खतांची दरवाढ मागे घ्या : खा.श्रीनिवास पाटील
भारत सरकारने खतांच्या वाढीव किंमती तात्काळ मागे घ्याव्यात व मागील दरानेच शेतक-यांना खते उपलब्ध करुन द्याव्यीत
कराड : प्रतिनिधी
देश कोरोना महामारी विरोधात गत वर्षापासून लढाई करत आहेत. या लढ्यात शेतकरी बांधव कुठेही मागे राहिले नाहीत. तर अशा गंभीर संकटकाळात अन्नधान्य व खाद्यपदार्थांची कमतरता त्यांनी जाणवू दिलेली नाही. मात्र नैसर्गिक आपत्ती, लॉकडाऊन व अन्य कारणाने शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतक-यांना आधार देण्याऐवजी खतांच्या किंमतीत वाढ करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने यामुळे शेतीचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडेल. त्यामुळे खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्या अशी विनंती केंद्रीय कृषिमंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय खत आणि रसायन मंत्री ना. सदानंद गौडा यांना खा. श्रीनिवास पाटील यानी पत्राद्वारे केली आहे.
खा.श्रीनिवास पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, देश मागील वर्षभरापासून कोविड-19 या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. या लढ्यात माझा शेतकरी बांधव कुठेही मागे राहिलेला नाही. तोही सर्वांच्या खांद्याला खांदा लावून निर्भयपणे या महामारीचा सामना करीत आहे. गेल्या वर्षी अत्यंत कठीण परिस्थितीतही जिथे इतर सर्व क्षेत्रातील उत्पादन वेगाने घसरले आहेत तिथे भारतातील या मेहनती शेतकरी समूहाने देशाला अन्नधान्य व खाद्यपदार्थांची कमतरता जाणवू दिलेली नाही. कृषी उत्पादन टिकविण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
मात्र वारंवार घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे कृषी पणन यंत्रणेत व्यत्यय आल्याने तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी थोड्या प्रमाणात का होईना दिलासा व अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे आशा लावून बसला आहे. परंतु दुर्दैवाने सरकारने त्यांची घोर निराशा केली आहे. कृषी क्षेत्राला दिलासा देण्याऐवजी सरकारने खतांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी असून परिणामी शेतकरी समाजात सरकार विरूध्द व्यापक असंतोष खदखदत आहे. पावसाळा अगदी जवळ आला असून खरीप हंगाम तोंडावर आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र खते व कीटकनाशकांच्या या वाढीव किंमतीचा थेट शेती उत्पादनावर विपरित परिणाम होऊन अन्नधान्याच्या किंमती वाढतील व देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांचे जगणे पुरते असहाय्य होईल. नैसर्गिक आपत्ती आणि सध्या सुरू असलेल्या कोविड-19 या साथीच्या आजारामुळे शेतक-यांना उच्च किंमतीची खते खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे भारत सरकारने खतांच्या वाढीव किंमती तात्काळ मागे घ्याव्यात व मागील दरानेच शेतक-यांना खते उपलब्ध करुन द्याव्यीत, सद्यस्थितीत अडचणीत आलेल्या शेतक-यांना सरकारने मदत करावी. अशी विनंती खा. पाटील यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा