मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांनी बनवलेल्या पहिल्या स्वदेशी विमानाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता हे विमान आकाशात अधिकृतरित्या घिरट्या घालण्यास सज्ज झाले आहे. अमोल यादव यांचा विमान बनवण्याचा संघर्ष 2009 पासून सुरु होता. विमानाच्या निर्मितीपेक्षा शासकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे या विमानाच्या उड्डाणास विलंब लागला आहे. आता या विमानाला लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. (Captain Amol Yadav manufacture six-seater aircraft)
सध्या जगभरातील विमानतळाहून हवेत झेपावणारे एकही विमान भारतीय बनावटीचे नाही. भारतात होणारी प्रवासी विमान वाहतूक ही परदेशी बनावटींच्या विमानातून होते.मात्र स्वदेशी बनावटीचे विमान असावे हे स्वप्न कॅप्टन अमोल यादव नावाच्या अवलियाने बघितले आणि सत्यात देखील उतरवले.
विमानाची निर्मिती करणं हे कॅप्टन अमोल यांच्यासाठी सोप्प नव्हतं. एकीकडे मोठ्ठी आर्थिक तजवीज करावी लागणार होती. आईच्या मंगळसुत्रापासून, भावाचे घर गहाण ठेवून त्यांनी विमान बनवले. तर दुसरीकडे देशातील बाबूगिरीला सामोरं जावं लागणार होतं. विमानाच्या कायदेशीर प्रक्रियांना साधारण वर्षभराचा कालावधी अपेक्षित होता. मात्र लालफीतशाही आडवी आली. त्यामुळे अमोल यादव यांची कित्येक वर्ष खर्ची गेली.
विमाननिर्मिती लालफीतशाही अडकली होती. विमानाचे उड्डाण परवानग्यामध्ये, तर निर्मितीसाठी मंजूर करण्यात आलेली जमीन कायद्याच्या वादात अडकली होती. मेटाकुटीस आलेल्या अमोल यादव यांना हा प्रकल्प अमेरिकेत हलवावा अशी ऑफर अमेरिका सरकारने दिली होती. मात्र देशाप्रती असलेल्या निष्ठेपोटी त्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला.
पहिल्या विमानाची निर्मिती पूर्ण झाली आहे. प्रवाशांना घेऊन उडण्यास हे विमान सज्ज आहे. सगळ्या परवानग्या मिळालेले या विमानाला अद्याप डीजीसीएच्या हिरव्या क़ंदीलाची अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा