गुरुवार, २९ जून, २०२३

तळमावले - विठू माऊलींच्या गजरात ‘शिवसमर्थ’ची आषाढी वारी उत्साहात

 विठू माऊलींच्या गजरात ‘शिवसमर्थ’ची आषाढी वारी उत्साहात


 


तळमावले/वार्ताहर
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात विठू माऊलींच्या गजरात वारीचे औचित्य साधून तळमावले येथे शिवसमर्थ चे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसा.लि; तळमावले च्या मुख्य कार्यालयात विठूरायाची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी कार्यालयामध्ये असलेल्या विठठल रखुमाई यांच्या मुर्तीसभोवताली नैसर्गिक फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. तसेच सुश्राव्य भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्य कार्यालयाच्या शुभारंभावेळी श्री विठ्ठल रखुमाई यांची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक एकादशीला कार्यालयामध्ये भजनाचे आयोजन केले जाते. तसेच घाडगेनाथ मंदीर कोळे येथे प्रसादाचे वाटप केले जाते. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे परंतू तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे" संस्थेच्या या ब्रीद वाक्यानुसार संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला अध्यात्माची जोडी लावण्याचे काम केले जाते आहे. पंढरपूर वारीला जाणाऱ्या काही दिंडींचे स्वागत संस्थेच्या माध्यमातून केले जाते. विभागातील पारायण मंडळे, सप्ताह यामध्ये योगदान देण्याचा संस्था व परिवाराचा नेहमी प्रयत्न असतो.
याशिवाय गेले काही वर्षापासून वाखरी ता.पंढरपूर येथे माउलींच्या तिसऱ्या उभ्या रिंगणाच्या वेळी संस्थेतील काही कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहतात. संस्थेच्या वतीने पंढरपूर वारी विषेशांक केला जातो त्याचे प्रकाशन आणि वितरण या ठिकाणी केले जाते.
दरम्यान, सौ.व श्री.दिलीप बोत्रे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, देवबा वायचळ, शिवाजी सुर्वे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, नितीन पाटील, रविंद्र पाटील, विलास घारे व मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
अभिषेक झाल्यानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थितांना डिंकांच्या लाडूंचे वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळच्या वेळेला सुश्राव्य भजन करण्यात आले. त्यामुळे संस्थेतील व परिसरातील वातावरण भक्तीमय स्वरुपाचे झाले होते

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ


 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात अध्यादेश काढण्यात येईल. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. यामुळे ७ हजारांहून अधिक सदस्य निवडून येऊनही अपात्र ठरले आहेत, किंवा ठरवले जाऊ शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

डॉ. शोभा चाळके म्हमाने सेट परीक्षा उत्तीर्ण

                                                  डॉ. शोभा चाळके म्हमाने सेट परीक्षा उत्तीर्ण
 
कोल्हापूर(दि.29):- संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका, प्रागतिक लेखक संघाच्या राज्य सचिव सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका डॉ. शोभा चाळके- म्हमाणे या 2023 या वर्षीच्या इंग्रजी विषयात महाराष्ट्र शासनाच्या पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या सध्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इंग्रजी विभागात कार्यरत आहेत.

त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. शिर्के, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, प्रा. किसनराव कुराडे यांच्यासह डॉ. अमर कांबळे, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. एम. आर. वैराट, डॉ. तृप्ती करिकट्टी, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बार्वेकर, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. सुरेंद्र उपरे, प्रा. सविता घाटगे, डॉ. जयंत कार्तिक यांचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक कार्यात कृतिशील असणाऱ्या डॉ. शोभा चाळके- म्हमाणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बुधवार, २८ जून, २०२३

एक रुपयात शेतकऱ्यांना पीक हमी देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत

 

एक रुपयात शेतकऱ्यांना पीक हमी देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना

सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत 


 

 

            सातारा दि. 28,- नैसर्गिक आपत्ती व अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. अशा कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना मदतीस येते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे व त्यांच्या पिकाला हमी देण्याच्या  उद्देशाने ही पीक विमा योजना राबवण्यात येते. सहसा या पीक विमा योजनेचा हप्ता दर हा 2 टक्के असतो. पण, शासनाने आता फक्त 1 रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही. या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2023 अशी आहे. 

 

            जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडलनिहाय पीक क्षेत्र अधिसूचित केले असून त्याप्रमाणे भात, खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडिद व खरिप कांदा या 9 पिकांसाठी जिल्ह्यात ही योजना लागू आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरावयाचा आहे. उर्वरीत विमा हप्ता शासन भरणार आहे.

            या योजनेमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही सहभागी होता येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांना ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा 7/12 उतारा, खाते उतारा (8 अ) घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरायचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 7/12 उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पीक असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. 

 

या योजनेंतर्गत गारपीट, भूस्खलन, वीमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, ढगफुटी, चक्रीवादळ, वीज कोसळ्याने नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर निश्चित करण्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी वित्तीय संस्थेस (बँकेस) अथवा विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. 

 

या योजनेतील संरक्षित बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पीक पेरणी पुर्वी / लावणी पूर्वी नुकसान भरपाई, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (उभे पीक), स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नैसर्गिक कारणांमुळे होणारे नुकसान.

बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करून अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतात. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी विमा हप्ता कर्ज रकमेतून वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेस द्यावी लागेल. 

 

योजनेत सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या बँकेत खाते आहे तेथे अथवा विमा कंपनीच्या कार्यालयात, सार्वजनिक सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, मंडळ  कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

पाटण - कृषि औजार मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

कृषि औजार मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

सातारा, दि. 28,  – पंचायत समिती पाटणच्या माध्मयातून जिल्हा परिषद सेसमधून खरीप हंगामासाठी बियाणे तसेच विविध कृषि यांत्रिकीकरण, आयुधे, औजारे इत्यादीसाठी पात्र व गरजु शेतकऱ्यांकडून दि. 31 जुलै 2023 रोजी पर्यंयत विहित नमुन्यातील मागणी अर्ज मागवण्यात येत असल्याचे पाटणचे गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी कळवले आहे. 

 

            पात्र लाभार्थ्यांनी अर्जासोबत 8 अ चा उतारा, साता-बारा उतारा, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, बँक पासबूकची झेरॉक्स, सिंचन सुविधेसाठी विहीर पड सातबारा, शेती पंप वीज कनेक्शनचा पुरावा, ट्रॅक्टरचलित औजारांसाठी आरसीटीसी छायाप्रत, मध पेट्या अनुदानासाठी खादी ग्रामोद्योगकडील अटी शर्ती पुर्तता करणे आवश्यक आहे. गटासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास अर्जदारांची लॉटरी काढून प्राथमिक क्रमांकानुसार निवड केली जाणार आहे. 

 

            गरजू व पात्र शेतकऱ्यांना ताडपत्री 30 स्क्वे.मी., ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह सायलक कोळपे, 5 किंवा 7.5 एचपी ओपनवेल विद्युत पंप, 4/5 एचपी डिझेल इंजिन, एचडीपीई किंवा पिव्हीसी पाईप नग 30, ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, कृषि यांत्रिकीकरण (पल्टी नांगर, पाचटकुट्टी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ.) तसेच मधपेट्यासाठी व सुधारीत संकरीत बियाणांबरोबरच औजारांसाठी 40 टक्के पासून 75 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पंकज हलकंदर, रमेश आहेर व सर्जेराव पाटील, विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. शेलार यांनी केले आहे.

पोलिसांप्रमाणे उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत होणार गौरव – मंत्री शंभूराज देसाई

 

पोलिसांप्रमाणे उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत होणार गौरव – मंत्री शंभूराज देसाई


 

 

मुंबई, दि. २७ : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करीत असतात. पोलीस विभागाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांना पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्पादन शुल्क विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री देसाई म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत गौरव केला की त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. विभागाच्या राज्यस्तरीय गौरव सोहळा कार्यक्रमाबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

 

मंगळवार, २७ जून, २०२३

सातारा - पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज दुर्गम भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नेमणूकीच्या ठिकाणी राहून सेवा द्यावी - मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

 

पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

दुर्गम भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नेमणूकीच्या ठिकाणी राहून सेवा द्यावी

-          मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

 


 

 

 

सातारा, दि. 27,  – सध्या पावसाळा सुरु झाला असून, जिल्हयातील व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रानां मोठया प्रमाणात औषधसाठ्याचा पुरवठा करण्यात आला  आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात त्यांची नेमणूक असलेल्या ठिकाणी राहून आरोग्य सेवा पुरवावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य इ. पासून साथ परसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करिता आरोग्य विभागाने सातारा जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत सर्व उपकेंद्राकडील आरोग्य कर्मचारी यांचा पावसाळा पूर्व नियोजना बाबत आढावा घेतला. पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद शिर्के यांनी यावेळी दिली.  

पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर सर्व भागातील पाणी पुरवठा योजनांचे सर्व्हेक्षण करुन, जर एखाद्या ठिकाणी गळती किंवा व्हॉल्व गळती असल्यास, त्या बाबत संबंधीत ग्रामपंचायतीस लेखी पत्र देऊन त्या बंद करणे बाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच डेग्यु, चिकनगुनिया बाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. आरोग्य विभाग व ग्राम पंचायत विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या बाबतच्या प्रत्येक तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांच्या तालुकास्तरीय आढावा सभा घेण्यात आल्या असून पावसाळयात करावयाच्या कामकाजा बाबतच्या सूचना देणत आल्या आहेत.

पावसाळ्यातील कामकाजाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणामध्ये गावातील सर्व विहीर, टाकी, प्रत्येक पेठेतील पहिले व शेवटचे घर, गटारातून गेलेले नळ या ठिकाणी ओटी टेस्ट घेणेत येत आहे. सर्व पाणी उद्भवाचे पाणी नमुने तपासणीस घेतले जात आहेत. संपूर्ण गावात प्रत्यक्ष फिरुन मुख्य पाईपलईन, खाजगी नळ कनेक्शन यामध्ये असणारी गळती शोधून काढणे व ती सर्व संबंधीत ग्राम पंचायती मार्फत तात्काळ दुरुस्ती करुन घेणे. सर्व्हेक्षणाचे वेळी ग्राम पंचायतीमार्फत गटारे वाहती करावीत. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा व विहीरीचा परिसर स्वच्छ करावा. ग्रामपंचायतीकडे असणारे पाणी शुध्दीकरणासाठी लागणारे टि सी एल साठवणूक योग्य आहे का याची पाहणी करुन योग्य ती उपाययाजना करावी.

जिल्हयातील अतिवृष्टी होणाऱ्या जावली, महाबळेश्वर, पाटण व वाई या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रानां अतिआवश्यक असणारी औषधे श्वानदंश – 3 हजार 103, सर्पदंश - 518, जुलाबा करताच्या गोळया पऱ्यायुराझीडॉल – 3 लाख 25 हजार 413, मेट्रोनिडाझोल – 94 हजार 291, ओ आर एस – 20 हाजर 106, पॅरासिटामोल – 4 लाख 97 हजार 377 व सोडीयम हॉयपोक्लोराईड – 3 हजार 15 जादाची औषधे पुरविण्यात आली आहेत. या बरोबर संबंधीत तालुक्यातील दुर्गम भागातील अपेक्षीत प्रसुती होणाऱ्या गरोदर माता यांना संरक्षीत ठिकाणी प्रसुती करिता घेऊन जाणे इ करिता सर्व ॲम्बूलन्स सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दुर्गम भागात किरकोळ आजारा करिता औषधे उपलब्ध होण्यासाठी  भागातील आशांना औषधसाठा देण्यात आला आहे.

पावसाळया करिता जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तर व जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामध्ये सर्व ठिकाणी 24 तास संबंधीत संस्था कार्यरत आहेत. एखादया ठिकाणी आरोग्याशी संबंधीत किंवा आकस्मित घटना घडली तर त्यासाठी साथरोग नियंत्रण कक्षाशी संपर्क क्र 02162-233025 त्वरीत संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी श्री शिर्के यांनी केले आहे.

सातारा - रुंद सरी, वरंबा पद्धत पेरणी ठरेल फायदेशीर कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 

रुंद सरी, वरंबा पद्धत पेरणी ठरेल फायदेशीर

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन


 

 

सातारा, दि. 27,  – निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी करत असतात आणि याचाच परिणाम पिंकावर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे, अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादनवाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरणार आहे. या पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास कमी पाण्यात अधित उत्पन्न घेणे शक्य होणार असल्याचे विजय माईनकर, कृषि विकास अधिकारी यांनी सांगितले आहे.

            बी.बी.एफ पेरणी यंत्र कसे फायदेशीर ठरते – बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते. ही पद्धती कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो. प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी बीबीएफने करावी. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते. बीबीएफ पद्धतीने निविष्ठा खर्चात 20 ते 25 टक्के बचत, खते व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो. उत्पन्नामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होते. वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीतसुद्धा पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते. पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक कीड रोगास बळी पडत नाही.

            काय आहे बीबीएफ – बीबीएफ ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून, रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. त्यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या 3 ते 4 आळी 30 से.मी. किंवा 45 से.मी. अंतरावर 3 ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी 30 ते 45 से.मी. गरजेनुसार ठेवता येते. कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने ही पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे 20 ते 27 टक्क्यांपर्यंत जलसंधारण व 25 टक्के उत्पादन वाढ दिसून आल्याचेही कृषि विकास अधिकारी श्री. माईनकर यांनी सांगितले आहे.

सोमवार, २६ जून, २०२३

सातारा जिल्ह्यात 5 जुलै पर्यंत जमावबंदी आदेश लागू

 

सातारा जिल्ह्यात 5 जुलै पर्यंत जमावबंदी आदेश लागू



सातारा, दि. 26, – जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये 

यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा 

अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या 

अधिकारानुसार 5 जुलै 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...