त असलेल्या माणुसकीच्या खाणीमुळेच. त्यांच्याकडील असणारे आदराची भावना, सर्वासी आदबीने, प्रेमाने, आपुलकीने व नम्रतेने वागण्याचा सुस्वभाव आणि लोकसंग्राहक वृती यामुळे त्यांचे लोकप्रियता मध्ये अधिक भर पडते.
    माणसाने ज्येष्ठ असावे परंतु श्रेष्ठ कधीच नसावे. सर हे सध्या उपप्राचार्य पदावर कार्यरत होते, परंतु त्यांनी उपप्राचार्य पदाचा कधीही दुरुपयोग केला नाही. या पदावर कार्य करत असताना कधीच त्यांनी आपल्या सहकार्यांना अपमानास्पद वागणूक दिली नाही. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी कधीही सहकाऱ्यांना तणावात ठेवली नाही. ज्येष्ठतेने कधीकधी अहंकाराची भावना निर्माण होते परंतु त्यांनी त्याला मूठ माती दिली. त्यांचा महाविद्यालयातील उपप्राचार्य म्हणून वावर हा आश्वासक होता. फलभाराने कोणतेही झाडे झुकलेले दिसते परंतु त्याला आलेला फळामुळे ते अधिक अधिक उठून दिसते. तशी समाजातील नम्र माणसे जरी झुकलेली दिसली तरी त्यांच्याकडे असलेल्या नम्रतेने ती अधिक उठून दिसतात. फुलांकडे जशी पाखरे आकर्षित होतात तशी माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात. जी माणसे समाजात ताठ असतात, नम्र नसतात ती माणसे कितीही उच्च विद्याविभूषित असली आणि कोणत्याही पदावर कार्यरत असली तरी कालांतराने लोक त्यांना विसरून जातात. माणूस म्हणून प्रत्येकाची काही एक ओळख असते आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक माणसे जोडली. व्यक्ती कोणाच्या सानिध्यात सहवासात आहे व त्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीचे संस्कार काय आहेत, यावर व्यक्तीच्या जीवनाची जडणघडण होत असते.
   सर, टी-टाईमला स्टाफरूम मध्ये आल्यानंतर कोणत्याही खुर्चीवर अगदी शांतपणे बसायचे. स्टाफरूम मध्ये त्यांनी कधीही निरर्थक बडबड केली नाही, कोणत्याही सहकाऱ्याची चेष्टा- कुचेष्टा त्यांनी कधीही केली नाही. कोणत्याही सहकाऱ्यांची माघारी चेष्टा-कुचेष्टा करताना मी कधीही ऐकले नाही आणि पाहिलेही नाही. कोणत्याही सहकाऱ्याची प्राचार्याकडे तक्रार घेऊन जाताना मी कधीही पाहिली नाही. सरांचा मला आणखी एक गुण आवडला तो म्हणजे त्यांच्याकडे असलेला दातृत्वपणा. आज समाजात दानशूर व्यक्ती फारच कमी आढळतात, पैसा हा तसा संवेदनशील विषय. परंतु सर आपल्या सहकाऱ्यावर पैसा खर्च करताना कधीही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मी खूप वेळा अनुभवलेले आणि ऐकलेले आहे की कोठेही प्राध्यापकांची सहल गेली तर सर त्या सहलीचा सर्व खर्च करतात. मला आठवते मागील वर्षी वरिष्ठ विभागातून टी-क्लब साठी पैसे मिळाले नव्हते त्यावेळी एक महिनाभर सरांनी स्वतः पैसे दिले होते परंतु त्यांनी त्याचा एक शब्दही कोठे उच्चारला नाही. नोकरीत नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांना दररोज सकाळी स्वतःच्या पैशाने नाश्ता देणारे प्रा. ए.जी. खोत एक वेगळेच व्यक्तिमत्व! सरांनी या महिन्यात अलंकार हॉटेलमध्ये सर्व स्टाफ साठी दिलेले स्वादिष्ट आणि रुचकर जेवण आजही आठवते पण त्यापेक्षाही आपल्या समाजशास्त्र विभागात अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलेले त्यांनी आमंत्रण खूपच मनाला भावते. आज विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद हरवत चालला आहे आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अबोला निर्माण झालेला आहे. परंतु खोत सर हे विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले.
   आणखी एक सरांची गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे त्यांचे आपल्या समाजशास्त्र विभागातील सहकाऱ्याबद्दल असलेले एक सुंदर नाते. स्त्रियांच्याबद्दल असणारा एक त्यांचा अतिव आदर. आजच्या काळात एकाच विभागात कार्यरत असणारे विभागप्रमुख आणि सहकारी यांच्यात बऱ्याच वेळा कडवट नाते असते. परंतु एक विभागप्रमुख कसा असावा, याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा. ए. जी. खोत. आपल्या सहकाऱ्या बरोबर कसे वागावे, व्यवहार कसा करावा हे खोत सरांच्या कडून शिकायला खूप मिळते. प्रा. दिपाली यांना स्वतःच्या मुलीप्रमाणे, एका छोट्या बहिणी प्रमाणे त्यांनी जपले. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात काम करताना खूपच असुरक्षित वाटते, परंतु खोत सरांना स्त्रियांच्या बद्दल प्रचंड आदर असल्यामुळे प्रा. दिपाली यांनी तो विभाग सक्षमपणे पुढे नेत आहेत. एकाच विभागात कार्यरत असणाऱ्या एका सहकाऱ्याने आपल्या विभाग प्रमुख निवृत्त होत असताना दुसऱ्या जवळ काढलेले गौरवास्पद उद्गार, "खोत सर एक नंबर माणूस आहे". खोत सर  आजपर्यंत सेवा केल्याची हीच तुमची पोचपावती. निवृत्त होत असताना जाता जाता ही पोचपावती मिळवणे आज खूप अवघड गोष्ट होत चालली आहे.
    असा हा माणसाचा देव माणूस आज सेवानिवृत्त होत आहे. खोत सर आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! सेवानिवृत्तीनंतरचे तुमचे आयुष्य निरोगीमय आणि शतायुष्य होवो ईश्वरचरणी प्रार्थना!

       "अशी पाखरे येती
       स्मृती ठेवूनी जाती,
       हेचि दान देगा देवा
       प्रा. खोत सरांचा विसर न व्हावा"


       प्रा. सुरेश यादव.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.


शुक्रवार, २८ जुलै, २०२३

कराड - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड बसस्थानकाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा मार्गी


 


कराड: सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास  आणून देण्यासाठी व कराड बसस्थानक साठी निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत सूचना देखील मांडली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले कि, स्टीलचे बेंचेस वेल्डिंग करून पुन्हा तुटण्याची शक्यता असल्याने त्याऐवजी त्याठिकाणी आरसीसी बेंचेस तयार केले जातील व हे काम तातडीने केले जाईल. तसेच बसस्थानकाच्या तळघरामधील पार्किंगमध्ये पाणी साठते सदरचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचेसुद्धा आदेश दिले जातील.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात विशेष निधीची तरतूद करून जवळपास रु. ११ कोटी इतका खर्च करून कराडकरांच्या सोयीसाठी नवीन बसस्थानक बांधले गेले कराड तालुक्यातील सर्वच नागरिकांना अत्यंत प्रशस्त व सुविधायुक्त बस स्थानक त्यांच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे मिळाले. परंतु काही वर्षातच येथील स्टीलच्या खुर्च्यांची मोडतोड झाली. ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले हि बाब आ. चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासनाकडून येथील बसस्थानक पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्यासाठी व निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले, तसेच अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बसस्थानकाच्या विकासाबद्दल ठोस निर्णय घेऊन आदेश दिले आहेत.
 ----------------------------------------------------------------------------

पाटण - वृक्ष लागवड करणे आज काळाची गरज-पी.एल.केंडे सर यांचे प्रतिपादन

 वृक्ष लागवड करणे आज काळाची गरज-पी.एल.केंडे


 
पाटण-जागतिक वन संवर्धन दिनाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये आज वनौषधी वृक्षाचे वृक्षारोपण शालेय परिसरांत  विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर यांचे शुभहस्ते करण्यात आले,त्यावेळी ते म्हणाले की, दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे मानवांने स्वत:च्या सुख-सोयीसाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड आज मानवाला दयावे लागत आहे,त्यामुळे वृक्ष लागवड करणे आज काळाची गरज आहे, या कार्यक्रमांच्या निमित्ताने विज्ञान शिक्षक श्री.एन.एस.कुंभार सर,श्री.एस.डी.शेजवळ सर, श्री.डी.बी.माने सर, श्री.आर.आर.मोरे सर,श्री.टी.व्ही शिंदे सर यांनी मनोगते व्यक्त केली,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.व्ही.ए.घोणे सर यांनी केले तर आभार सौ.पवार व्ही.एन.यांनी मानले, यामकार्यक्रमांच्या निमित्ताने विदयालयातील हिंदी विषय शिक्षक श्री.व्ही.एच.लोहार सर यांनी झाड लावू चला गड्यानों या गीतातून सर्वांना मंत्रमुग्ध केले,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.

गुरुवार, २७ जुलै, २०२३

काळगावसह परिसरात रोपा लावणीच्या कामाला सुरुवात

काळगावसह परिसरात रोपा लावणीच्या कामाला सुरुवात

तळमावले/वार्ताहर
काळगांव खोऱ्यात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. याशिवाय कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची विविध पीके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पाणी आहे. अशा ठिकाणी धूळवाफेवरील भाताचे पीक व ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे अशा ठिकाणी भात लावणीचे बी घेण्यात येते. सध्या सर्वत्र भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे.
प्रतिवर्षी या विभागातील मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी नोकरीस असलेला चाकरमानी या कामासाठी हमखास हजर राहतो. जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न या लोकांचा दिसून येतो. तसेच यंदा आतापर्यंत पावसाने चांगल्या पध्दतीने साथ दिल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला आहे.
धूळवाफेवरील पेरणी पूर्ण केल्यानंतर पावसाची उघडीप दिल्यामुळे भांगलणी, कोळपणी अशी कामे लोकांनी उरकली आहेत. दरम्यान, याच कालावधीत भात लावणीसाठी तरवा देखील टाकला जातो. तरवा टाकण्यापूर्वी संबंधित क्षेत्र शेतातील घाण, शेणी, पालापाचोळा टाकून पेटवले जाते. त्यानंतर त्यात भाताचे बी टाकून तरवा तयार केला जातो. त्यानंतर संबंधित रानात पाणी सोडले जाते. पाणी सोडून ते पुन्हा नांगरले जाते. त्यात चिखल तयार करतात. त्यानंतर लाकडी दात असलेल्या शेती औजाराने ते शेत एकजीव केले जाते. त्यात अगोदरच्या दिवशी उपटलेल्या तरव्याची रोपे रोवली जातात. या संपूर्ण क्रियेस रोपा लावणी किंवा भात लावणी म्हणतात. सध्या या भात लावणीच्या कामाला वेग आलेला दिसून येत आहे. भात लावणीसाठी शेतकऱ्याला हवा तास पाऊस या भागात मिळाल्याने शेतकरी देखील सुखावला आहे.

__________________________________________________________________________



भात लावणीच्या या पध्दतीस आमच्याकडे रोपा लावणे असे म्हटले जाते. प्रचंड मेहनत करावी लागणारी ही प्रक्रिया आहे. परंतु या पध्दतीमुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळते. त्यामुळे आम्ही ही पध्दत वापरतो. एका औताच्या पाठीमागे किमान 8 माणसे तरी लागतात. 2 औत धरण्यासाठी, 2 बांध धरण्यासाठी व 4 भात लागण करण्यासाठी. अजूनपर्यंत तरी या कामासाठी पैरा पध्दत आमच्याकडे आहे. यामुळे लोकांच्यातील एकोप्याची भावना देखील दृढ होत आहे.
-भरत डाकवे, शेतकरी

भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई होणारमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

 भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई होणार

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.



 कराड: राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. आ. चव्हाण यांच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच कायद्यात योग्य ते बदल केले जातील तसेच उपस्थित केलेल्या नाशिकच्या भ्रष्ट शिक्षणाधिकार्‍यापासूनच ई डी अंतर्गत कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल. असे आश्वासन दिले.

नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते या घटनेची माहिती देताना शिक्षण विभागात अशा प्रकारचे विविध ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सभागृहाला दिली. याबाबत सबंधित भ्रष्ट अधिकार्‍यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने सरकार हतबल असल्याचे चित्र समोर येत आहे. नाशिकच्या प्रकरणात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी जे पत्र लिहले होते त्यामध्ये 72 भ्रष्ट अधिकार्‍यांपैकी 36 शिक्षणाधिकारी आहेत. या भ्रष्टाचारी  अधिकार्‍यांची चौकशी केली तरी त्यांना पुन्हा पदावर घ्यावे लागते असे निदर्शनास आणले. यामध्ये 2 प्रश्न माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. यामध्ये विधिमंडळाचा कायदा करून काही बदल करता येईल का? ज्यांच्या चौकश्या झाल्या त्यांनाच पुन्हा पदावर घ्यायचे हे काही योग्य होणार नाही. असे प्रकरण घडले असल्याचे सरकारने मान्य केले आहे. तरी अशा घटना घडत असताना यावर ठोस कारवाई न केल्याने संपूर्ण विधिमंडळाची हतबलता यामध्ये दिसून येते.  असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित केला. तसेच नाशिक च्या केस मध्ये त्या शिक्षणाधिकार्‍याच्या घराची लाचलुचपत विभागाने झडती घेतली असताना 50 लाख रुपयांची रोकड 32 तोळे सोने, आणि एका बँक अकाऊंटवर 32 लाख रु तसेच काही आलीशान फ्लॅट अशी माहिती समोर आली. या घटनेची माहिती देत आ. चव्हाण यांनी  मागणी केली की, अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना कडक शासन करण्यासाठी आपल्या कायद्यात कडक तरतुदी कराव्यात तसेच या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची मनी लौंडरिंग अंतर्गत कारवाई केली जावी.

आ. चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य व गंभीर स्वरूपाची आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कायद्यात बदल करून त्याच व्यक्ति पुन्हा त्या ठिकाणी येणार नाहीत व कायद्याची पळवाट शोधून मिळते म्हणून त्या भ्रष्टाचारी लोकांनी त्या त्या ठिकाणी काम करणे योग्य नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना नियुक्त केले जाणार नाही तसेच ई डी अंतर्गत करवाईसाठी नाशिकच्या भ्रष्ट अधिकार्‍याचीच पहिली हीच केस ई डी कडे पाठवली जाईल अशी ग्वाही सभागृहाला व प्रश्न उपस्थित केलेल्या आ. चव्हाण यांना फडणवीस यांनी दिली.


मंगळवार, २५ जुलै, २०२३

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

 


पुणे, दि. २५ : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

राज्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून या खरीप हंगामात २४ जुलै २०२३ पर्यंत प्रत्यक्षात ४५७.८ मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के एवढा पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून २४ जुलै २०२३ अखेर प्रत्यक्षात ११४.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर ८१ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला असून प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. २४ जुलै पर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची ४४.०८ लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची ३९.८८ लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची ९.६६ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची ६.६९ लाख हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

चालू खरीप हंगामाकरीता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १९.३० लाख क्विंटल (१०० टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवावेत, असेही कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी १८००२३३४००० हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक असून शेतकरी बांधवांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

काळगांव : संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे यांची निवड



 


काळगांव / वार्ताहर : चंद्रकांत मोडक
सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याचे संजय गांधी सामाजिक अर्थसहाय्ययोजनेनुसार वित्तीय सहाय्य मागणीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करुन निर्णय घेणेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.


गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांनी यापूर्वी काळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे. गोटुगडे हे सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीमुळे विभागातील महिलांना त्यांच्या पदाचा लाभ मिळेल. 


या निवडीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, गटनेते पंजाबराव देसाई, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव बावडेकर, बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, विशाल पवार, कृष्णत पाचुपते, उपसरपंच शिवाजीराव पवार, उपसरपंच वसंत देसाई व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामपंचायत धामणी, काळगांव, कुंभारगांव गण यांच्यावतीने देखील गोविंदराव गोटुगडे यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापर !

 

सातारा  : टोळेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने मोबाईल फोन बंद झाला.  त्यामुळे नव्यानेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर केला.
 
संबंधित गावाचे ग्रामस्थ यांनी देखील सदर फोनवरून संबंधित अधिकारी यांचेशी चर्चा करून माहिती दिली.  नैसर्गिक आपत्ती दरम्यान सॅटेलाईटच्या फोनचा ग्रामस्थांनी सक्षमपणे वापर केल्याने समाधान व्यक्त होत आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून  सदर गावातील  नागरिकांना गावाजवळच्या मंदिरात किंवा  लगतच्या सुरक्षित ठिकाणी किंवा पाटण मधील शाळेत थांबण्याबाबत उपविभागीय अधिकारी श्री. गाडे यांनी सूचना दिल्या.  
 
त्याप्रमाणे  तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
यापूर्वी त्या डोंगरकडाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेली आहे. मात्र पाऊस सुरू असल्याने या कड्याची  तांत्रिकदृष्ट्या पाहणी  करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या संबंधित विभागाला उपविभागीय अधिकारी यांनी सूचना दिल्या

टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापर !

*पाटण - दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू*

*दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू* 
पाटण-बाळासाहेब देसाई फौंडेशन संचलित,दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्था दौलतनगर व शिवाजीराव देसाई औदयोगिक प्रशिक्षण संस्था दौलतनगर येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून दौलत औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत  इलेक्ट्रिन्शन,मोटार मॅकेनिकल,सव्हेअर,वेल्डर,फिटर, हे कोर्सेस अाहेत,तर शिवाजीराव देसाई औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिन्शन, फिटर,ड्रायव्हर कम मॅकेनिकल,स्मार्ट फोन हे विविध कोर्सेस शै. वर्ष 2023-2024 पासून सुरू केलेले असून प्रशिक्षण संस्थेची सुसज्ज इमारत, तज्ञ व अनुभवी निदेशक, निसर्गरम्य परिसर, ,भव्य कार्यशाळा, उज्ज्वल निकालाची परंपरा,विदयार्थ्यांना विशेष मार्गदर्शन, डिजिटल क्लासरूम ,तज्ञ व्यक्तीचे विशेष मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा केंद्र,मोफत वाय-फाय सुविधा, विविध कंपनीच्या माध्यमातून विदयार्थ्यांना नोकरी मेळावे, अनेक माजी विदयार्थी देशात-परदेशात नोकरीच्या संधी तरी आजच आपला प्रवेश निश्चित करा‌वा,असे आवाहन बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.नथुराम कुंभार व प्राचार्य श्री.गणेश सत्रे यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे केलेले आहे.

रविवार, २३ जुलै, २०२३

इर्शाळवाडीच्या मदतीसाठी सरसावतोय कुंचला

इर्शाळवाडीच्या मदतीसाठी सरसावतोय कुंचला
तळमावले/वार्ताहर
रायगड जिल्हयातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशा उपक्रम राबवला आहे. इर्शाळवाडीच्या दुःखावर मायेची फुंकर घालण्यासाठी डाॅ.डाकवे यांचा कुंचला सरसावला आहे
या उपक्रमांतर्गत आपल्याला हव्या असलेल्या नावात अक्षरगणेशा डाॅ.डाकवे यांच्याकडून रेखाटून घ्यायचा आणि त्या बदल्यात आपण त्यांना कलाकृतीने मुल्य रु. 1,000/- च्या वरती कितीही आपल्या इच्छेनूसार द्यायचे. अक्षरगणेशांना मिळणारे मुल्य थेट इर्शाळवाडीच्या आपत्तीग्रस्तांना देण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अक्षरगणेशा आणि डिजिटल कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे सदर अक्षरगणेशा आपल्याकडे संग्रही राहिलच परंतू आपण रेखाटून घेतलेल्या कलाकृतीचे मुल्य आपत्तीग्रस्त बांधवाना मदतीचा हात दिल्याचे आत्मिक समाधान कायम आपणास देत राहील हे नक्की.
डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी अक्षरगणेशा व कलेच्या माध्यमातून सुमारे एक लाखापर्यंत रोख स्वरुपात आर्थिक मदत तसेच एक लाखाहून जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य विविध शाळांना दिले आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे त्यांचे प्रांजळ मत आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम गुरुवार दि.28 सप्टेंबर, 2023 अनंतचतुर्दशी अखेर चालणार आहे.
नेहमीच नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाप्रती आपले दायित्व निभावण्याचा डाॅ.डाकवे प्रयत्न करत असतात. संदीप डाकवे हे 18 वर्षा पासून अक्षरगणेशा रेखाटत असून अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष आहे.
या उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे व्दारे जमा करायचे आहेत.
श्रीरामाने सेतु बांधताना खारुताईनेही सेतुमध्ये चिमुट चिमुट माती टाकल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. आज आपत्तीग्रस्तांना अशाच मदतीची गरज आहे. एक कलावंत म्हणून मी कलेच्या माध्यमातून असे अक्षरगणेशरुपी योगदान देवू शकतो. या प्रयत्नांना समाजाचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.

बुधवार, १९ जुलै, २०२३

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

 

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा



मुंबईदि.19 : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओरॉयल पामगोरेगाव (पूर्व)मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी  २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८  वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्रतसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोनडिजीटल घड्याळइलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत. जर उमेदवारांनी बॅगा आणल्यास त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवण्यात याव्यात. या बॅगा व त्यातील मौल्यवान व इतर वस्तू गहाळ किंवा चोरीस गेल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाहीयाची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिकाउत्तरपत्रिकाकाळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही लेखी परीक्षा नि:पक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये. तसेच ही बाब निदर्शनास आल्यास तत्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावाअसे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे समादेशक प्रणय अशोक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

मंगळवार, १८ जुलै, २०२३

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर २७ कोटींच्या निधीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागणार

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर २७ कोटींच्या निधीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागणार

कराड : प्रतिनिधी 
    सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांसह, पुल व अन्य विकासकामांसाठी केलेल्या पाठपुरव्यातून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागणार आहेत.
      खटाव तालुक्यातील वडगाव ज.स्वामी येथे कुरणवस्ती रस्ता ग्रा.मा.२७९ वर नांदणी नदीवर मोठा पूल बांधणे कामासाठी ८ कोटी ५० लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे.
    कोरेगाव तालुक्यातील सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी १६/०० ते १७/५०० ( भाग तारगाव पूल ते तारगाव रेल्वे स्टेशन) चे रुंदीकरण व सुधारणा करणे २ कोटी रूपये. 
      सासपडे निसराळे तारगाव वाठार आर्वी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ किमी २२/०० ते २५/०० (भाग वाठार ते इंगळे वस्‍ती) मधील लांबीचे रुंदीकरण व सुधारणा करणे ३ कोटी रूपये.
     कराड तालुक्यातील रा.मा.१४८ रेठरे खुर्द आटके पाचवड कटपान मळा गोळेश्वर कापील गोळेश्वर कार्वे नाका रस्ता प्रजिमा ८१ किमी ७/०० ते ८/४०० या लांबीत रस्त्याच्या दोन्ही बाजूस आरसीसी गटर बांधणे २ कोटी १० लक्ष रूपये. 
    रा.म.मा.१६६ ई वसंतगड ते तळबीड वराडे हनुमानवाडी शिवडे रस्ता किमी ०/०० ते २/५०० ची सुधारणा करणे २ कोटी रूपये. 
    साकुर्डी बेलदरे तळबीड तासवडे शिरवडे करवडी रस्ता प्रजिमा ६१ किमी ५/०० ते ९/०० पुनर्बांधणी करणे (भाग नाईकबा मंदिर ते तळबीड) ३ कोटी रूपये.
    पाटण मणदुरे पाल काशिळ रस्ता रा.मा.३९८ किमी ३८/०५० व ३८/१०० मधील मोठ्या उंच जीर्ण पुलाची पुनर्बांधणी करणे २ कोटी रूपये. 
    प्रजिमा ५७ ते शिरगाव पेरले खराडे पाडळी हेळगाव रहिमतपूर प्रजिमा ३९ किमी ५/०० ते ७/७०० रस्त्याचे मजबुतीकरण व सुधारणा करणे (भाग रा.म.४ ते पेरले) २ कोटी ५० लक्ष. 
     कालगाव खराडे कवठे कोणेगाव शिरवडे रस्ता प्रजिमा ८३ किमी १०/७०० ते १३/७०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (भाग मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगाव) २ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्यशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

सोमवार, १७ जुलै, २०२३

स्वाती गोडसे राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने सन्मानित

 स्वाती गोडसे राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने सन्मानित

 


तळमावले/वार्ताहर

इंद्रधनु विचार मंच फाउंडेशनच्यावतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंतीनिमित्त गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023 टेंभू ता.कराड येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार सुप्रसिध्द वृत्तनिवेदिका स्वाती पांडुरंग गोडसे यांना सातारा लोकसभा मतदार संघ व सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधारक शिक्षण संस्था टेंभूचे सचिव प्रकाश पाटील, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभू गावचे सरपंच युवराज भोईटे, डाॅ.संदीप डाकवे, गोपाळ गणेश आगरकर विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी कराड पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाती गोडसे यांनी यापुर्वी पुणे आकाशवाणी, दुरदर्शनच्या कृषीवार्ता या बुलेटीनचे अँकरींग, झी 24 तास, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांवर न्यूज अँकर म्हणून काम केले आहे. झी टाॅकीजच्या गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या आषाढी वारी विषेश कार्यक्रमाचेही सुत्रसंचालन केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूर वारी लोकांपर्यत पोहोचवण्याचे काम केले आहे.
याशिवाय स्वाती गोडसे यांना क्रीएटीव्ह डान्ससाठी पुणे विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या हस्ते मेडल मिळाले आहे. तसेच 42 विद्यापीठांमधून नंबर आला म्हणून गुजरात विद्यापीठाने करंडक देवून त्यांच्या कलेचा गौरव केला आहे. वृंदावन फाउंडेशनचा आधुनिक दुर्गा, अभंग पुरस्कार असे अनेक पुरस्कार गोडसे यांना मिळाले आहेत.
       सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे व अन्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वाती गोडसे यांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मंदा शेजवळ मंत्रालय सहाय्यक पदी निवड

 मंदा शेजवळ मंत्रालय सहाय्यक पदी निवड 

 



पाटण- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाची माजी विदयार्थिनी कु.मंदा हणमंतराव शेजवळ ह्या विदयार्थिनीची नुकतीच MPSC मार्फत अराजपत्रित परीक्षा 2021 मध्ये मंत्रालय सहाय्यक पदी निवड झालेली आहे,मंदा शेजवळ  विदयार्थीनीचे इ.5वी ते इ.10पर्यंतचे शिक्षण या विदयालयात झाले असून 2015 साली एस.एस.सी परीक्षेत तिने 91.00% गुण मिळवून विदयालयात प्रथम क्रमांक पटकिवलेला होता,

विदयालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत असताना पहिल्यापासून तिला शासकीय नोकरी मिळविण्याची जिद्द होती ,ते ध्येय तिने स्पर्धा परीक्षेतून मिळविले या तिच्या अतुलनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.  रविराज देसाई दादा ,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कामखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई  आदित्यराज देसाई तसेच सचिव श्री.डी.एम.शेजवळ व आजी माजी विदयार्थी,पालक यांनी तिचे अभिनंदन केले,या तिच्या यशाबद्दल विदयालयाच्या वतीने शाल,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले तर आभार श्री.मदने जे.एस.यांनी मानले,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.

बुधवार, १२ जुलै, २०२३

श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांच्या कडून जि.प. प्राथमिक शाळा शिद्रूकवाडी (खळे) येथे शालेय साहित्य चे वाटप

श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांचा कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिद्रूकवाडी (खळे) येथे शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले.मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो हा मूलमंत्र लक्षात घेता, गरजू विद्यार्थ्यांना मोफत  शालेय साहित्य मिळावे, या दृष्टीकोनातून श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांचा कडून
 "मोफत शालेय साहित्य वाटप" हा अभिनव राबवीला आहे.
आपल्या भागातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व अभ्यासाचा सराव करताना शालेय उपयोगी साहित्य कमी पडू नये. अनेक पालकांना सर्व साहित्य घेणे शक्य नसते हि गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक , मॅडम आणि हनुमान तरूण मंडळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...