सरपंचपदाचे आरक्षण इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात ; काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पॅनलप्रमुखांची वाढली डोकेदुखी .
सातारा दि.२१ सरपंचपदाचे आरक्षण आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, गावात कोण होणार 'किंगमेकर' या चर्चेला उधाण आले आहे.
सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत ८७८ सरपंच निवडले जाणार आहेत. जिल्हाधिकारी थोड्याच दिवसांत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्याआधी प्रत्येक तालुक्याला आरक्षणाचा कोटा कळीवण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी नवनिर्वाचित सदस्य तसेच पॅनलप्रमुखांची उपस्थिती असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव असलेले आरक्षण या सोडतीत काढले जाणार आहे.
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राहणार आहे. तसेच इतर प्रवर्गांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार ही सोडत घेतली जाणार आहे. प्रत्येक गावात आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.
ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे अथवा आरक्षित जागा एकच निवडून आलेली आहे, त्याच्याशी पॅनलप्रमुख संधान साधून आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी काठावर बहुमत प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या पॅनलप्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे.पॅनल सत्तेत आणण्यासाठी सदस्यांना बांधून ठेवण्याची डोकेदुखी त्यांच्या पाठीमागे लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. त्यात सरपंच पदाचे आरक्षण काय निघेल, याकडेही त्यांच्या नजरा लागल्या असून, आरक्षणानानुसार आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. काही सदस्य फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना मंदिरासमोर नेऊन देवाच्या शपथा दिल्या जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा