![]() |
संग्रहित चित्र |
पाटण तालुक्यातील काळगाव येथील चोरगेवाडी हे गाव स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेल्यानंतरही अत्यंत प्राथमिक आणि गरजेच्या असलेल्या स्मशानभूमीच्या सुविधेस मुकले आहे. सुमारे ५० उंबरठ्यांचे आणि २५० लोकसंख्येचे हे गाव चारही बाजूंनी घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेले आहे. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र, वन्य प्राण्यांचा प्रचंड त्रास असल्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. परिणामी, अनेक तरुण आणि मध्यमवयीन कुटुंबे रोजगाराच्या शोधात मुंबई आणि इतर शहरी भागांकडे स्थलांतरित झाली आहेत. आज गावात मुख्यतः वृद्धच नागरिक राहिले आहेत.
अंत्यसंस्कारांसाठी एक किलोमीटरचा दुर्गम प्रवास
या गावात वेळी किंवा जर रात्रीच्या पावसाळ्यात एखाद्याचे निधन झाले, तर गावकऱ्यांना मोठ्या कष्टाने एक किलोमीटर अंतर पार करून बांधा-बांधातून चिखल आणि अरुंद पायवाटांमधून मृतदेह शेतात न्यावा लागतो. अशा दुर्गम परिस्थितीतच त्या मृत व्यक्तीचे उघड्यावर अंत्यसंस्कार केले जातात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पावसाच्या धुवांधार सरी असोत वा रात्रीची काळोखाची वेळ, गावकऱ्यांना हीच कसरत करावी लागते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावासाठी हा शेवटचा प्रवासही दुःखद आणि वेदनादायी ठरतो. ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे आपल्या व्यथा व्यक्त करत एकच मागणी केली आहे की, गावाला तातडीने स्मशानभूमी बांधून मिळावी. मृत व्यक्तींचा शेवटचा प्रवास तरी सन्मानाने, सुरक्षित आणि व्यवस्थित पार पडावा, हीच आमची अपेक्षा आहे, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा