पाटण तालुक्याला हादरवून टाकणाऱ्या महाभयंकर पावसात चार वर्षांपूर्वी मिरगाव, आंबेघर खालचे-वरचे, जितकरवाडी, शिद्रुकवाडी या गावांना दरडीने गाठले.
झोपलेल्या गावांवर काळी छाया पसरली.
माणसं, घरं, संचित क्षणार्धात नष्ट झालं. या दुर्घटनेत सर्वात मोठी हानी मिरगावच्या मानकरी आणि गावपाटील बाकाडे कुटुंबीयांची झाली. या कुटुंबातील अनेक सदस्यांचे मृत्यू झाले. केवळ जीवितहानीच नव्हे तर वित्तहानीसुद्धा या कुटुंबावर कोसळली. त्यामुळे या दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला.
दरडग्रस्त ९८ कुटुंबांचे पुनर्वसन कोयनानगरजवळील जर्मन टेकडीवर, तर उर्वरित ४७ कुटुंबांचे पुनर्वसन इतर पर्यायी ठिकाणी करण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व दरडग्रस्तांना टुमदार डुप्लेक्स घरे मिळणार असल्याची माहिती पर्यटन व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
"तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मांडलेल्या दरडग्रस्तांच्या पुनर्वसन प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली. शासनाची संवेदनशीलता आणि जबाबदारी म्हणून या कामांवर गती देण्यात आली. त्यांचा विश्वास पुन्हा बसावा यासाठी शासन कटिबद्ध आहे," अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा