प्रलंबित अविवादीत बदल अर्जाच्या जलद निपटाऱ्यासाठी दि. 13 ते 24 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिम
शाळा, मंदिर, न्यास, देवस्थाने अशी विविध प्रकारच्या संस्थामध्ये विश्वस्त मंडळात झालेले बदल होणार दुरुस्त
सातारा दि. 9 : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 22 नुसार प्रलंबीत असलेल्या बिनविरोध बदल अर्ज प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी दि. 13 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी दिली.
शाळा, मंदिर, न्यास, देवस्थाने अशी विविध प्रकारच्या संस्था धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असतात. या संस्थामध्ये विश्वस्त मंडळ बदल झाल्यानंतर बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) सादर करुन त्याला मान्यता घ्यावी लागते. मात्र, अनेक प्रकरणे अविवादीत असतानाही प्रलंबीत राहतात. त्याचा तात्काळ निपटारा या मोहिमेद्वारे होणार आहे. या मोहिमेची नोटीस सातारा धर्मादाय कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच ज्या प्रकरणात संबंधित पक्षकाराने स्वत: बदल अर्ज दाखल केलेले आहे त्यांनी सुध्दा या बदल अर्जात समक्ष हजर राहून त्यांच्या बदल अर्जाचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात अशा अविवादीत प्रलंबीत प्रकरणांची संख्या 900 पेक्षा अधिक आहे. या विशेष मोहिमेत वकील व पक्षकार यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा श्रीमती ज्योती यादव यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा