गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

कराड : अथणी शुगर्स - रयत साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार एक रक्कमी प्रति मे.टन २ हजार ९२५ रु

कराड : अथणी शुगर्स - रयत साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार एक रक्कमी प्रति मे.टन २ हजार ९२५ रु
कराड दि.20: शेवाळेवाडी-म्हासोली, ता. कराड येथील अथणी शुगर्स - रयत साखर कारखान्याने २०२१-२२ या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मे. टन २ हजार ९२५ रुपयांप्रमाणे एफआरपीची एक रक्कमी ऊस बिलाची रक्कम देणार असल्याची घोषणा अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी केली.शेवाळेवाडी, ता. कराड येथील अथणी रयत शुगर्स चा गळीत हंगाम शुभारंभ रयत कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी घोषणा केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यतील ऊस दराची कोंडी फुटली आहे. यावेळी रयत चे व्हा. चेअरमन आपासाहेब गरुड, अथणी शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील, युनिट हेड रवींद्र देशमुख शेती अधिकारी विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, अथणी शुगर्स -रयत ने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास एफआरपी २हजार ८६७ रुपये इतकी असताना २ हजार ९०० रुपये एक रक्कमी दर देत एफआरपी पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

चालू गळीत हंगामात एफआरपी तीन टप्यात देण्याचे शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी संभ्रमित अवस्थेत होता. मात्र, अथणी शुगर्स-रयत ने ऊस उत्पादक शेतकऱ्याची मागणी विचारात घेता एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर मागील हंगामापासून प्रति टन सवलतीच्या दरात १ किलो साखर दिली जात आहे.

कारखान्याने २०२१-२२हंगामात ५ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीतजास्त ऊस अथणी शुगर्स रयत युनिट या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, योगेश पाटील यांची वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रयत कारखान्याचे संचालक अधिकारी सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्याकडून अभिनंदनाचा वर्षाव

अथणी रयत कारखान्याने एक रकमी एफआरपीची रक्कम जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून कारखान्याचे अभिनंदन होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...