लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दौलतनगर (ता. पाटण) येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरले आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथिनिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. यावेळी देसाई बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे आदी उपस्थित होते.
दौलतनगर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभागा बरोबरच इतर विभागांनीही स्टॉल उभे करून शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यावी. पाटण तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतात. या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल याची माहिती असणारा स्वतंत्र स्टॉल उभा करून प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या ऊस पीक कसे घ्यावे, याचे प्रात्यक्षिकही या प्रदर्शनामध्ये दाखविण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पीक स्पर्धांचेही आयोजन करण्यात यावे.
कृषी प्रदर्शनाचे मोठ्या स्वरूपात आयोजन करावयाचे असल्याने निधीसाठी प्रस्ताव कृषी विभागाने पाठवावा. निधीसाठी लवकरच कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊ, असेही वित्त व नियोजन राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा