शनिवार, १९ जुलै, २०२५

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व सतत अतिवृष्टी  होणारा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ७५०  विद्यार्थ्यांना उर्मी सामाजिक संस्था पुणे व हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.,विवो पुणे यांचेवतीने रेनकोटचे वितरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटण येथे करणेत आले..त्याप्रसंगी हिसोवा संस्थेचे व्यवस्थापक प्रतिनिधी सौम्या बक्षी, रोहीत वाघळे, किरण जावळे, सुधीर अडमुठे, विवेक साळुंखे, उर्मी संस्थेचे किशोर पेडणेकर, राहूल चुनीदास, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख संजय आटाळे, राजेंद्र पाटील, नारायण बागल, सुनिता नांगरे, दिलीप शिंदे, संतोष होळ तसेच विवोचे वितरक शंकर हराळे व रणजीत सावंत हे उपस्थित होते..
पाटण तालुक्यातील अतिवृष्टीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाता-येता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, पावसापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड न पडता अध्ययन प्रकिया सुलभ व्हावी,यासाठी संस्थेकडून देणेत येणारे रेनकोट विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास आनंद पळसे यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला..
रेनकोट वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे प्रतिनिधी रोहीत वाघळे यांनी रेनकोटच्या माध्यमातून दिलेली मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फायदेशीर असून भविष्यातही संस्थेकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला..यावेळी पेडणेकर, चुनीदार यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात रेनकोटचे वितरण सर्व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते करणेत आले, तत्प्रसंगी सर्व उपस्थितांचे स्वागत केंद्रप्रमुख दिलीप शिंदे यांनी केले, बेलवडे केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री.संजय आटाळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार  भोसगांव केंद्रांचे केंद्रप्रमुख श्रीमती सुनिता नांगरे यांनी मानले..

अभिषेक पानस्कर यांची एम.टेक. या उच्च शिक्षणासाठी दिल्ली येथे निवड.

 अभिषेक पानस्कर यांची एम.टेक. या उच्च शिक्षणासाठी दिल्ली येथे निवड. 



सोनवडे:- 
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचा माजी विद्यार्थी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपडी या प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल पानस्कर सर यांचे चिरंजीव चि.अभिषेक यांची नुकतीच एम .टेक.साठी शासकीय आय.आय. टी. कॉलेज दिल्ली या ठिकाणी मेकॅनिकल  डिझाईनिंग या अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे. 
अभिषेक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडे येथे झाले असून माध्यमिक शिक्षण शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये झाले असून २०१७साली इ.१०वी मध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवला होता.
 अभिषेक यांची उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांचे  चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा, युवा नेते मा.जयराज देसाई दादा आदित्यराज देसाई दादा ,संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा, मोरणा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शरद शेजवळ सर व  सर्व शिक्षक वृंद,बेलवडे केंद्रांचे केंद्रप्रमुख श्री संजय आटाळे सर, सोनवडे गावचे ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी यांनी चि.अभिषेक पानस्कर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अण्णा भाऊ साठे हे थोर समाजसुधारक होते – श्री. शरद शेजवळ

 अण्णा भाऊ साठे हे थोर समाजसुधारक होते – श्री. शरद शेजवळ 


सोनवडे (प्रतिनिधी) – "अण्णा भाऊ साठे हे केवळ लोकशाहीर नव्हते, तर ते थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि कार्यातून दलित, वंचित आणि शोषित घटकांना आवाज दिला," असे प्रतिपादन शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ यांनी केले.
यापुढे ते म्हणाले की, "अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर समाज परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम होते. त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली." त्यांनी तरुण पिढीने अण्णा भाऊंच्या विचारांवर चालावे, असे आवाहनही केले.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांनी भाषण, गीत सादर केले.तसेच विद्यालयातील उपशिक्षक श्री. आनंदराव जाधव सर, श्री.सुरेश भिसे यांनी आपल्या भाषणांतून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उप शिक्षिका मणेर एस.एस.मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  श्री. संतोष कदम सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.


कोणेगाव शाळेला साउंड सिस्टिम व साहित्यांची भेट : शैक्षणिक प्रगतीस हातभार

 कोणेगाव शाळेला साउंड सिस्टिम व साहित्यांची भेट : शैक्षणिक प्रगतीस हातभार 


कोणेगाव, ता. कराड – शनिवार, दि. 19 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणेगाव येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. कै. रमेश व कै. सयाजी निवृत्ती चव्हाण यांच्या स्मरणार्थ पोर्टेबल साउंड सिस्टिम शाळेला भेट देण्यात आली. ही भेट श्रीमती सुजाता रमेश चव्हाण (रा. कोणेगाव) रेक्टर, यशोदा टेक्निकल कॉलेज, सातारा यांनी दिली.
तसेच ग्रामपंचायत कोणेगाव मार्फत १५व्या वित्त आयोग निधीतून शाळेसाठी दोन जलशुद्धीकरण यंत्र (वॉटर फिल्टर) व अन्य उपयुक्त साहित्य देण्यात आले. या सर्व वस्तूंच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम शाळेत उत्साहात पार पडला.
या वेळी सहारा मित्र समूह फौंडेशन, कराड चे अध्यक्ष श्री. शंकर निकम, उपाध्यक्ष श्रीमती सुजाता चव्हाण, सचिव सौ. शिल्पा देशपांडे, खजिनदार सुभेदार मेजर श्री. प्रभाकर काळे, कोणेगावचे सरपंच मा. रमेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अजय भोपते, उपाध्यक्ष श्री. संदीप धनवे, सदस्य श्री. निवास चव्हाण व श्री. संदीप चव्हाण, मुख्याध्यापक श्री. संजय नांगरे, शिक्षक श्री. कृष्णत हिरवळे, श्री. वसंत शेडे, श्री. रशीद तांबोळी, श्रीमती हर्षा कांबळे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमांचे प्रास्ताविकपर स्वागत मुख्याध्यापक श्री. संजय नांगरे सर यांनी केले तर आभार श्री.कृष्णत हिरवळे सर यांनी मानले.


 


कुंभारगाव - मोफत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न.

कुंभारगाव - मोफत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न
कुंभारगाव १६ जुलै २०२५ – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कुंभारगाव परिसरातील गरजू नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शिवसेना चांदीवली विभाग प्रमुख श्री. अशोक परशराम माटेकर व माजी नगरसेवक सौ अश्विनी अशोक माटेकर यांच्या वतीने बुधवार दिनांक १६ जुलै रोजी राबविण्यात आला.

या कार्यक्रमात सुमारे ५०० गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विशेषतः शेतकरी कामगार, महिला, तसेच वयोवृद्ध नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. तसेच चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडीवस्तीमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन छत्री वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री.दिलीप घाडगे श्री.धनाजी चाळके  शेडेवाडीचे सरपंच श्री. राहुल मोरे चाळकेवाडीचे माजी उपसरपंच श्री.भरतबापू  चाळके श्री.विशाल मोरे,श्री.तानाजी वरेकर ,श्री.कुणाल माने आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.दिलीप घाडगे म्हणाले, “गरजूंना मदत करण्याचा एक छोटा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला, तर आपल्याला हे कार्य व्यापक स्वरूपात राबवता येईल.”
 उपस्थित नागरिकांनी शिवसेना चांदीवली विभाग प्रमुख श्री. अशोक परशराम माटेकर व माजी नगरसेवक सौ अश्विनी अशोक माटेकर यांचे आभार मानले. 

कसणी परिसरातील पाच वाड्यांच्या पुनर्वसनास मान्यता.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यास यश।.

कसणी परिसरातील पाच वाड्यांच्या पुनर्वसनास मान्यता.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यास यश।.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निर्मितीत बफर झोनमध्ये समावेश केल्यानंतर दरवर्षी वन्य प्राण्यांमुळे कसणी परिसरातील पाच वाड्यावस्त्यांवर शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

त्यामुळेच कसणीखालील पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी मागील दोन दशके शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या विषयात लक्ष घातले होते. पालकमंत्री देसाई यांच्या पाठपुराव्यास यश आले असून पुनर्वसनास शासनाने मान्यता दिल्याची माहिती कसणीचे सरपंच महेंद्र गायकवाड यांच्यासह माजी सरपंच मारूती मस्कर यांनी दिली आहे.

याबाबत कसणीचे सरपंच महेंद्र गायकवाड, उपसरपंच बंडू व्हडे, माजी सरपंच मारूती मस्कर, सामाजिक कार्यकर्ते दगडू कदम व संदीप सराफदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट निनाईचीवाडी, सतीचीवाडी, मस्करवाडी, धनगरवाडा, बौद्धवस्ती या वाड्यावस्त्यामधील ग्रामस्थ, शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांचा उपद्रव सतत वाढत होता. या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या, गाई, वासरे, म्हैस असे प्राणी ठार होण्याचे प्रकार दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत होते. त्याचबरोबर गवे, डुक्कर, वानर, मोर व अन्य वन्य प्राण्यांकडून शेतीतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत होते. वारंवार होणारी हानी यामुळे स्थानिकांना जीवनच नकोसे झाले होते. तर धनगरवाडा कोअर झोनपासून शून्य मीटरवर असूनही बफर झोनमध्ये समावेश केल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आम्ही पुनर्वसनाची मागणी केली होती.

त्यानंतर ना. शंभूराज देसाई यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठविला होता. प्रस्तावाला तब्बल 5 वर्षा नंतर ना.शंभुराज देसाई यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर आज 17 जुलै रोजी मंजुरी मिळाली आहे.आज मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक, सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, अप्पर मुख्य सचिव वन विभाग, अप्पर मुख्य सचिव मदत व पुनर्वसन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) नागपूर, प्रधान मुख्य सचिव (वन्यजीव) नागपूर, वनसंरक्षक (प्राणी) पुणे, वनसंरक्षक (प्राणी) कोल्हापूर, उपवनसंरक्षक (प्राणी) कोल्हापूर, वनसंरक्षक तथा संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्रालयातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय...

मंत्रालयातील बैठकीत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ऑनलाईन सहभाग होते. बैठकीत पुनर्वसन पात्र वाड्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती जागा व जमीन उपलब्धता याबाबत पाटण व कराड प्रांताधिकारी, तहसीलदार पाटण यांना अवगत करण्यात यावे, असे सांगण्यात आले.

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कर्तृत्व पाहण्यासाठी मरळीच्या माळावर या...! शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार.

 

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कर्तृत्व पाहण्यासाठी मरळीच्या माळावर या...!

शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार.

 


 

           लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्याचे काम शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांनी हयातभर केले. शिवाजीराव देसाई यांचे कार्य समजून घेण्यासाठी पाटण मतदारसंघातील डोंगर कपारीत राहणाऱ्या गोरगरिब वयोवृध्द नागरिकांची भेट घ्या तसेच त्यांनी अविरत कष्टाने फुलविलेल्या मरळीच्या माळावर या म्हणजे तुम्हाला शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा अंदाज येईल, असे आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी  केले आहे. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने खा. संजय राऊत यांनी केलेल्या बेताल व अर्थहीन वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.

             स्व.शिवाजीराव देसाई यांच्यावर आपल्या वडिलांचा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता.मुंबईमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्येच व्यवसायास सुरूवात केली. व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले असतानाच लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी शिवाजीराव देसाई यांना पाटण मतदारसंघाची जबाबदारी देऊन तेथील गोरगरिब जनतेची सेवा करण्यास सांगितले. आपल्या पिताश्रींचा आदेश शिरसावंद्य मानून शिवाजीराव देसाई यांनी आपल्या व्यवसायाचा त्याग करून पाटणच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. पाटणमध्ये आल्यावर त्यांनी पाटण तालुक्यातील लोकांच्या हाती काम मिळावे, शेतमालाला हमीभाव मिळावा, ऊसासारखे शेतात पीक घेवून त्यांच्या हाती पैसा यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाजीराव देसाई यांनी मरळीच्या माळरानावर जिथं कुसळ उगवत नाहीत अशा ठिकाणी साखर कारखाना काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व केल्याने होत आहे रे.. आधि केलेची पाहिजे ...’ हा दूर दृष्टीकोन ठेवून त्यांनी लोकांच्या घरी जावून शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून १९७१-७२ साली पाटण तालुक्यात पहिला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना उभारला व अल्पावधीतच तो साखर कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा केला.

               पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे व त्यांचे मागासलेपण दूर व्हावे म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना केली परंतु त्यामध्ये राजकारण येताच शिवाजीराव देसाई यांनी सोनवडे या ठिकाणी १९८३ साली मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाची गंगा मोरणा शिक्षण संस्थेच्या रूपाने पाटण तालुक्यात सुरू केल्यानंतर स्व.शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्यातील मुलांना व्यवसायिक शिक्षण मिळावे तसेच दर्जेदार कारागीर निर्माण व्हावेत यासाठी मरळीच्या माळरानावर दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना १९८६ साली केली. आज मोरणा शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला असून हजारो मुलांचे भवितव्य या ठिकाणी घडत आहे. अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्याचा कायापालट करीत तालुक्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले.

                   स्व.शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी मरळीच्या माळावर या व स्वतःच्या डोळ्याने शिवाजीराव देसाई यांचे कार्यकर्तृत्व पहा असे आवाहन जयवंराव शेलार यांनी पत्रकाव्दारे करत फक्त मुंबईत बसून आपल्या नेत्याला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न बंद करा नाहीतर पाटणची जनता तेथे येऊन तुमच्या बुडाला आग लावल्याशिवाय शांत बसणार नाही, हे मात्र नक्की ! असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा.

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा).

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगर दि.18:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्येचांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2025-26 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाणृपांडूरंग नलवडे,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,लक्ष्मण बोर्गे, सर्जेराव जाधव,शशिकांत निकम,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,दिपाली पाटील,जयश्री कवर सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

               यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा) पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे. सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवणे हे लोकनेते बाळासाहेब देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये 205000 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.71% साखर उताऱ्याने 2,40,040 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिल मधील रोलरचे आज पूजन होत आहे. प्रतिवर्षी कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम करावे. आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...